‘प्रहार’च्या ठाणे- रायगड आवृत्तीचा प्रकाशन सोहळा गुरुवारी ठाण्यात वाचकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादात उत्साहात पार पाडला.
फुलांच्या माळांनी सजलेलं नाटयगृहाचं प्रवेशद्वार. सनई-चौघडयाचे मंगल सूर. नऊवारी साडयांमधील मुलींनी अगत्यानं केलेलं स्वागत व ‘प्रहार’च्या वाचकांप्रति असलेल्या स्नेहाचं प्रतीक म्हणून चाफ्याची फुलं. जोडीला सिंधुदुर्ग नगरीतल्या कोकणी उत्पादनाचं एक खास गिफ्ट. वातावरणातला उत्साह, लगबग. ‘प्रहार’च्या ठाणे- रायगड आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात सर्वत्र हाच उत्साह दिसत होता.
संध्याकाळी बरोबर साडेसहा वाजता सल्लागार संपादक आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांचं आगमन झालं व वातावरणातल्या उत्साहाचं रूपांतर जणू चैतन्यात झालं. कार्यक्रमाची सुरुवात झाली ती राष्ट्रगीतानं. राष्ट्रगीताच्या सन्मानानंतर निवेदक या नात्याने सुप्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे व अभिनेत्री संपदा कुळकर्णी यांनी अतुल हा ठाण्याचा जावई व तर संपदा ही ठाण्याची सून.
या दोघांनीही ठाणेकरांची जीवनशैली, इतिहाससमृद्ध ठाणे ते आजचे ठाणे यांचा आढावा घेत प्रेक्षकांशी संवाद साधला. आषाढातल्या ओल्याचिंब मेघसरी, ग्यानबा-तुकारामाचा जयघोष, संगीत, गाणे, नृत्यांची लयलूट, मान्यवरांची मांदियाळी आणि उत्साही रसिकांची दाद अशा जल्लोषपूर्ण वातावरणात ठाणेकरांच्या सांस्कृतिक वैभवात या सोहळ्याने जणू मानाची भर घातली.
‘मोरया मोरया’ असा श्रीगणेशाच्या नावाचा जयघोष करत रंगतदार कार्यक्रमाची सुरुवात झाली. सोनिया परचुरे यांच्या पथकाने या गाण्यावर नृत्याविष्कार सादर केला. लोककवी पी. सावळाराम व ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या स्मृतींना सांगीतिक आदरांजली वाहिल्यानंतर, गायिका उत्तरा केळकर यांनी ‘‘नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा’’ आणि ‘‘चला जेजुरीला जाऊ’’ हे भक्तीपर गीत व लावणी सादर केली. या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले पद्मभूषण कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी, ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं’ आणि ‘यांचं असं का होतं कळत नाही’ या दोन कवितांनी अवघं सभागृहजिंकलं.
‘श्रावणात घन निळा बरसला’, गायक श्रीकांत नारायण यांनी ‘‘मी हाय कोली’’ या कोळीगीताला सभागृहाने जोरदार दाद दिली. उद्योगमंत्री नारायण राणे हे मोहम्मद रफी यांच्या गाण्यांचे चाहते असल्याने श्रीकांत नारायण यांनी ‘गुलाबी आँखे’ या सदाबहार गाण्यासह रफीसाहेबांची इतरही गाणीही सादर क रून प्रेक्षकांना जुन्या काळात नेलं. कवी प्रवीण दवणे यांच्या कवितांनंतर, गायक श्रीधर फडके यांनी ‘‘कानडा राजा पंढरीचा’’ या अभंगाचे सूर छेडले. ज्येष्ठ गायक रवींद्र साठे यांनी ‘आम्ही ठाकरं ठाकरं’, ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ ही गाणी सादर केली. ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ या अभंगानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला. प्रसाद महाडकर यांनी या मैफिलीचे संयोजन केले होते.
‘प्रहार’च्या उन्नतीसाठी गा-हाणे
कोकणात कुठल्याही शुभकार्याच्या प्रारंभी गा-हाणे घातले जाते. आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्याचा क्षण जवळ येत असतानाच कोकणाच्या पारंपरिक वेशातील एक गृहस्थ सभागृहात अचानक उभा राहून बोलू लागला. ‘‘सायबांनो, ह्या काय करतंस, खयचाव शुभकार्य होवच्या अगोदर देवाक गा-हाना घालूचा असता’’. अशी मालवणी भाषेत हाक देऊन त्याने प्रकाशन सोहळा थांबवला. त्यानंतर रंगमंचावर येऊन या व्यक्तीने अस्सल मालवणी भाषेत ‘प्रहार’च्या उन्नतीसाठी देवदेवतांना गा-हाणे घातले.
टाळ-मृदंगाचा गजर
‘‘ग्यानबा तुकाराम’’ चा जयघोष, टाळ-मृदंगाचा गजर करत वारक-यांची दिंडी अचानक सभागृहात अवतीर्ण झाल्याने प्रेक्षकांसह मान्यवर मंडळीही आश्चर्यचकित झाली. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या पालखीतून ‘प्रहार’च्या ठाणे-रायगड आवृत्तीचे आगमन झाले. ‘प्रहार’चे सल्लागार संपादक व राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते या आवृत्तीचे शानदार प्रकाशन करण्यात आले.
‘प्रहार’ ठाणेकरांशी नाळ जोडणार
ठाणेकरांची नाळ सांस्कृतिक परंपरेशी जोडली गेली आहे. त्या परंपरेशी ‘प्रहार’ला स्वत:ला जोडून घ्यायचे आहे, तो प्रयत्न ‘ठाणे-रायगड आवृत्ती’च्या माध्यमातून होणार आहे, असे प्रतिपादन या प्रकाशन सोहळ्यात ‘प्रहार’चे संपादक महेश म्हात्रे यांनी केले. ‘प्रहार’चे सल्लागार संपादक व राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या संकल्पनेतून प्रहार सुरू झाला.
‘शब्दांना सत्याची धार’ हे प्रहारचे बोधवाक्य आहे. ही शब्दांची धार सत्याची असून अन्यायावर प्रहार करण्याची व सर्वसामान्यांना आधार देण्याची आहे. हाच वसा ठाणे- रायगड आवृत्तीत प्रहार जोपसणार असून या भूमिकेमध्ये प्रहार वेगळा ठसा उमटवेल, असा आशावाद म्हात्रे यांनी व्यक्त केला.
कोकणातून सुरू झालेला प्रहार आमच्या ठाण्यात आला. ठाणेकर जनता प्रहारचे स्वागत करीलच, परंतु त्याला अभूतपूर्व प्रतिसाद लाभेल, अशा शुभेच्छा कल्याणचे खासदार आनंद परांजपे यांनी दिल्या.
या सोहळय़ास सौ. निलमताई नारायणराव राणे, सौ. प्रियंका निलेश राणे, सौ. नंदिता नितेश राणे, अभिराज निलेश राणे यांच्यासह ठाण्याचे अप्पर पोलिस आयुक्त ज्ञानेश्वर फडतरे, उपजिल्हाधिकारी मनोज रानडे, प्रांताधिकारी माधव पाटील, तहसीलदार विकास पाटील, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शामसुंदर पाटील, एमआयडीसीच्या विभागीय अधिकारी फरोग मुकादम, ठाणे महापालिका मुख्यालय उपायुक्त संदीप माळवी, सचिव मनीष जोशी, ठाणे महापालिका आयुक्तांचे स्वीय सहायक महेश राजदेरकर, ठाणे महापालिका विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार शाम सावंत, सिने अभिनेता सुशांत शेलार, साहित्यिक अशोक चिटणीस, डॉ. शुभा चिटणीस, इतिहास अभ्यासक सदाशिव टेटविलकर, काँग्रेस शहर उपाध्यक्ष विजय चिंदरकर, नगरसेविका कांचन चिंदरकर, मीनल संख्ये, विक्रांत चव्हाण, जयश्री फाटक, मालती पाटील, पत्रकार कैलास म्हापदी, ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेते संघाचे कार्याध्यक्ष राजेश मोरे, सरचिटणीस अजित पाटील, कल्याण-डोंबिवलीतून काँग्रेसचे नेते दिलीप कुडाळकर, माजी महापौर शाहू सावंत, रिक्षा चालक-मालक युनियनचे सचिव शेखर जोशी, रिक्षाचालकांचे नेते संजय भोळे, बांधकाम व्यावसायिक मोहन पाटील, रोहित शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
ठाणे कार्यालयाचे शानदार उदघाटन
प्रहारच्या ठाणे कार्यालय उद्घाटनप्रसंगी उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यासमवेत सौ. निलमताई राणे, सौ. नंदिता राणे, प्रहारचे संपादक महेश म्हात्रे, महाव्यवस्थापक मनीष राणे, ठाणे महापालिको स्थायी समिती सभापती रवींद्र फाटक, काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय चिंदरकर आदी उपस्थित होते. ठाणे कार्यालयाच्या वतीने ठाणे जिल्हा प्रतिनिधी विवेक कांबळे यांनी नारायण राणे व नितेश राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी वितरण विभागाचे प्रीतम शेट्टी, जाहिरात विभागाचे प्रमुख दत्ताराम माने, कल्याणचे प्रतिनिधी संतोष गायकवाड, छायाचित्रकार अतुल मळेकर, आतीश भोईर, वार्ताहर अतुल जाधव, संतोष तिवारी, हरीश सावंत, वितरण विभागाचे प्रमुख प्रीतम शेट्टी, टिटवाळा वार्ताहर उ.कृ .जाधव, कल्याण वितरण विभागाचे प्रणव भांबुरे उपस्थित होते. स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांचे आगमन झाल्यानंतर बारामती नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते सुनील सस्ते, तावशी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच चंद्रकांत सपकाळ, मराठा सेवा संघ बारामतीचे अध्यक्ष विक्रोंत सटक, स्वाभिमानचे मुंबई संपर्क प्रमुख जगदीश शेट्टी, अन्नु आंग्रे, स्वाभिमान संघटनेचे उपसंघटक विजय देठे, स्वाभिमान विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी उत्कर्ष आर्य आदींनी त्यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
पाडगावकर यांची चौफेर टोलेबाजी
नारायण राणे हे श्रेष्ठ राजकीय नेते आहेत. इतका सुंदर हसणारा माणूस राजकारणात कसा? असा मला कधीकधी प्रश्न पडतो, असे मिश्कीलपणे सांगत कवीश्रेष्ठ मंगेश पाडगावकर यांनी ‘प्रहार’च्या ठाणे-रायगड आवृत्तीला शुभेच्छा दिल्या.
राणे यांचे रेखीव प्रसन्न भाषण ऐकल्यावर बोलण्याची हिंमत होत नाही. आणि खरे तर नारायण बोलल्यावर नराने बोलू नये, अशी चौफेर टोलेबाजी त्यांनी केली. कुठलाही चांगला कवी दोन वाक्यांत भाषण संपवत नाही. आणि तुमच्यासारखे टाळया वाजवून स्वागत करणारे रसिक असतील तर ते मुळीच संपणार नाही, असे त्यांनी म्हटल्यावर टाळयांचा एकच कडकडाट झाला.
सध्या सांस्कृतिक प्रदूषण वाढले आहे. अशा वेळी ‘प्रहार’च्या रूपाने शब्दांचा प्राणवायू मिळाला आहे, अशा शुभेच्छा कवी प्रवीण दवणे यांनी दिल्या. ज्येष्ठ गायक श्रीधर फडके यांनीही प्रहारच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ गायक रविंद्र साठे यांनी जेथे जेथे मराठी भाषा आहे तेथे प्रहार यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त केला.