ठाणे शहरात सरत्या २०१५ या वर्षात अनेक महत्वाच्या घटना घडल्या. मात्र यातील सर्वाधिक चर्चेत राहिलेली घटना म्हणजे बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांची आत्महत्या. परमार यांच्या आत्महत्येनंतर ठाण्यात राजकीय भूकंपांना सुरुवात झाली.
ठाणे- ठाणे शहरात सरत्या २०१५ या वर्षात अनेक महत्वाच्या घटना घडल्या. मात्र यातील सर्वाधिक चर्चेत राहिलेली घटना म्हणजे बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांची आत्महत्या. परमार यांच्या आत्महत्येनंतर ठाण्यात राजकीय भूकंपांना सुरुवात झाली. गोल्डन गँग, सिल्व्हर गँग या सा-या गँगचे या घटनेने बुरखे फाटले. या प्रकरणात सध्या चार नगरसेवक अटकेत असून नुकतीच त्यांच्या न्यायालयीन कोठडीतही वाढ करण्यात आली आहे. मात्र यात फक्त छोटे मासे गळाला लागले असून मोठय़ा माशांचे काय? असा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे.
सुरज परमार हे नाव ठाण्याच्या बांधकाम क्षेत्रात सर्वानाच परिचित होते. ठाण्यातील एक मोठे बांधकाम व्यावसायिक असलेले परमार यांनी ७ ऑक्टोबर रोजी आपल्या एका नवीन इमारतीच्या नमुना सदनिकेत गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली होती. यानंतर पोलिसांना परमार यांच्या मृतदेहाजवळून एक सुसाईड नोट सापडली होती. यात आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्यांची काही नावे लिहून नंतर ती खोडण्यात आली होती.
पोलिसांनी ही सुसाईड नोट न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवल्यानंतर त्यातील खोडलेली नावे म्हणजे ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक हणमंत जगदाळे, नजीब मुल्ला, सुधाकर चव्हाण आणि विक्रांत चव्हाण यांची असल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर या चारही नगरसेवकांनी सुरुवातीला अटकपूर्व जामिनासाठी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली.
मात्र तिथे त्यांचा जामीन फेटाळण्यात आल्याने त्यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. तिथेही त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. यावेळी या नगरसेवकांनी आपल्याला त्वरित अटक न करता पोलिसांसमोर शरणागती पत्करण्यासाठी काही दिवसांचा अवधी मागितला आणि त्यानंतर ५ डिसेंबर रोजी हे चौघेही कापुरबावडी येथील सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात हजर झाले. यावेळी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना सुरुवातीला ९ दिवसांची पोलीस कोठडी दिली. त्यानंतर त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सोमवारी २८ डिसेंबर रोजी त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करत त्यांना पुन्हा ११ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात अली आहे.
यादरम्यानच्या काळात ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वेळा त्यांचे जामीन अर्ज फेटाळले आहेत. त्यामुळे कधीकाळी सतत कार्यकर्त्यांचा राबता, ऐशोआरामात जगणा-या या चौघांवर ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या अंडा सेलमध्ये खितपत पडण्याची वेळ आली आहे.
मात्र या सगळ्यांदरम्यान पोलिसांचा तपासही सुरूच होता. परमार यांच्या कार्यालयावर प्राप्तीकर विभागाने २०१४ साली धाड टाकली होती. यात परमार यांची एक डायरी जप्त करण्यात आली होती.
या डायरीत परमार यांनी ठाण्यातील काही राजकीय नेत्यांना निवडणुकीसाठी पैसे दिल्याचा उल्लेख होता. काही राजकीय नेत्यांची उघडपणे नावे लिहिण्यात आली होती. तर काहींची नावे सांकेतिक भाषेत लिहिण्यात आली होती. या सांकेतिक नावांमुळे ठाण्यात मोठी खळबळ उडाली. कारण ही नावे ठाण्यातील अनेक नेत्यांच्या नावांशी साधर्म्य साधणारी होती. त्यात इएस, पीएस, केणी, डीडी, बंटी या सांकेतिक नावांचा समावेश होता. मात्र त्यापैकी ‘बंटी’ या एकाच नावाचे सर्वाधिक भांडवल करण्यात आले. इतर नावांची कुणी साधी चर्चाही केली नाही. भाजपाच्या एका आमदाराने हिवाळी अधिवेशनात याबाबतचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात चच्रेत असलेले नाव जितेंद्र आव्हाड यांचे आहे. मात्र त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दखल झालेला नाही, किंवा तसे कुठले पुरावे नसल्याचे सांगितल्यानंतर ही चर्चा थंडावली. मात्र पोलिसांकडून या नावांचा तपास अजूनही सुरूच असल्याचे समजते. त्यामुळे भविष्यात या प्रकरणात मोठय़ा माशांची नावेही येऊ शकतात.
नेत्यांव्यतिरिक्त परमार यांच्या डायरीत ठाणे महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, अग्निशमन दल अशा अनेक कार्यालये व तिथल्या विभागांची नावे होती. या विभागांपुढे त्यांना दिलेल्या रकमेचे आकडे टाकले होते. मात्र यात त्यांनी कुठल्याही अधिका-याचे नाव टाकले नव्हते. त्यामुळे सर्वच अधिका-यांमध्ये खळबळ उडाली.एकंदरीत या प्रकरणाचा तपास सध्या थंडावल्यासारखा भासत असून मागील १५ दिवसांत पोलिसांनीही काही नवीन गौप्यस्फोट किंवा खुलासा केलेला नाही. त्यामुळे आता परमार यांच्या डायरीच्या उल्लेखाप्रमाणे या प्रकरणात आणखी काही जणांची नावे येतात? की कालांतराने अळीमिळी गुपचिळी होते, हे येणारा काळच सांगेल.