ठाणे महापालिकेच्या वर्षभरावर आलेल्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची इच्छा असून ठाण्यावर यंदा महापौर भाजपाचा असावा, अशी आमची भूमिका असल्याचे स्पष्ट मत भाजपा शहराध्यक्ष संदीप लेले यांनी व्यक्त केले आहे.
ठाणे – ठाणे महापालिकेच्या वर्षभरावर आलेल्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची इच्छा असून ठाण्यावर यंदा महापौर भाजपाचा असावा, अशी आमची भूमिका असल्याचे स्पष्ट मत भाजपा शहराध्यक्ष संदीप लेले यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली नंतर आता ठाण्यातही शिवसेना-भाजपात संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.
नवनियुक्त शहराध्यक्ष संदीप लेले यांनी आपली नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी नुकतीच पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यात बोलताना त्यांनी स्वबळाची सुप्त इच्छा व्यक्त केली. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत संजय केळकर यांच्या रूपाने भाजपाने शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातून आमदार निवडून आणला असून एकंदरीत मतांची आकडेवारी पाहता ठाण्यातून भाजपाला सुमारे एक लाख ७० हजार मते मिळाली आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे. त्यानुसार आमचा प्रभागांचा अभ्यास सुरू असून प्रत्येक उमेदवार निवडून आणण्याच्याच दृष्टीने उमेदवार देऊ, असेही लेले यांनी स्पष्ट केले.
शिवाय शिवसेनेसोबत युती करायची की नाही? याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून होईल, मात्र युती झाली, तरीही जिथे भाजपाला मताधिक्य होते, आणि जिथे अपेक्षा आहे, अशा जागा आम्ही सोडणार नाही, असे लेले म्हणाले. ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीबाबत विचारले असता, शिवसेना आमच्यात झालेले समझोते पाळेल, अशी अपेक्षा आहे, तसेच त्यांनी शब्द पाळला नाही, तर निर्णय घेण्यासाठी वरिष्ठ आहेतच, असे सूचक विधान लेले यांनी केले.
जम्बो कार्यकारिणीची घोषणा
यावेळी आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून शहराध्यक्ष संदीप लेले यांनी ठाणे शहर जिल्हा भाजपाच्या जम्बो कार्यकारिणीची घोषणा केली. यात ८ उपाध्यक्ष, ४ सरचिटणीस, ८ चिटणीस यांसह अनेक पदांचा समावेश आहे. मनसेतून भाजपात आलेल्या दोघांना तसेच मिलिंद पाटणकर यांनाही या कार्यकारिणीत सामावून घेण्यात आले आहे. तर एन्काउंटर स्पेशलिस्ट माजी पोलीस अधिकारी रवींद्रनाथ आंग्रे यांना यात राष्ट्रीय परिषद सदस्यपद देण्यात आले आहे.