समुद्री चाच्यांना मदत केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले कॅप्टन सुनील जेम्स आणि खलाशी विजयन यांची टोगोच्या तुरुंगातून सुटका होणार आहे.
नवी दिल्ली – समुद्री चाच्यांना मदत केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले कॅप्टन सुनील जेम्स आणि खलाशी विजयन यांची टोगोच्या तुरुंगातून सुटका होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी ही माहिती दिली आहे.
सुनील जेम्स गुरुवारी भारतात येण्यासाठी निघणार आहेत. सुनील जेम्स यांच्या एमटी ओशन सेनच्युरियन या जहाजावर समुद्री चाच्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्याची माहिती देण्यासाठी ते टोगो या देशात थांबले असता, उलट त्यांच्यावरच समुद्री चाच्यांना मदत केल्याच्या ठपका ठेऊन ३१ जुलै रोजी अटक करण्यात आली होती.
जेम्स यांचा अकरा महिन्याचा मुलगा विहानचा दोन डिसेंबरला मृत्यू झाला होता. त्याच्या अंत्यविधीला निदान जेम्स यांना उपस्थित रहाता यावे यासाठी जेम्स यांची पत्नी आदिती आणि नातेवाईकांनी दहा डिसेंबर रोजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटून जेम्स यांच्या सुटकेची विनंती केली होती.
तब्बल पाच महिन्यानंतर सुनील यांची सुटका होणार आहे. त्यांच्या सुटकेसाठी केलेल्या प्रयत्नांसाठी पत्नी आदिती यांनी सरकारचे आणि पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे आभार मानले.