स्त्री व पुरुष अशी वर्गवारी करताना कायम डावलल्या गेलेल्या तृतीयपंथींना मतदानाचा हक्क प्राप्त झाला आहे.
ठाणे- स्त्री व पुरुष अशी वर्गवारी करताना कायम डावलल्या गेलेल्या तृतीयपंथींना मतदानाचा हक्क प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील ३० तृतीयपंथींची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याने त्यांना भारतीय असल्याची नवी ओळख प्राप्त झाली आहे.
पूर्वी निवडणूक आयोगाकडून प्राप्त होणा-या यादीत स्त्री व पुरुष अशी वर्गवारी असायची. त्यामुळे नाव नोंदणी करण्यासाठी जाणा-या कर्मचा-याला तृतीयपंथींची नोदणी कशी करायची, असा पेच निर्माण होत असे. मात्र, निवडणूक आयोगाने आता स्त्री-पुरुष वर्गवारीसोबत इतर नवी वर्गवारी या याद्यांत समाविष्ट केली आहे. जुन्या वर्गवारीमुळे तृतीयपंथी मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयाने तुर्भे, खारेगाव, नालासोपारा आदी भागात तृतीयपंथींची वस्ती असलेल्या भागाचा दौरा केला. या परिसरात बैठका घेऊन त्यांना मतदानाचे महत्त्व समजावण्यात आले. तृतीयपंथी हे समाजापासून बाहेर फेकले गेलेले असतात.
त्यामुळे त्यांच्याकडे वयाचा दाखला, रहिवासाचा पुरावा नसतो. ते ज्या गुरूच्या तालमीत तयार झालेले असतात त्यांचे प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न झाला. त्यानुसार नालासोपारा येथील ३० तृतीयपंथी मतदारांचे नाव यादीत नाव नोंदवण्यास सहमती दर्शवली. मात्र पुराव्याच्या अडचणीमुळे अखेर या तृतीयपंथींचे वय पाहून त्यांच्या नावाची नोंद मतदार याद्यांत करण्यात आली. याबद्दलचे सोपस्कार करण्याचे अधिकार तहसीलदार व तलाठी यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे इतर वर्गवारीत का होईना तृतीयपंथींना मतदान करण्याचा व निवडणुकीला उभे राहण्याचा अधिकार प्राप्त होणार आहे. तसेच इतर वर्गवारीत प्रथमच तृतीयपंथींची नोंदणी मतदार यादीत आणण्याचा मान ठाणे जिल्ह्याला प्राप्त झाल्याचा दावा केला जात आहे.
छायाचित्र न दिल्यास मतदार यादीतून नाव कमी होणार
मतदारांनी मतदार यादीसाठी छायाचित्र देणे आवश्यक आहे. तसे न केल्यास मतदार उपलब्ध होत नसल्याचे कारण पुढे करून मतदार यादीतून नाव कमी होऊ शकते. त्यामुळे मतदारांनी तातडीने छायाचित्र जमा करावीत. असे आवाहन जिल्हा निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधिकारी माधुरी सरदेशमुख यांनी केले आहे.
८० हजार मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली
ठाणे जिल्ह्यात दुबार, मृत व्यक्तींचे नावे मतदार याद्यांतून वगळण्याचे व मतदार यादीत छायाचित्र बंधनकारक करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ८० हजार मतदारांचे नावे मतदान याद्यांमधून वगळण्यात आली आहेत. तसेच मतदार यादीत छायाचित्रासाठी १ लाख २५ हजार छायाचित्रे जमा झाली आहेत. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन ही मोहीम सुरू केली आहे. जिल्ह्यात सुमारे ७२ लाख ७४ हजार मतदार आहेत. यातील अनेकांचे मतदार यादीत छायाचित्र नाही. त्यामुळे बोगस मतदान होण्याची भीती निवडणूक आयोगाने व्यक्त करत मतदार यादीत छायाचित्र सक्तीचे केले आहे. त्यानुसार ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. ५ जुलैपर्यंत जिल्ह्यातून सव्वा लाख छायाचित्रे जमा झाली आहेत. तसेच दुबार नाव नोंदवलेले, मृत, स्थलांतरित मतदार यादीतून वगळण्याचे काम निवडणूक कार्यालयातील कर्मचारी करत असून, सुमारे ८० हजार मतदारांची नावे मतदार याद्यांमधून वगळण्यात आली आहेत.