भारतीय सैन्याने डोकलाम परिसरातील गावे रिकामी करण्याचे आदेश दिल्याच्या वृत्ताचे भारतीय लष्कराने खंडन केले आहे.
नवी दिल्ली- भारत आणि चिनी सैन्यांमध्ये सध्या डोकलामवरून तणावाचे वातावरण आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने डोकलाम परिसरातील गावे रिकामी करण्याचे आदेश दिल्याच्या वृत्ताचे भारतीय लष्कराने खंडन केले आहे. डोकलाम परिसरातील कोणत्याही गावक-यांना गाव खाली करण्यास सांगितले नसल्याचे भारतीय लष्कराने स्पष्ट केले आहे.
डोकलामध्ये मागील दोन महिन्यांपासून भारतीय व चिनी सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. अशातच डोकलाम परिसरातील कुपूप, नाथांग आणि जुलूक ही सीमा रेषेवरील गावे खाली करण्याचे वृत्त प्रसिध्द झाले. त्यामुळे तेथील नागरिकांसह देशात युद्धावरून अनेक तर्क लावण्यात येत होते.
मात्र भारताच्या सैन्य अधिका-यांनी गावे खाली करण्याचे कोणतेही आदेश दिल्याचे वृत्त फेटाळले आहे. विनाकारण नागरिकांमध्ये भीती निर्माण करणे चुकीचे असल्याचेही अधिका-यांनी स्पष्ट केले.
डोकलामप्रकरणी चीन भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय सैन्य तयार असल्याचे सूत्रांनी सांगितले. भारतीय लष्कराने सुकना येथून डोकलामच्या दिशेने सैन्य रवाना केले आहे.