मराठी सोबतच हिंदी आणि इंग्रजी रंगभूमीवर आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले.
पुणे – ज्येष्ठ नाटयकर्मी आत्माराम भेंडे यांचे पुण्यातील रत्ना हॉस्पिटलमध्ये शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. गेल्या सहा दशकांहून अधिक काळ मराठी रंगभूमीवर अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता म्हणून भेंडे कार्यरत होते. त्यांच्या निधनाने मराठी नाटयसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
भेंडे यांनी इंडियन नॅशनल थिएटरमधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. विनोदी अभिनेते आणि लेखक बबन प्रभू यांच्याबरोबर त्यांनी केलेली अनेक दर्जेदार विनोदी, फार्सिकल नाटके गाजली. अभिनेता म्हणून आत्माराम भेंडे यांनी ‘मन पाखरू पाखरू’, ‘प्रिती परी तुजवरती’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘तुज आहे तुजपाशी’, ‘पळा पळा कोण पुढे पळे’ आदींसह अनेक नाटकांमधून आपले अभिनय कौशल्य दाखवले. बबन प्रभू-आत्माराम भेंडे या जोडीने ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’, ‘झोपी गेलेला जागा झाला’, ‘पिलूचं लग्न’ आदी अनेक नाटके गाजवली. मराठी रंगभूमीप्रमाणेच हिंदी, इंग्रजी रंगभूमीवरही त्यांनी ठसा उमटवला.
अनेक दूरदर्शन मालिकाही त्यांनी दिग्दर्शित केल्या आहेत. त्याचप्रमाणे भेंडे यांच्या अनेक जाहिरातीही गाजल्या. भेंडे यांना आतापर्यंत नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, नाटय़दर्पण, शंकरराव घाणेकर, नाटय़भूषण, चिंतामणराव कोल्हटकर, नटसम्राट नानासाहेब फाटक तसेच २००६ – २००७ साली महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्य सांस्कृतिक राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भेंडे यांचा जन्म ७ मे १९२३ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोंदा येथे झाला. लहानपणी कोकणातील पारंपरिक दशावतारी नाटके त्यांनी पाहिली. अनेक नाटय़ कंपन्या त्यांच्या घराशेजारी उतरत असत. त्यामुळे त्यांना नाटकांचे मोफत पास मिळत. नाटय़प्रेमाचे बीज त्यांच्यात तेथेच रुजले. शाळेच्या वार्षिकोत्सवात पन्हाळगडाचा किल्लेदार या नाटकात त्यांनी पहिल्यांदा भूमिका केली. शालेय शिक्षण संपल्यानंतर ते मुंबईला आले. घरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे त्यांनी शिक्षणावरच पूर्ण लक्ष्य केंद्रित केले.
मात्र, ते व्हीजेटीआयला शिकत असताना प्राध्यापकांना नाटकांची आवड होती. १९४५ साली व्हीजेटीआयमधून वस्त्रोद्योग अभियांत्रिकीची पदवी घेऊन ते बाहेर पडले. त्याच वेळेस त्यांना आठवडय़ातून एकदा रेडिओवर काम करण्याची संधी मिळाली. त्या वेळेस त्यांना एका कार्यक्रमाचे ५ रुपये मिळत होते. त्यांचे मित्र शंकर आडिवरेकर हे इंडियन नॅशनल थिएटर (आयएनटी)च्या मराठी विभागाचे प्रमुख होते. आडिवरेकर आणि माधव मनोहर यांनी त्यांना ‘सशाची शिंगे’या नाटकात भूमिका देऊ केली.
पुढे ते आयएनटीच्या मराठी विभागाचे समन्वयक झाले. तेथे त्यांनी नाटकातील वेशभूषा, लेखन, दिग्दर्शन आदी सर्वच घटकांचे धडे गिरवले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. बबन प्रभू यांनी लिहिलेल्या ‘झोपी गेलेला जागा झाला’ हा फार्स भेंडे यांच्या अभिनयामुळे रंगभूमीवर प्रचंड गाजला. त्या नंतर त्यांची कारकीर्द रंगभूमीवर वेगाने बहरली. विठोबा झाओबा आणि केशवराव दाते हे माझे गुरू त्यांच्याकडून मला प्रत्यक्ष शिकायला मिळाले नाही. मात्र, निरीक्षणातून मी नाटकातील प्रत्येक गोष्ट शिकत गेलो, असे ते नेहमी म्हणत.