प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे थरारक कथानक, मती गुंग करून टाकणारे रहस्य, थोडे साहस आणि चिमूटभर क्रूर हिंसेची फोडणी ही रेसिपी सध्या १०० टक्के खपत आहे.
मुंबई – प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे थरारक कथानक, मती गुंग करून टाकणारे रहस्य, थोडे साहस आणि चिमूटभर क्रूर हिंसेची फोडणी ही रेसिपी सध्या १०० टक्के खपत आहे. दूरचित्रवाहिन्यांवर सुरू असलेल्या गुन्हेगारीविषयक कार्यक्रमांनाच सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत असली तरी याच कार्यक्रमांतील युक्तींचा आधार घेत आजची तरुणाई गुन्हेगारीच्या विळख्यात अडकत असल्याचे चित्र आहे.
बलात्कार आणि महिलांवर होणारे अत्याचार यांना सध्या पेव फुटले आहे. ज्या सहजतेने हे गुन्हे घडत आहेत, ते पाहता ही अतिशय चिंतेची बाब आहे. मात्र यासाठी पोलिसांना जबाबदार धरून फार काही साध्य होणार नाही. कारण हे गुन्हे विशेषत: तरुणाईच्या मानसिकतेत प्रवेश केलेल्या विकृतीमुळे घडत आहेत. आईवडील नोकरीनिमित्त बाहेर, हातात इंटरनेट, मोबाइलसारखे आधुनिक तंत्रज्ञान, त्यामुळे कामुक वातावरण आणि अनिर्बंध वागणे असे स्फोटक वातावरण आहे. मात्र याबाबत आईवडिलांना याची जाणीवही नसते. नेमके याच गोष्टीचा फायदा उठवत ही मुले मित्रांच्या संगतीत व्यसनांच्या आहारी जातात. आईवडील मात्र आपल्या लाडक्या मुलांना पैशाची कमी भासू नये, याकरता त्यांना रोज पॉकेटमनी देतात. त्यामुळे या मुलांचा संबंध दिवस नशेतच जातो. मुलांचे व्यसन वाढत गेल्याने त्यांना पैशाची गरज भासू लागते. पैसे वेळेत न मिळाल्यास ही मुले कोणत्याही थराला जातात. गेल्या काही महिन्यांत अनेक गंभीर गुन्ह्यांत अगदी कोवळ्या वयातील मुले अथवा तरुणांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. चोरी, दरोडे, अपहरण, हत्या अशा गुन्ह्यांत ही कोवळी मुले सापडली आहेत. सुसंस्कृत म्हणवणा-या कुटुंबांतील मुलांची यात मोठी संख्या आहे. मात्र यातील बहुतांश मुलांना या गुन्ह्यांची प्रेरणा गुन्हेविषयक विविध मालिकांतून मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सध्याची पिढीला जरा जास्तच संताप येतो. त्यामुळे चूक आणि बरोबर यातील फरक त्यांना समजत नाही. त्यांच्याकडून घडणारे गुन्हे हे राग किंवा नैराश्यातून होतात. या अवस्थेत येणा-या शंकाचे किंवा त्या परिस्थितीतून बाहेर येण्याची मानसिक ताकद त्यांच्यात नसते. परिणामी त्यांच्या डोक्यातील राग त्यांना नेहमीच वाईट गोष्टीकडे घेऊन जातो. यामुळेच कळन नकळत ही मुले गुन्हेगारीकडे वळतात आणि गुन्हा घडल्यानंतर त्यांना त्याचा पश्चात्ताप होतो. याकरता पालकांनी आपल्या पाल्याला समजून घेणे गरजेचे आहे. – डॉ. शुभांगी पारकर, मानसोपचाकरतज्ज्ञ, केईएम रुग्णालय
नोव्हेंबर २०१३
ओशिवरा येथील उच्चभ्रू वस्तीतील तीन मुले अमली पदार्थाच्या आहारी गेली होती. अमली पदार्थ घेण्यासाठी पॉकेटमनी कमी पडू लागल्याने, त्यांनी याच परिसरातील सोसायटयांत चोरी करण्यास सुरुवात केली होती. ही युक्ती त्यांना टीव्हीवरील एक मालिका पाहताना सुचली. मात्र ही त्यांची वृत्ती जास्त काळ टिकली नाही. एका ठिकाणी चोरी करताना या तिघांमधील एकाने चोरी करण्याकरता आलेल्या घरातून मित्राला फोन केला आणि चौकशीत हे तिघेही पोलिसांच्या जाळय़ात सापडले.
गोरेगाव येथे राहणा-या एका विवाहित तरुणाचे त्याच परिसरातील तरुणीशी प्रेमसंबंध होते. मात्र कालांतराने ही तरुणी त्याला लग्नाची गळ घालू लागल्याने या तरुणाने तिला संपवण्याचा निर्णय घेतला. हा कटही या तरुणाने टीव्ही मालिका पाहून रचला होता. त्यानुसार या तरुणाने प्रेयसीला बोरिवली येथील नॅशनल पार्कात बोलावून तिला शीतपेयातून झोपेच्या गोळय़ा दिल्या. त्यानंतर तिची हत्या केली. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्याने तिच्याच मोबाइलवरून तिच्या आईला व स्वत:च्या मोबाइलवर जेवण झाले असल्याचा मॅसेज पाठवला. मात्र त्याचा हा बनाव फार काळ टिकला नाही. पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला व त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.