उपचारदरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्यास रागाच्या भरात मृताचे नातेवाईक डॉक्टरांना मारहाण करतात. अशा अनेक घटना समोर आलेल्या आहेत.
मुंबई- उपचारदरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्यास रागाच्या भरात मृताचे नातेवाईक डॉक्टरांना मारहाण करतात. अशा अनेक घटना समोर आलेल्या आहेत. मुळात डॉक्टरांच्या चुकीमुळे रुग्णाला जीव गमवावा लागल्यास पोलिसांकडे याबाबत प्रथम तक्रार दाखल करण्यात येते. पोलिसांनासुद्धा तक्रार नोंदवून घ्यावी लागते. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात जाते.
अनेकदा डॉक्टर आणि पोलिसांना अशा प्रकरणांत एकत्र काम करावे लागत असल्याने बहुतेक वेळा अडचणींचा सामना करावा लागतो. या गंभीर परिस्थितीतून नक्की मार्ग कसा काढावा, हे जाणून घेण्यासाठी जे. जे. रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागाच्या वतीने पहिल्यांदाच ‘लॉमेडिकॉन-२०१५’ या खास परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत अनेक तज्ज्ञ व्यक्तींनी डॉक्टर आणि पोलिसांना मार्गदर्शन केले.
रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांविरोधात निष्काळजीपणाची तक्रार आल्यास ती तातडीने नोंदवण्यात यावी, या प्रकरणाची सखोल चौकशी करून घटनेमागील सत्य समोर आणले पाहिजे. या सर्व गोष्टी पोलिसांनी लक्षात घेऊन काम करावे, अशी माहिती आयपीएस अधिकारी व्ही. व्ही. लक्ष्मी यांनी दिली. पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर पुढील पायरी न्यायालयाची असते. त्यामुळे न्यायालयातील प्रक्रियेबाबत माहिती देताना काही प्रत्याक्षिके उपस्थितांना लक्ष्मी यांनी सादर केली. नवोदित डॉक्टरांनी रुग्णांशी संवाद साधणे आवश्यक आहे. तसेच रुग्णांची कशाप्रकारे काळजी घ्यावी, जेणेकरून ते भविष्यात कायद्याच्या कचाटय़ात अडकणार नाहीत, याबाबतही या परिषदेत माहिती देण्यात आली. या प्रसंगी डॉ. व्ही. पी. तिलवानी यांनीही आपली संकल्पना मांडली. दुस-या परिषदेचे आयोजन लवकरच करण्यात येणार आहे.
या परिषदेला जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्यासाहेब लहाने, पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंग, आयपीएस अधिकारी व्ही. व्ही. लक्ष्मी नारायणन, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एस. राधाकृष्णन, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे आणि रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. एम. बी. तायडे उपस्थित होते.