जोरदार वा-यासह मुसळधार बरसणा-या पावसामुळे भाताच्या लाल, पिवळय़ा लोंब्यांसह (कोंब) बहरून आलेली भातशेती पूर्णणे आडवी झाली आहे. पावसाचा हा जोर कायम राहिल्यास ऐन भातकापणीच्या मोसमात पिकाची नासाडी होण्याची भीती शेतक-यांत व्यक्त होत आहे.
वाडा – मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मागील काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्याला झोडपून काढणाऱ्या पावसाने सलग पाचव्या दिवशीही विश्रांती घेतलेली नाही. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घासही हिरावून घेतला जातोय की काय, या भीतीने जिल्ह्याच्या वाडा, विक्रमगड, तलासरी, डहाणू, पालघर, वसई, जव्हार, मोखाडा, शहापूर आदी तालुक्यांतील शेतकरी धास्तावला आहे. जोरदार वा-यासह मुसळधार बरसणा-या पावसामुळे भाताच्या लाल, पिवळय़ा लोंब्यांसह (कोंब) बहरून आलेली भातशेती पूर्णणे आडवी झाली आहे. पावसाचा हा जोर कायम राहिल्यास ऐन भातकापणीच्या मोसमात पिकाची नासाडी होण्याची भीती शेतक-यांत व्यक्त होत आहे.
उन्हाने अंगकांती करपवून काढणा-या ऑक्टोबरमध्ये भातकापणीला सुरुवात होते. मात्र भातकापणीच्या हंगामातच पावसाने गोंधळ घातल्याने जिल्ह्यावर ओल्या दुष्काळाची छाया पसरली आहे. ठाणे जिल्ह्यात खरिप हंगामात भात हे एकमेव पीक घेतले जाते.
जिल्ह्यातील सुमारे ९० टक्के शेतकरी हे भातशेतीतून मिळणा-या उत्पन्नावरच अवलंबून आहेत. भातशेतीच्या माध्यमातून मिळणा-या उत्पन्नावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. सध्या हळव्या जातीची सर्वच भातपिके कापणीसाठी तयार झाली आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात सडकून हजेरी लावणा-या पावसामुळे भातकापणीची कामे रखडली आहेत. ज्या शेतक-यांनी भातकापणीची कामे आटोपण्याची लगबग केली त्यांच्या शेतात पावसाचे पाणी शिरल्याने पिकांची नासाडी झाली आहे. वादळी वाऱ्याच्या तडाख्याने अनेक ठिकाणी भातशेती आडवी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
भाताच्या लोंब्यांना कोंब फुटू लागले!
यंदा सप्टेंबरमध्येच उन्हाच्या कडाका सुरू झाल्याने अनेकांनी महिनाअखेरीस कापणीची कामे उरकून घेतली. पण, भात कापून ठेवलेल्या शेतात पावसाचे पाणी शिरल्याने शेतक-याची फसगत झाल्याचे बोलले जात आहे. कापणी केल्यावर कडक उन्हे मिळण्यासाठी भाताच्या लोंब्या शेतात पसरवून ठेवल्या जातात. मात्र या लोंब्यांवर मागील काही दिवसांपासून पावसाचे पाणी पडत असल्याने त्यांना कोंब फुटू लागल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे.