नव्या राजकीय इनिंगसाठी सज्ज असलेल्या टीम अण्णाच्या प्रमुख सदस्यांनी रविवारी दिल्लीत निदर्शने केली मात्र टीममध्ये दुफळी झाल्याचे दिसून आले.
नवी दिल्ली -‘‘केवळ पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याच निवासस्थानासमोर आंदोलन करायचे, भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या निवासस्थानासमोर नको!’’ असा हेका कायम ठेवणा-या किरण बेदी यांनी रविवारी ‘टीम अण्णा’च्या आंदोलनापासून स्वत:ला दूर ठेवले. त्यामुळे ‘टीम अण्णा’मधील दुफळी पुन्हा एकदा उघडकीस आली आहे. दुसरीकडे रविवारच्या आंदोलनात अनेकांच्या डोक्यावरील ‘मै अण्णा हू’च्या टोपीऐवजी ‘मै अरविंद हूं’ अशा लिहिलेल्या टोप्यांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अण्णा आणि किरण बेदी यांच्या अनुपस्थितीत अरविंद केजरीवाल यांनी हे आंदोलनच हायजॅक केल्याची चर्चा त्यामुळे सुरू झाली आहे.
कोळसा खाण गैरव्यवहारप्रकरणी पंतप्रधान, सोनिया गांधी व गडकरी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा निर्णय केजरीवाल यांच्यासह ‘टीम अण्णा’मधील सदस्यांनी घेतला होता.
मात्र किरण बेदी यांचा गडकरींच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यास विरोध होता. मात्र या तिन्ही नेत्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलनाचा निर्णय कायम असल्याचे केजरीवाल यांनी सांगितल्याने बेदी आंदोलनस्थळी फिरकल्याच नाहीत. केजरीवाल व प्रशांत भूषण रविवारी सकाळी जंतर मंतर येथे ठरलेल्या वेळेनुसार पोहोचले. बेदी तिथे न दिसल्याने दूरध्वनी व ई-मेलद्वारे त्यांच्याशी संपर्काचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांनी त्यास प्रतिसाद दिलाच नाही.
केजरीवाल यांच्यासह शेकडोंची धरपकड
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने करण्यास दिल्ली पोलिसांनी मज्जाव केल्यानंतरही ‘टीम अण्णा’ने रविवारी या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे पोलिसांनी लाठीमार करत अरविंद केजरीवाल यांच्यासह शेकडो आंदोलकांची धरपकड केली. पोलिसांनी या आंदोलकांना केवळ जंतर मंतर येथेच आंदोलन करण्यास परवानगी दिली होती. पंतप्रधान, सोनिया गांधी व गडकरी यांची निवासस्थाने उच्च सुरक्षा विभागात येत असल्याने तिथे आंदोलन करण्यास मनाई केली होती. मात्र मनाईकडे दुर्लक्ष करून टीम अण्णाच्या आंदोलकांनी चार तुकडय़ा करून विविध ठिकाणी आंदोलन केले.
काही आंदोलकांनी जंतर मंतरवर, काहींनी पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या रेसकोर्स रोड, सोनियांचे निवासस्थान असलेल्या जनपथ आणि गडकरींचे निवासस्थान असलेल्या तुघलक रोडवर आंदोलन केले. रेसकोर्स रोड, जनपथ व तुघलक रोडवर येणा-या आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र त्याला न जुमानता आंदोलकांनी अडथळेही ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी अश्रुधूर व पाण्याच्या फवा-यांचा मारा करून त्यांना थोपवण्याचा प्रयत्न केला. यानंतरही आंदोलक ऐकत नसल्याने केजरीवाल, प्रशांत भूषण, मनीष सिसोदिया व कुमार विश्वास यांना ताब्यात घेतले. काही आंदोलकांनी परिसरातील वाहनांच्या टायरमधील हवाही सोडून देण्यास सुरुवात केल्याने पोलिसांनी त्यांची धरपकड केली.