जदयू आणि राजदलाला काही जागा सोडाव्या, अशी काँग्रेसची मागणी झारखंड मुक्ती मोर्चाला मान्य नसल्याने, अखेर युती संपुष्टात आली.
पाटणा- झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसमध्ये गेल्या दीड वर्षापासून असलेली आघाडी अखेर संपुष्टात आली. परिणामी दोन्ही पक्षांनी आगामी विधानसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचे जाहीर केले. येथे पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार असून, पहिल्या फेरीचे मतदान २५ नोव्हेंबरला होणार आहे.
जागावाटपावर तोडगा निघू न शकल्याने, शेवटच्या क्षणाला आमची काँग्रेसबरोबरची आघाडी तुटली. आम्ही सर्वच्या सर्व ८१ जागांवर लढवणार आहोत, असे जेएमएमचे नेते आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेने यांनी सांगितले.
जागावाटपाबाबतच्या चर्चेत काँग्रेसने ४५ जागांची मागणी केली. तसेच जमातारा, घाटशिला आणि पाकूर या विधानसभेच्या जागाही मागितल्या होत्या. या जागा सोडण्यास जेएमएमने नकार दिला. जेएमएमच्या वाटय़ाला येणा-या ३६ जागांमध्ये जदयू आणि राजदलाला काही जागा सोडाव्या, अशी काँग्रेसची मागणी मान्य नसल्याने, अखेर युती संपुष्टात आली.