महापालिकेच्या सफाई कामगारांप्रमाणे किमान वेतन मिळावे, या मागणीसाठी कळवा तसेच मुंब्रा परिसरातील कचरा गोळा करणा-या घंटागाडीवरील सुमारे ३२५ कामगार शुक्रवारपासून संपावर गेले आहेत.
ठाणे – महापालिकेच्या सफाई कामगारांप्रमाणे किमान वेतन मिळावे, या मागणीसाठी कळवा तसेच मुंब्रा परिसरातील कचरा गोळा करणा-या घंटागाडीवरील सुमारे ३२५ कामगार शुक्रवारपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे शहरात कचरा सफाईचे काम ठप्प झाले होते.
महापालिका हद्दीतून दररोज सुमारे ६०० टन कचरा गोळा केला जातो. तीन घंटागाडी कंत्राटदार यासाठी नेमण्यात आले असून १५५ घंटागाडय़ांनी ३५० मेट्रिक टन कचरा वाहून नेला जातो. या गाडय़ांवर ३२५ कामगार काम करतात. मात्र महापालिकेच्या सफाई कामगारांप्रमाणे किमान वेतन मिळावे, अशी या कामगारांची मागणी आहे. या मागणीसाठी कामगारांनी आधीही संप केला होता. त्या वेळी प्रशासनाकडून वाटाण्याच्या अक्षता दाखवण्यात आल्या.
या संपाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने २८ कॉम्पक्टरची व्यवस्था केली होती. या कॉम्पक्टरच्या साहाय्याने शहरातील कचरा गोळा केला गेला. मात्र आता या कामगारांनी ऐन पावसाळ्यात हा संप पुकारल्याने शहरात कच-याचे ढीग साठून रोगराई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.