झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसमध्ये गेल्या दीडवर्षांपासून असलेली आघाडी संपुष्टात आली आहे.
पाटणा – झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसमध्ये गेल्या दीडवर्षांपासून असलेली आघाडी संपुष्टात आली असून, दोन्ही पक्षांनी आगामी विधानसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.
झारखंडमध्ये पाच टप्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार असून, पहिल्या फेरीचे मतदान २५ नोव्हेंबरला होणार आहे. जागा वाटपावर तोडगा निघू न शकल्याने, शेवटच्या क्षणाला आमची काँग्रेसबरोबरची आघाडी तुटली. आम्ही सर्वच्या सर्व ८१ जागांवर लढवणार आहोत असे जेएमएमचे नेते आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेने यांनी सांगितले.
दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपासंदर्भात दिल्लीमध्ये चर्चा सुरु होती. चर्चेच्या अनेक फे-याही झाल्या. काँग्रेसने ४५ जागांची मागणी करतानाच, जमातारा, घाटशिला आणि पाकूर या विधानसभेच्या जागाही मागितल्या होत्या. या जागा सोडण्यास जेएमएमने नकार दिला.
जेएमएमच्या वाटयाला येणा-या ३६ जागांमध्ये जदयू आणि राजदला काही जागा सोडाव्या अशी काँग्रेसची मागणी होती जेएमएमला हा प्रस्ताव मान्य नसल्याने याची परिणीती अखेर आघाडी तुटण्यामध्ये झाली.