कॉर्पोरेट क्षेत्रातील जोखीम कमी करण्यासाठी आणि विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी या क्षेत्रातील कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणा-या भारतीय उद्योग महासंघाने (सीआयआय) पुढाकार घेतला आहे
मुंबई – कॉर्पोरेट क्षेत्रातील जोखीम कमी करण्यासाठी आणि विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी या क्षेत्रातील कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणा-या भारतीय उद्योग महासंघाने (सीआयआय) पुढाकार घेतला आहे. संकटांना तोंड देण्यासाठी कंपन्यांमध्ये टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा सीआयआयने गुरुवारी मुंबईत केली. या टास्क फोर्सकडून धोरणांचा अभ्यास करण्यात येणार असून, मंदीच्या स्थितीत कंपन्यांना सल्ला देण्यात येणार आहे. ‘बिझनेस कंटिन्युटी अँड रिस्क मॅनेजमेंट’ या विषयावर सीआयआयकडून राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
गेल्या वर्षभरापासून देशातील औद्योगिक आणि कॉर्पोरेट क्षेत्र मंदीतून मार्गक्रमण करत आहे. महागाई, चढे व्याजदर आणि कमी झालेली गुंतवणूक यामुळे औद्योगिक क्षेत्राचा विकास खुंटला आहे. औद्योगिक क्षेत्राचा विकास गतिमान करण्यासाठी यातील कंपन्यांनी योग्य व्यावसायिक धोरणाची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. व्यवसायाची गती कायम राखण्यासाठी आणि जोखीम कमी करण्याबाबत कंपन्यांमध्ये प्रबोधन करण्याची गरज सीआयआयने व्यक्त केली आहे. त्यानुसार सीआयआयने तज्ज्ञांची विशेष समिती स्थापन केली आहे. यातील तज्ज्ञांकडून कंपन्यांना सल्ला दिला जाणार आहे.
देशात सार्वजनिक-खासगी भागीदारी विकसित करण्यासाठी या टास्क फोर्सकडून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. अर्थव्यवस्थेला रोज नवनवीन संकटांना तोंड द्यावे लागत आहे. या स्थितीत विकासाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आपले ज्ञान विकसित करणे गरजेचे असल्याचे पंतप्रधानांच्या आपत्कालीन व्यवस्थेचे मुख्य सल्लागार डी. शिवानंदन यांनी सांगितले. व्यावसायिक लक्ष्य उद्दिष्ट गाठण्यासाठी अधिक भर दिला पाहिजे. यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून (पीपीपी) अधिक प्रकल्प हाती घेणे आवश्यक असल्याचे शिवानंदन यांनी सांगितले.
टास्क फोर्समधील तज्ज्ञांकडून विविध धोरणे, अहवाल, अधिसूचना आणि उद्योगांशी निगडित माहितीचा अभ्यास करण्यात येणार आहे. पीपीपीला विकसित करण्यासाठीही टास्क फोर्सकडून प्रयत्न केले जाणार आहेत. आपल्या सदस्यांना नवीन मार्गदर्शन करण्यासाठी सीआयआय नेहमीच प्रयत्नशील असल्याचे टास्क फोर्सचे प्रमुख आणि टीसीएसचे कार्यकारी संचालक एस. महालिंगम यांनी सांगितले. ‘बिझनेस कंटिन्युटी अँड रिस्क मॅनेजमेंट’ संदर्भामध्ये भारतीय कंपन्यांमध्ये प्रबोधन करण्याची ही योग्य वेळ असल्याचे महालिंगम यांनी सांगितले. सीआयआयच्या या उपक्रमाचा भारतीय उद्योग क्षेत्राला फायदा होईल, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.