मागील काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील विविध भागांत मुक्काम ठोकणा-या पावसाने गुरुवारी रात्रीपासून ‘झोडधार’ आंदोलन छेडल्याने ल्हासनगरसह ठाणे शहराला जलमय करून टाकले.
ठाणे, रायगड – मागील काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील विविध भागांत मुक्काम ठोकणा-या पावसाने गुरुवारी रात्रीपासून ‘झोडधार’ आंदोलन छेडल्याने वसई, विरार, नालासोपारा, डहाणू, वाडा, जव्हार, मोखाडा, शहापूर, बदलापूर, पालघर, कल्याण, डोंबिवली, नवी मंबई, अंबरनाथ, उल्हासनगरसह ठाणे शहराला जलमय करून टाकले. हा मोर्चा पुढे सरकवत पनवेल, पेण, महाड, खोपोली, अलिबाग, पाली- सुधागड, नागोठणे, रोहा, कर्जतकडे वळवल्याने आभाळ फाटल्यागत परिस्थिती निर्माण झाली होती.
रोह्याच्या कुंडलिका नदीने घेतला रुद्रावतार
रायगड जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद रोहा तालुक्यात झाली आहे. कुंडलिका नदीने रौद्ररूप धारण केले आहे. या नदीच्या पाण्याची पातळी शुक्रवारी वाढली होता. रोहा अष्टमी शहरादरम्यान दुवा असलेल्या कुंडलिका नदीवरील पुलावरून ढोपरभर पाणी वाहु लागल्याने रोहेकर धास्तावले होते. तर नसर्गिक नाल्यालगतच विकासकांनी अतिक्रमण केल्याने वरसे व भुवनेश्वरमध्ये पुराचे पाणी शिरले होते.
कर्जत -कल्याण मार्गावर दरड कोसळली
कर्जत- कल्याण राज्यमार्गावरील जिते गावच्या वळणावर शुक्रवारी सकाळी दरड कोसळली. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने (एमएमआरडी) निकृष्ठ दर्जाचे काम केल्यामुळे तसेच कंत्राटदारांच्या मनमानी कारभारामुळे ही घटना घडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
कल्याणमध्ये शाळांना गळती
कल्याण पश्चिमेतील बारदानगल्ली येथे असलेली डॉ. राधाकृष्ण सर्वपल्ली मराठी व डॉ. सलीम अली या ऊर्दू माध्यमाच्या शाळांना गळती लागली होती. बर्डे व पाथर्ली येथील पालिकेच्या शाळांचे छप्पर गळके असल्याने वर्गात अखंड अभिषेक सुरू होता.
त्यामुळे गळक्या छपराखाली विद्यार्थी ज्ञानार्जन करतानाचे चित्र होते.
भिवंडीलाही दणका
भिवंडीतील नदीनाका , शिवाजी चौक , पद्मानगर , खाडीपार , तिनबत्ती, इदगाहरोड , सुभाष नगर ,नालापार , बंदर मोहल्ला, खोणी- म्हाडा कॉलनी, भाजी मार्केट, मुंबई नाशिक महामार्गावरील रांजनोळी नाका, माणकोली नाका आदी ठिकाणी पाणी भरले होते. पावसामुळे भिवंडीतील शाळा- कॉलेजांना सुट्टी देण्यात आली होती. शहरालगत वाहणारी कामवारी नदी दुथडी भरून वाहू लागल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
वालधुनी, उल्हास नदीच्या पातळीत वाढ
कल्याणमधील वालधुनी व उल्हासनदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नजीकच्या परिसरात राहणा-यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. केडीएमसीला पाणी पुरवठा करणारा मोहने बंधारा ओसंडून वाहत होता. कल्याण पश्चिमेतील आंबेडकर रोड, गुरुदेव, शिवाजी चौक, सहजानंद चौक रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता. कल्याणमधील चक्कीनाका, विठ्ठलवाडी, काटेमानिवली परिसरातही पाणीच पाणी झाले होते. डोंबिवली पश्चिमेतील शिधावाटप कार्यालय व संस्कार भारतीच्या कार्यालयात पाणी शिरले. कार्यालयात पाणी शिरल्याने खुर्चीवर पाय ठेवून बसावे विश्रांती घेण्यापलीकडे कर्मचा-यांना पर्याय उरला नव्हता.
नागोठण्यात पुराचे पाणी शिरले
नागोठणे येथील अंबा नदीला पूर आल्याने शिवाजी चौक, बाजारपेठ, बंगले आळी, कोळीवाडा आदी भागात पाणी शिरले होते. एसटी स्थानकही पाण्यखाली गेले होते. मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूकही पावसामुळे बराच काळ रखडली होती.
वसईच्या मिठागार भागात २५० जण अडकले
वसई पूर्वेकडील मिठागरात जवळपास २५० लोक अडकले होते. मिठागराच्या झोपडय़ांतील हे रहिवासी असून त्यांच्या घरात तीन ते चार फूट पाणी जमले होते. पर्यायी रस्ता नसल्याने ते अडकून पडले होते. दूपारी बाराच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांनी या ग्रामस्थांना बाहेर काढण्याचा काढले.
पनवेलच्या गाढी नदीने ओलांडली धोक्याची पातळी
मुसळधार पावसाने पनवेलची गाढी नदी भरून वाहत होती. पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कळंबोली येथे सखल भागात पाणी तुंबले होते. गाढी नदीला आलेल्या पूरामुळे उमरोली गावाचा शहराशी संपर्क तुटला होता.
सावित्रीचे पाणी महाड शहरात
महाडमध्ये संततधार लावणा-या पावसामुळे शहरातील दस्तुरी नाका, सुकट गल्ली, व क्रांतीस्तंभ परिसर पाण्याखाली गेला होता. सावित्री, गांधारी, काळ व काळ नद्याही दुथडी भरून वाहत आहेत. गुरुवारी दिवसभर पावसाचा जोर राहिल्याने तालुक्यात १२६ मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली. सावित्रीचे पाणी महाड शहरातील दस्तुरी नाक्यापर्यंत शिरले होते. शुक्रवारी नाते गावाला जोडणा-या पुलावरून गांधारी नदीचे पाणी वाहत असल्याने हा मार्ग दोन दिवसापासून बंद आहे.
बारवी धरण ७० टक्के भरले
ठाणे जिल्ह्यात औद्योगिक परिसराला पाणीपुरवठा करणारे बारवी धरण ७० टक्के भरले आहे. उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण-डोंबिवली, ठाणे, भिवंडी महापालिका व ठाणे जिल्हा एमआयडीसीतील कारखान्यांना बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो.
ठाण्यात लोकलसेवेचे तीनतेरा
कळवा व मुंब्रा स्थानकांदरम्यान रुळावर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरील वाहतूक दोन तास विस्कळीत झाली होती. या गोंधळामुळे शुक्रवारी सकाळी कार्यालयाची वाट धरणा-या नोकरदारांचे वेळापत्रक कोलडमले. कळव्याजवळ विद्युत यंत्रणेत बिघाड झाल्याने धीम्या मार्गावरील वाहतूक खोळंबली. हा बिघाड दुरुस्त होत नाही तोच मुंब्रा ते ठाणे स्थानकांदरम्यान अनेक ठिकाणी रेल्वे रुळच पाण्याखाली गेल्याने लोकल ३० ते ४० मिनिटे उशिराने धावत होत्या.
ठाणे महापालिकेचा नालेसफाईचा दावा गेला वाहून
ठाणे जिल्हयात सर्वाधिक पालघर तालुक्यात १८९ मि. मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. भिवंडीतील कामावरी नदी भरून वाहत आहे. जोरदार पावसाने ठाणे महापालिकेच्या नालेसफाईचा दावा फोल ठरवला. गोकुळनगर भागातील ७५ घरांत नाल्याचे पाणी शिरल्याने रहिवाशांची धावपळ उडाली. आंबेडकरनगर, गोकुळनगर, कापूरबावडी परिसरातील नाले दुथडी भरून वाहत होते. आंबेडकर नगर, उथळसर, सिव्हील हॉस्पीटल , किसननगर, भटवाडी परिसरातील घरांतही पावसाचे पाणी शिरले. ठाणे पुर्वेककडील पाटीलवाडी चाळतील १२० घरांत पाणी शिरले. दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या अनेक गाळय़ांतही पाणी शिरले होते. एनकेटी कॉलेज, गडकरी रंगायतन, वंदना सिनेमागृह, पाचपाखाडी, कापूरबावडी, मानपाडा आदी परिसरातील सखल भागात गुडघाभर पाणी साचले होते. महाराष्ट्र विद्यालय परिसरात गुडघाभर पाणी साचल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांना बाहेर काढणे कठीण झाले होते. आपत्ती व्यवस्थापनानाच्या कर्मचा-यांनी ब-याच प्रयत्नानंतर त्यांना बाहेर काढले. कळवा येथील सहकार विद्याप्रसारक मंडळाच्या शाळेतही पाणी शिरले होते. या शाळेतील २२५ विद्यार्थ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. वसंतविहार येथे संरक्षक भिंत कोसळून कार व दोन दुचाकींचे नुकसान झाले आहे.