ठाणे महापालिकेने २० ते ५० हजार रुपये भरून भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) देण्यासाठी अभय योजना सुरू केली आहे.
ठाणे – ठाणे महापालिकेने २० ते ५० हजार रुपये भरून भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) देण्यासाठी अभय योजना सुरू केली आहे. त्यामुळे इतर सोपस्कारातून शहरवासीयांची सुटका होऊन सुमारे ७०० इमारतींवरील करापोटी महापालिकेच्या तिजोरीत १५ कोटी जमा होणार आहेत.
इमारतीची ‘ओसी’असल्यास बँक अथवा घर घेण्यासाठी कर्ज उपलब्ध होते. इमारतीला ओसी नसल्यास ही इमारत अनधिकृत ठरवण्याचे अधिकार सरकारला असतात. ठाणे शहरात मोठय़ा प्रमाणात अनधिकृत इमारती असून त्यांच्याकडे ‘ओसी’चा प्रश्नच नाही. मात्र त्यात महापालिकेची रीतसर परवानगी घेतलेल्या ७०० इमारतींचा समावेश आहे.
विकासकाने इमारत बांधल्यानंतर ‘ओसी’ घेणे गरजेचे होते. मात्र त्यासाठी स्ट्रक्चरल इंजिनीयरचे सर्टिफिकेट, पाणीपुरवठा विभाग, अग्निशमन दल, अतिक्रमण, उद्यान, मलनिस्सारण, मालमत्ता कर विभागाच्या ना-हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता असते. ते उपलब्ध न झाल्याने शहरातील अधिकृत इमारतींना ‘ओसी’ मिळाली नव्हती.
काही इमारतींच्या विकासकांनी इमारत बांधल्यानंतर अंग काढून घेतले. अनेक सोसायटींकडे योग्य कागदपत्रे नसल्याने ओसी मिळवण्यासाठी लागणारा दंड मोठा होता. जेवढी इमारत जुनी तितका दंड अधिक अशी स्थिती होती.
काही इमारतींची दंडाची रक्कम काही कोटींवर गेली होती. नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन पालिकेने सरकारच्या स्टॅम्प डय़ुटी रजिस्ट्रेशन ‘अभय योजने’च्या धर्तीवर ‘ओसी’ मिळवण्यासाठी ‘अभय योजना’ सुरू केली आहे.
असा असेल दंड?
या योजनेनुसार ४०० चौरस फुटांच्या घरांसाठी २५ हजार तर ६०० तसेच त्यापेक्षा जास्त फुटांच्या घरांसाठी ५० हजार रुपये आकारून इमारतींना ‘ओसी’ देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.