मुंबईत १९९३साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहीम याला भारताच्या ताब्यात देण्याची मागणी भारताने केली आहे.
नवी दिल्ली- मुंबईत १९९३साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहीम याला भारताच्या ताब्यात देण्याची मागणी भारताने केली आहे. दाऊद पाकिस्तानमधील कराची शहरात असल्याचे नव्याने पुरावे मिळाल्यानंतर भारताने ही मागणी केली आहे.
दाऊद कराचीमध्ये असल्याचा भारताचा दावा कायम असून त्यासंदर्भात भारताने अनेक पुरावे सादर केल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी सांगितले.
दाऊदला भारताच्या ताब्यात देण्याची मागणी भारत गेल्या अनेक वर्षापासून करत आहे. तसेच तो पाकिस्तानमध्ये असल्याचे अनेक पुरावे देखील भारताने दिले आहेत. आता पाकिस्तानने कृती करावी आणि त्याला आमच्या ताब्यात द्यावे असे रिजीजू म्हणाले.
दाऊद आणि त्याचा दुबईतील साथीदार या दोघांमधील मोबाईल फोनवरील संभाषण एका संकेतस्थळाने जाहीर केल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
१९९३साली झालेल्या बॉम्बस्फोटमध्ये जवळ जवळ ३०० जणांचा मृत्यू झाला होता. याशिवाय त्यानंतर भारतात विविध शहरामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये दाऊदचा हात असल्याचा भारताचा दावा आहे.
दाऊद कराचीमध्ये असल्याचे मिळालेल्या नव्या पुराव्याची सत्यता तपासली जाईल असे ही रिजीजू यांनी सांगितले.