ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मंगळवारी आणि बुधवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली.
शहापूर/मोखाडा/कर्जत/खोपोली- ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मंगळवारी आणि बुधवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने नागरिकांना उकाडय़ापासून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी शेतकरी आणि विटभट्टीचालकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.
पालघर जिल्ह्यातील मोखाडा आणि परिसरातही मंगळवार आणि बुधवारी वादळी वा-यासह पाऊस झाला. यात मोखाडा तालुक्यातील तोरणशेत येथे गोपाळ धोडी यांचे घर जमीनदोस्त झाले. यात मंदा गोपाळ धोडी (५४), हर्षल अंकुश धोडी (७), पुजा अंकुश धोडी (६) व किशोर अंकुश धोडी (४) हे घराखाली दबले गेले. यात पुजा हिच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने तिला १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले.
यावेळी मोखाडय़ाचे तहसीलदार जयराज सुर्यवंशी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. शिवाय मोखाडा पंचायत समितीच्या सभापती सारीका निकम यांच्याही घराचे या वादळी पावसामुळे छप्पर उडाले. तर गभालपाडा येथील मधुकर खरपडे, केशव गभाले, शिवराम खरपडे ३ घरांचे मोठे नुकसान झाले.
मोखाडा येथील फौजदार बंगल्याचेही छप्पर उडाले. या सर्व ठिकाणी पंचायत समिती व महसुल विभागाने तातडीने पाहणी करून पंचनामा केला आहे. या पावसाने तालुक्यात माठी वित्तहानी झालेली असली, तरीही सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.
ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्येही वादळी वा-यासह पावसाने हजेरी लावली. शेतक-यांनी जनावरांचा पेंढा कुंभेरीवरच ठेवल्याने तो भिजला असून कुजण्याची भीती आहे. भाजीपाला उत्पादकांनाही याचा फटका बसला आहे. शिवाय उतरवण्यासाठी तयार असलेल्या आंब्याचेही यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील विटभट्टय़ांची अंतिम टप्प्यात आलेली असताना पावसाने त्यांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आणि भट्टीचालकांना नाहक आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे.
रायगड जिल्ह्यात कर्जत तालुका आणि परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाला सुरुवात झाली. तालुक्यातील आदिवासी भागात गारपीटही झाली. लग्नसराई असल्याने अनेकांच्या मंडपांचे या पावसाने नुकसान झाले. वीटभट्टय़ा दुबार भातशेती करणा-या शेतक-यांच्या शेतीचेही नुकसान झाले.
यावेळी वीजपुरवठाही दोन ते तीन तास खंडित झाला होता. तर खोपोलीसह खालापूर तालुक्यातही बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली असली, तरी प्रचंड उकाडय़ाने हैराण झालेल्यांना या पावसाने मोठा दिलासा मिळाला.
खोपोलीतील विवाह सोहळ्यांवरही पावसाचा परिणाम झाला. खालापूर तालुक्यात बुधवारी सायंकाळी ४ नंतर पावसाला सुरुवात झाली. मेघगर्जनांसह वादळी वारा वाहत असल्याने अनेकांची त्रेधा उडाली. खोपोलीसह तालुक्याच्या अन्य भागातही पावसाने हजेरी लावली. यामुळे वीटभट्टी चालकांचे मात्र नुकसान झाले.
तालुक्यासह खोपोलीतील काही भागांचा वीजपुरवठा यावेळी खंडित झाला होता. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला. एक्स्प्रेस वेवरील वाहतूक संथगतीने सुरू होती. त्यातच एचओसी पुलाजवळ एका गॅसच्या टँकरला अपघात झाला, मात्र त्यात कुणीही जखमी झाले नाही.