सर्वपक्षीयांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या ठाणे महापालिका स्थायी समिती सभापतीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून जोरदार तयारी सुरू झाली आहे.
ठाणे – सर्वपक्षीयांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या ठाणे महापालिका स्थायी समिती सभापतीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून जोरदार तयारी सुरू झाली आहे. ११ ऑक्टोबर रोजी सभापतीपदासाठी ही निवडणूक होत असून सोमवारी तीन जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले.
काँग्रेस-राष्ट्रवादी, मनसेप्रणीत लोकशाही आघाडीतर्फे संजय भोईर, शिवसेना युतीचे विलास कांबळे तर भाजपतर्फे संजय वाघुले यांचे निवडणुकीसाठी अर्ज दाखल झाले आहेत. भाजपनेही निवडणुकीसाठी अर्ज भरल्याने शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीत तटस्थ राहण्याचे ठरवणा-या मनसेला लाइनवर आणण्यासाठी लोकशाही आघाडीने ‘व्हीप’ जारी केला आहे.
स्थायी समितीचे विद्यमान सभापती रवींद्र फाटक यांची सभापतीपदाची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपल्याने ही निवडणुक होऊ घातली आहे. मागील स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र फाटक यांना पदाची लॉटरी लागल्याने शिवसेनेची पुरती कोंडी झाली होती.
फाटकांविरोधात शिवसेना-भाजप-बसपा युतीतर्फे विलास कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, या निवडणुकीत शिवसेनेचे सर्व मनसुबे धुळीस मिळाले होते. तेच विलास कांबळे आता पुन्हा युतीतर्फे नशीब आजमवत आहेत. मात्र, या निवडणुकीत भाजपने संजय वाघुले यांना उमेदवारी दिल्याने शिवसेनेची पंचाईत होऊन बसली आहे.
भाजपच्या एका मतामुळे गणित फिस्टकण्याची धास्ती शिवसेनेला आहे. त्यासाठी शिवसेनेतील काही वरिष्ठ पदाधिका-यांनी सोमवारी भाजपतील पदाधिका-यांनी मनधरणी करण्यास सुरुवात केल्याचे समजते. या निवडणुक प्रक्रियेत तटस्थ राहण्याची भूमिका घेणा-या मनसेला कोंडीत पकडण्यासाठी लोकशाही आघाडीतर्फे व्हीप जारी करण्यात आला आहे.
नव्या सभापतींना तीन महिन्यांचा कालावधी
नव्या सभापतींचा कालावधी मार्चपर्यंत असणार आहे. मात्र, यापूर्वीच लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने नव्या सभापतीला केवळ तीनच महिने कारभार करता येणार आहे. आचारसंहिता लागल्यावर कोणतेही निर्णय घेता येणार नाहीत. विकासकामांचे अधिकार प्रशासनाकडे एकवटतील. त्यामुळे मागील वेळेप्रमाणेच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
पक्षीय बलाबल
सध्या स्थायी समितीत राष्ट्रवादी काँग्रेस ५, काँग्रेस २, मनसे १, भाजपा १, शिवसेना ६ आणि बसपा १ असे पक्षीय बलाबल आहे. शिवसेना युती व लोकशाही आघाडीचे संख्याबळ समसमान असल्याने स्थायी समिती सभापतीपद आपल्याकडे यावे यासाठी दोन्हीकडून आताच फिल्डिंग लावली जात आहे.
भाजपचे पारडे जड
२०१२ साली झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपा एकत्रित निवडणूक लढले. मात्र, महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वी भाजपने कोकण आयुक्तांकडे स्वतंत्र गट म्हणून नोंदणी केली. या दोन्ही पक्षांची युती असली तरी भाजपला शिवसेनेचे मत बंधनकारक नाही. त्याच फायदा भाजपने उचलायचे ठरवले आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेने मित्रपक्ष बसपाच्या विलास कांबळे यांना सभापतीपदासाठी उमेदवारी दिली. आताही शिवसेनेकडून कांबळेंचेच नाव पुढे आल्याने भाजपने सवतासुभा मांडल्याने शिवसेनेची अडचण होऊन बसली आहे.