राज्य सरकारने केलेली टोलमुक्तीची घोषणा म्हणजे जनतेची शुद्ध फसवणुक असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी सांगितले.
मुंबई- राज्य सरकारने केलेली टोलमुक्तीची घोषणा म्हणजे जनतेची शुद्ध फसवणुक असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी सांगितले.
तर ही घोषणा म्हणजे निव्वळ मलमपट्टी असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. काँग्रेस आघाडी सरकारने टोल संदर्भात काही निर्णय घेतले होते. टोलबाबत वेगळे स्वतंत्र धोरण आखण्याची तयारीही आपल्या सरकारने केली होती, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.
तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी ही टोलमुक्तीची घोषणा म्हणजे लोकांची दिशाभूल असल्याचे सांगितले. काही टोलची मुदत संपत आली होती. त्यामुळे त्या टोल नाक्यांवरील टोलमुक्ती होणार होतीच. त्यामुळे भाजपाची टोलमुक्तीची घोषणा हवेतच विरली आहे, असा आरोप तटकरे यांनी केला.
तसेच टोलमुक्तीची यादी जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत या घोषणेचे स्वागत करुन सरकारचे अभिनंदन करण्यात अर्थ नाही, असे तटकरे म्हणाले.
तसेच मुंबईचे प्रवेशद्वार आणि मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरील टोलनाक्यांबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. या टोलनाक्यांबाबत निर्णय घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. ही समिती ३१ जुलैपर्यंत निर्णय घेणार आहे. तर कोल्हापूरमधील टोलबाबत सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समिती ३१ मे पर्यंत निर्णय घेणार आहे. यामुळे मुंबईकर आणि कोल्हापूरकरांना या टोलमुक्तीतून सध्यातरी वगळण्यात आले आहे.
अनेक ठिकाणी टोलवसुली पूर्ण झाली असली तरी त्या टोलनाक्यांवर टोलवसुली सुरू असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. सदर टोलनाके बंद करण्याबाबत सरकार ठोस निर्णय का घेत नाही, अशी विचारणाही माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केली आहे.