शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाची बातमी कळताच काही सेकंदाच ट्विटर व फेसबुकवर अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहली.
मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाची बातमी कळताच काही सेकंदाच ट्विटर व फेसबुकवर अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहली. बाळासाहेबांची छायाचित्रे अपलोड करून त्यावर ‘आम्ही पोरके झालो’, ‘श्वासांची माळ तुटली, ध्यासांची कधीच नाही!’, ‘अखेरचा निरोप, महाराष्ट्राचा बाप हरपला!’, ‘बाळासाहेब हा महाराष्ट्र सदैव तुमचा ऋणी राहील!’, ‘एकटा टायगर, शिवसेना गर्व से कहो हम हिंदू है।’, ‘देव चोरला माझा, देव चोरला’, ‘साहेब आज महाराष्ट्राला पोरके करून गेलेत’, ‘एक पर्व संपले, असा नेता पुन्हा होणे नाही’,‘अखेरचा जय महाराष्ट्र’, ‘एक वादळाचा अंत’, ‘मराठी तळपती तलवार आज.. म्यानात परतली’, ‘एक था टायगर’, ‘मर्द मराठाला अखेरचा सलाम’, ‘मराठी माणसाचा आवाज हरपला’, ‘शिवसेनेचे छत्र हरवले’, ‘मराठी मनाचा ढाण्या वाघ हरपला’, ‘द हिरो ऑफ कॉमन मॅन.. अलविदा’, ‘आजचा सूर्य मावळतीला जाताना कधी इतका गहिवरून येईल. अटकेपार जाऊन डौलाने फडकणारा पताका स्तंभावरून अर्ध्यावर येईल.
अयोध्येतल्या त्या भूमीला धरणीकंपासारखा भास होईल. शिवतीर्थावर कान सुन्न होईल. तुतारीतून निघणारे सूर वीणेच्या ब्राह्मनादात विलीन होतील..’, ‘असा नेता दहा वर्षात झाला नाही आणि पुढील दहा हजार वर्षात होणार नाही’, ‘मराठी अस्मितेचा बुलंद आवाज हरपला’, ‘हिंदुत्वाचा आधारवड कोसळला’, ‘करुनी जावे असेही काही या दुनियेतून जाताना गहिवर यावा जगात साऱ्या निरोप शेवट घेताना’, ‘हृदयी जपली अपार माया आमच्यासाठी, मरण येईतो झिझली काया।। जरी जाहली नियती निष्ठुर अशी अचानक, झाड गेले ठेवून छाया।।’, ‘मातोश्री अश्रुंच्या भवसागरात, उभ्या महाराष्ट्रातील बाणेदार, तलवारीच्या पातीसारखे धारदार नेतृत्व हरवले, जाणता राजाचे छत्र हरपले.’ अशा शब्दांत बाळसाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली फेसबुकवर व ट्विटरवरून वाहण्यात आल्या.
मुंबई मराठी पत्रकार संघाचे ज्येष्ठ, आजीव आणि सन्माननीय सदस्य बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाने महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशासाठीही लढणारा कडवा माणूस हरपला. महाराष्ट्राचे राजकीयच नव्हे तर सामाजिक क्षेत्राचेही अपरिमित नुकसान झाले आहे. – देवदास मटाले, कार्यवाह, मुंबई मराठी पत्रकार संघ
गेली चार दशके राजकीय सत्तासंघर्षात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करून ज्यांनी मराठी अस्मिता जोपासली, त्यांचे निधन हे महाराष्ट्रवासीयांना चुटपूट लावणारे आहे. मराठी माणसांसाठी घोंघावणारे वादळ अखेर शांत झाले. कला, क्रीडा, शिक्षण, आरोग्य, परंपरा सर्व बाबतीत बाळासाहेबांचा शब्द ही काळ्या दगडावरची रेघ होती. – संजय पाटील, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, मुंबई
शिवसेनेत पूर्वी मी काम केले आहे. बाळासाहेबांची भाषणे ऐकल्यानंतर ऊर्जा मिळवायची. आता दुसरे बाळासाहेब निर्माण होणे नाही.- बाळकृष्ण पूर्णेकर, काँग्रेस शहराध्यक्ष
‘शिवसेनाप्रमुखांशिवाय शिवसेना, बाळासाहेबांशिवाय मातोश्री’ ही कल्पनाच मनाला पटत नाही. कोणतेही सरकारी पद न घेता राज्य, देशात आणि जगात त्यांनी दरारा निर्माण केला. त्यांच्या ओठात जे असायचे, तेच पोटात असायचे. बहुजन समाजाच्या लाखो कार्यकर्त्यांना त्यांनी रोजीरोटीला लावले. राष्ट्र आणि हिंदूंचे रक्षणकर्ते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.- अनंत तरे, माजी महापौर, शिवसेना उपनेते
आचार्य अत्रे आणि बाळासाहेबांनी सीमा प्रश्नाच्या बाबतीत मराठी माणसाच्या भवितव्यासाठी पुढाकार घेतला. ‘मार्मिक’ या साप्ताहिकातून मराठी माणसाला एकत्रित करून शिवसेनेच्या कार्याची ओळख करून दिली. स्पष्टवक्तेपणा, कुणाचीही भीती न ठेवता खुलेपणाने वावरणारा असा हा नेता होता! रायगडमध्ये आयोजित तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळाच्या अनावरण सोहळ्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना माझे वडील प्रभाकर पाटील यांनी आमंत्रित केले होते. पाटील-ठाकरे कुटुंबीयांचा स्नेह तीन पिढय़ांपासूनचा आहे. मराठी माणसाच्या हृदयाला भिडणारा आणि त्यासाठी लढणारा, असा नेता होणे नाही.- आमदार जयंत पाटील, सरचिटणीस, शेतकरी कामगार पक्ष
..
बाळासाहेबांचं कौतुक वाटणारेही अनेक होते आणि त्यांना घाबरणारेही होते. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं कोणालाच शक्य नव्हतं. महाराष्ट्र हा त्यांचा ध्यास होता, अभिमान होता. राज्यातील जनता त्यांना विसरणं शक्यच नाही.- आनंद महिंद्रा, उद्योजक
बाळासाहेब ख-या अर्थाने नायक होते. लोकांनी त्यांच्यावर प्रेम केलं, त्यांची नक्कल केली आणि त्यांनी दाखवलेल्या रस्त्यावर चालण्याचा प्रयत्न केला.- रितेश देशमुख, अभिनेता
..
ते महाराष्ट्राचे डरकाळ्या फोडणारे वाघ होते. ठाकरे कुटुंबीय आणि बाळासाहेबांचे लक्षावधी चाहते यांना हा आघात सहन करण्याचं बळ मिळो.- विवेक ओबेरॉय, अभिनेता
..
महाराष्ट्राने त्याचा वाघ आज गमावलाय.- रितेश सिधवानी, चित्रपट निर्माता
महाराष्ट्राच्या वाघाची डरकाळी आता पुन्हा ऐकू येणार नाही.– शोभा डे, लेखिका
मराठी माणसांचे आशास्थान असलेल्या बाळासाहेबांच्या जाण्याने आज एका पर्वाची समाप्ती झाली आहे. या बातमीमुळे मन सुन्न झाले. देशाच्या राजकारणातील एक झंझावातही संपला आहे. त्यामुळे मराठी माणूस पोरका झाला आहे.- साधना शिंदे, बोरिवली
राजकारणातील दिलदार नेता आणि मराठी माणसांचे श्रद्धास्थान असलेल्या बाळासाहेबांनी शनिवारी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे आम्ही पोरके झालो आहोत. मराठी माणूस आणि मुंबई, महाराष्ट्रासाठीचे त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांना विसरणे अशक्य आहे.- मनोहर परब, कुर्ला
मराठी माणसाला ज्यांनी नेतृत्व दिले, लढण्याची आणि खंबीरपणे उभे राहण्याची ताकद दिली त्या बाळासाहेबांचे जाणे, यावर आमचा विश्वासच नाही. एका ज्वलंत विचारधारेची समाप्ती झाली आहे. त्यांचा महाराष्ट्राला अभिमान आहे. – उल्का विनायक सावंत, वांद्रे
मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होऊ नये, यासाठी तो अनेक संघटनांमध्ये विभागला जाणार नाही. शिवसैनिकांसह महाराष्ट्रातील तमाम जनतेने त्यांच्यासाठी प्रार्थना केली. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. शिवसेनाप्रमुखांचे जाणे ही मराठी माणसांची हानी आहे. गेल्या चार दशकांचा झंझावात अखेर थंडावला आहे.- मृदुल विश्वासराव
मराठी माणसांची एकजूट कायम राहावी, अशी बाळासाहेबांची इच्छा होती. त्यासाठी आता तरी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे. – विश्वास भगत, परळ
मुंबईवर भगवा फडकत राहावा, अशी शिवसेनाप्रमुखांची इच्छा होती. मराठी माणसांचीही हीच इच्छा आहे. त्यामुळे उद्धव आणि राज यांनी एकत्र यावे.- दीपिका जामदार,
काळाचौकी
सर्वसामान्यांचे सरकार असावे, महागाईमुक्त राज्य असावे, यासाठी सत्तेत असूनही सत्तास्थानापासून कायम दूर राहिलेल्या बाळासाहेबांचे जाणे चटका लावून जाणारे आहे. त्यांचे निधन ही महाराष्ट्राच्या राजकारणाची आणि मराठी माणसांची हानी आहे. – विजया कामत, दहिसर