मुंबई विद्यापीठात सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा टीवाय बीकॉमचा निकाल गुरुवारी जाहीर झाला.
मुंबई- मुंबई विद्यापीठात सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा टीवाय बीकॉमचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. टीवाय बीकॉमच्या परीक्षेत एकूण ८१.१३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालात मागील वर्षाच्या तुलनेत किंचितशी घट झाली असल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील अधिका-यांनी दिली.
मुंबई विद्यापीठात टीवाय बीकॉमच्या परीक्षेसाठी ७१ हजार ४२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मात्र त्यापैकी ७१ हजार ४०४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी ४३ हजार ०४९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत यशस्वी झाले असून, १० हजार २२७ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणीत यश संपादन केले आहे. तर १२ हजार ७४४ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.
मुंबई विद्यापीठात टीवाय बीकॉमच्या परीक्षेला सुरुवात होण्यापूर्वीच ‘एमफुक्टो’ या प्राध्यापक संघटनेने परीक्षांच्या सर्व कामकाजावर बहिष्कार टाकला होता. यामुळे मुंबई आणि परिसरात अनेक ठिकाणच्या महाविद्यालयांत प्रात्यक्षिक परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ आली होती. प्राध्यापकांनी सर्व अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचे कामही रोखून धरले होते. यामुळे हा निकाल उशिरा लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, मुंबई विद्यापीठाने सर्व प्रकारची यंत्रणा कामाला लावून टीवाय बीकॉमचा निकाल वेळेत लावला. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.