ठाणे आणि रायगड सर्वत्र जिल्ह्यात आषाढी एकादशी मोठया भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.
ठाणे- ठाणे आणि रायगड सर्वत्र जिल्ह्यात आषाढी एकादशी मोठया भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने काढण्यात आलेल्या पालख्या, दिंडया यांनी वातावरणात वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते. लहानग्यांनीही यावेळी उत्साहाने वारकऱ्यांच्या वेशात दिंडय़ांमध्ये सहभाग घेतला.
मीरा-भाईंदरच्या काशी गावातील प्राचीन गावदेवी विठोबा मंदिरात यानिमित्ताने उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात अभिषेक, काकड आरती, पूजा, पालखी या कार्यक्रमांचा समावेश होता. आदर्श विद्या निकेतनच्या विद्यार्थ्यांनी मंदिरापासून काशीगावातून दिंडी काढली.
श्री शिवशक्ती सेवा मंडळाच्या सहकार्याने केसरीनाथ म्हात्रे यांनी मंदिरात सकाळपासून रात्रीपर्यंत प्रवचन, भजन, कीर्तन तसेच आरतीचे आयोजन केले होते. उल्हासनगर कॅम्प १ मधील प्रती पंढरपूर समजल्या जाणा-या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी वारकऱ्यांची तोबा गर्दी झाली होती. अनेक वारकरी मंदिरावर दिंडया घेऊन आल्याने वातावरण विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेले होते.
बिर्ला मंदिरातही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. याठिकाणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब पूजा केली. यावेळी सेंच्युरी रेयॉन कंपनीचे अध्यक्ष ओ. एस. चितलांगे, महापौर अपेक्षा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. उल्हासनगर कॅम्प ४ मध्ये शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिंडीचे आयोजन केले होते. तसेच संतोषनगरमधील दिंडीत सभागृह नेता धनंजय बोडारे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारेंसह अनेक मान्यवरांनी भाग घेतला.
डोंबिवलीतील शिवाई बालक मंदिर ट्रस्टच्या शाळेतील शिशू आणि बालवर्गातील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढली. यावेळी बालगोपाळ विठ्ठल-रखुमाई आणि वारकऱ्यांच्या वेशात सहभागी झाले होते. यावेळी रिंगण, फुगडयाही घालण्यात आल्या. साईबाबा मंदिरात या दिंडीची सांगता झाली.
कर्जत रेल्वे स्थानकात व्यवसाय करणा-या फेरीवाल्यांनी आषाढी एकादशीनिमित्त रेल्वे प्रवाशांना साबुदाण्याची खिचडी, केळी, चहा देऊन आपली सामाजिक भावना व्यक्त केली. हा उपक्रम ते गेली आठ वर्षे सातत्याने राबवत आहेत. यात बाजारपेठेतील व्यापारी, हातगाडीवाले, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, वृत्तपत्र विक्रेतेही सहभागी होतात.
कल्याण शहर परिसरात आज आषाढीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बिर्ला महाविद्यालयाच्या वतीने निघालेलेली वृक्षदिंडी, भिवंडी तालुक्यातून विठ्ठलनामाच्या गजारात निघालेली दिंडी शहाडच्या बिर्ला मंदिरात आल्या होत्या.
कल्याणच्या शिवाजी चौकातील विठ्ठल मंदिरात रात्रीपासूनच भजन-कीर्तन कार्यक्रम सुरू होते. त्यात स्थानिक महिला मंडळांचा मोठा सहभाग होता. शुक्रवारी शाळांना सुट्टी असल्याने मराठी माध्यमांच्या शाळांनी गुरुवारीच दिंडया काढून एकादशी साजरी केली.