समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्या आघाडीचे पडघम उत्तर प्रदेशात जोरदारपणे घुमू लागले आहेत. लखनौमध्ये अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांनी एकत्रितपणे केलेली प्रचारफेरी केवळ या देशातच चर्चेचा विषय झाली नाही, तर बी.बी.सी.ने उत्तर प्रदेशातील नवीन माहोलची दखल घेतली. त्या राज्यातील जनतेला या दोन तरुणांची ही आघाडी एकदम पसंत पडलेली आहे.
राजकारणात शहाणपण हे नेहमी कामाला येत असते. अहंकार कधीही यश मिळवून देऊ शकत नाही. ज्या काँग्रेसच्या मंडळींना असे वाटत होते की, काँग्रेसने स्वतंत्रपणे लढावे त्याकरिता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून श्रीमती शीला दीक्षित यांना पुढे करण्यात आले होते. हटवादीपणाने काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या असत्या तर काँग्रेस भुईसपाट झाली असती आणि भाजपाशी टक्कर घेऊ शकणारा अखिलेशचा सपा सपाट झाला असता. निवडून येणा-या उमेदवाराला मोठय़ा संख्येची मते लागली तरी उमेदवार पाडायला थोडी मते पुरतात. राजकारण करताना आपला मुख्य शत्रू कोण हे समजण्याची ज्यांची औकात आहे, त्यांनाच आघाडीचे महत्त्व कळू शकेल. जिथे आपली शक्ती नाही तिथे माघार घेऊन तडजोड करण्यात संकोच वाटण्याचे काही कारण नाही. काँग्रेसने प्रश्न प्रतिष्ठेचा केला नाही, याचे श्रेय राहुल गांधी यांना आहे. लखनौच्या रॅलीत अखिलेश आणि राहुल या दोघांच्या देहबोलीतून एकमेकांबद्दलचा एक गाढ विश्वास पूर्णपणे जाणवत होता. उत्तर प्रदेशचे भवितव्य दोन तरुणांच्या हातात आहे. त्यामुळेच उत्तर प्रदेश एका परिवर्तनाच्या टप्प्यावर आलेला आहे. जुना बुरसटलेला उत्तर प्रदेश, गेले २५ वर्षे रामनामाचा जप ओढून भाजपाने या मतदारांची केलेली फसवणूक त्यामुळे उत्तर प्रदेशातील विटलेल्या जनतेला काहीतरी नवीन हवे होते. ज्यामुळे वातावरणात एक उत्साह निर्माण होणार होता. राहुल गांधींना हे समजले की, काय बदल हवा आहे.. त्यांनी आघाडीचा निर्णय केला. काँग्रेसला संजीवनी मिळण्याकरिता हा सर्वात शहाणपणाचा निर्णय होता. अखिलेश आणि राहुल हातात हात घालून प्रचारफेरीत सामील झाले. गाडीच्या टपावर उभे राहून दोघेही ज्या सहजतेने वावरत होते त्यावरून उत्तर प्रदेशातील सर्व टप्प्यांतील निवडणुकांचे भवितव्य लखनौच्या प्रचारफेरीमध्येच स्पष्टपणे जाणवत होते. एक वातावरण तयार व्हायला जी अनुकूलता लागते ती अनुकूलता या दोघांच्या एकत्र सहभागाने निश्चितपणे निर्माण झाली. महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शहाण्या लोकांना हे कळत नाही आणि अतिशहाण्यांना आघाडी नको आहे. त्यामुळे नुकसान होणार आहे, ते मुंबईतही होईल आणि महाराष्ट्रातही होईल.
कल्पना करा.. राहुल आणि अखिलेश एका गाडीच्या टपावर उभे राहून त्यांनी प्रचारफेरीत जे चैतन्य आणले त्यात सात्विकता होती. उद्या महाराष्ट्रात उघडय़ा जीपमध्ये शरद पवार यांना मध्यभागी उभे करा.. त्यांच्या उजव्या-डाव्या हाताला नारायण राणे, सुशीलकुमार शिंदे, प्रफुल्ल पटेल, मग अशोक चव्हाण, तटकरे, नसीम खान, मग नवाब मलिक अशी हातात हात घालून एकत्र मिरवणूक महाराष्ट्रात एकदा निघू द्या.. काँग्रेसच्या प्रचारसभेत शरद पवार यांना जाऊ द्या.. राष्ट्रवादीच्या प्रचारसभेत नारायण राणे, सुशीलकुमार यांना जाऊ द्या.. १५ दिवस लागणार नाहीत. महाराष्ट्राचे वातावरण बघता बघता बदलून जाईल. नुसतेच बदलून जाणार नाही, तर अनायासे तुटलेल्या भाजपा-सेनेला जागा दाखवायला हेच वातावरण उपयोगी पडेल. काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव झाला असला तरी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांना मिळून ३६ टक्के मते मिळाली होती. भाजपाला एक टक्का जास्त होती. शिवसेनेला जागा जादा मिळाल्या तरी मते काँग्रेसच्या टक्केवारीएवढीच होती. केवळ फाटाफुटीमुळे मतांचे विभाजन झाले आणि काँग्रेसचे ३७ आमदार अवघ्या १५०० ते ५००० मतांच्या फरकाने पडले आणि राष्ट्रवादीचे २७ आमदार तेवढय़ाच फरकाने पडलेले आहेत. पण हे गणिताचे शास्त्र समजावून घ्यायला महाराष्ट्रात कोणालाही वेळ नाही, गरज नाही. इच्छा असेल तर आघाडी होऊ शकते हे श्री नारायण राणे यांनी ठाण्यात दाखवून दिले आहे. त्यांनीच पुढाकार घेऊन ठाण्यातील आघाडी जर करून दाखवली तर मुंबईत का होणार नाही? एकटे निरुपम म्हणजे मुंबई काँग्रेस आहे का? जे उत्तर प्रदेशात राहुल, अखिलेश करू शकतात ते महाराष्ट्राच्या पातळीवर का होत नाही? आज २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत काँग्रेस-राष्ट्रवादी शहाणपणाने वागली तर २-५ जिल्हा परिषदासुद्धा भाजपाला जिंकता येणार नाहीत. काँग्रेस-राष्ट्रवादीकडे आजच सर्वाधिक जिल्हा परिषदांची सत्ता आहे. मग ती सत्ता घालवायची असेल तर एकमेकांच्या उरावर बसा.. आणि बुडवा.. ज्यांना थोडासा राजकीय शहाणपणा आहे ते राजकीय पक्ष असे वागणार नाहीत. पण काही नेते अहंकाराने भरलेले आहेत. पक्षहितापेक्षा आपल्या चमकोगिरीला त्यांना जास्त महत्त्व वाटते. देशपातळीवर उत्तर प्रदेशात भाजपाचे नाक कापण्याकरिता राहुल आणि अखिलेश एक झाले. हे चांगले उदाहरण समोर असताना महाराष्ट्रात आघाडी का होत नाही? त्यांचे तुटले आहे तर तुम्हीही तोडलेच पाहिजे, असा काही नियम आहे का? २०१४ च्या निवडणुकीत भाजपाला मस्ती आली होती. त्यांनी सेनेची आघाडी तोडली. त्यांनी तोडल्याबरोबर अजितदादाच्या अंगात आले.. त्यांनीही काँग्रेसशी आघाडी तोडली. परिणाम काय झाला? काँग्रेस-राष्ट्रवादीला घरी बसावे लागले. त्या पराभवातून अजून बरेच नेते सावरलेले नाहीत. वेळ गेलेली नाही. जर मुख्य शत्रू समजला तर आघाडी अवघड नाही.
उत्तर प्रदेशात राहुल गांधी आणि अखिलेश एकत्रपणे प्रचाराकरिता बाहेर पडले आहेत. एकत्रपणे पत्रकार परिषदा होत आहेत. दोन्ही पक्षांचे नेते एकजीव होऊन काम करत आहेत. काँग्रेसशी सपाने आघाडी केल्यामुळे मुलायमसिंह यांना कापरे भरलेले आहे. प्रचाराला बाहेर पडणार नाही, म्हणतात. अजिबात पडू नका. तुमची गरजसुद्धा नाही. प्रत्येकाचा काळ असतो. तो काळ, काम, वेगाचे गणित समजून घेतले नाही तर कितीही मोठा नेता असला तरी तो तथ्यहीन बनू शकतो. त्याला कोप-यात बसावे लागेल. अतिशहाणपणाने वागले तर मग त्याच्याशी न बोलता कोप-यात टाकून ठेवण्याची परिस्थिती निर्माण होईल आणि त्या परिस्थितीला तो नेता कारणीभूत ठरेल. आज मुलायम यांची स्थिती तीच आहे. तरीसुद्धा अखिलेश यांनी लखनौमधील प्रचारफेरीला बाहेर पडताना आपल्या वडिलांच्या पायाला हात लावून नमस्कार केला आणि आशीर्वाद घेतला. हे संस्कारच यश मिळवून देणार आहेत. अखिलेश लोकप्रिय आहे. तरुणांना हवाहवासा वाटतोय. राहुल गांधी एका परंपरेतील आहेत. त्यांच्याबद्दल भाजपावाल्यांनी कितीही गैरसमज पसरवले तरी राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ाला भ्रष्ट मोदी उत्तर देऊ शकलेले नाहीत आणि दोन कंपन्यांकडून पैशांचा मोदींनी अजून इन्कार केलेला नाही. राहुल ठामपणे बोलत राहिले. मोदी गप्प बसले. आज उत्तर प्रदेशात मोदींच्या पायाखालची जमीन खिसकलेली आहे. आता एकच आसरा आहे तो म्हणजे २००० रुपयांच्या नव्या नोटा. पैशांचा प्रयोग करून उत्तर प्रदेशातील निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न भाजपा आणि मोदी करतील. कारण उत्तर प्रदेशात मोदी हरले की-हरणारच आहेत-केंद्रातील भाजपाची सत्ता आपोआप भुसभुशीत होईल. मोदींना ते जाणवू लागले आहे. वास्तविक कोणत्याही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत देशाचा पंतप्रधान एवढय़ा हिरिरीने भाग घेत नसतो. आणि त्याने घ्यायचाही नसतो. स्थानिक नेतृत्वावर राज्याच्या निवडणुका सोडायच्या असतात. पण भाजपा एकखांबी तंबू आहे. त्यांच्याजवळ प्रचाराला दुसरा माणूसच नाही. त्यामुळे उद्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांनासुद्धा मोदी प्रचाराला आले की, फार आश्चर्य वाटायला नको. मात्र उत्तर प्रदेशातील प्रमुख वृत्तपत्रांनी एक गोष्ट ठळकपणे मान्य केली आहे की, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची जी लोकप्रियता होती ती लोकप्रियता आज राहिलेली नाही. त्यांच्या सभांना माणसे पकडून आणावी लागत आहेत आणि ती मख्खपणे बसून आहेत. टाळय़ा वाजवित नाहीत. मग टोळीवाल्याने त्या लोकांना दम दिला तर ते लोक सांगतात सभेला यायचे ५०० रुपये ठरले होते.. टाळय़ा वाजवण्याचे काही ठरवले नव्हते. मोदींच्या उत्तर प्रदेशातील ज्या दोन-तीन सभा झाल्या त्या सर्व फसलेल्या सभा आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीत काय होणार? याचा अंदाज आता देशाला आलेला आहे. भाजपाचे नाक तळापासून कापण्याची संधी उत्तर प्रदेशच्या मतदारांसमोर आहे आणि आजची हवा तरी अशी आहे की, निश्चितपणे उत्तर प्रदेशात अखिलेश दुस-यांदा बाजी मारणार. काँग्रेसने यासाठी चांगला निर्णय करून आघाडीत सामील झाल्यामुळे काँग्रेसची प्रत्येक गावात काही ना काही जी शक्ती आहे त्याचा फायदा या आघाडीला होईल. अमलापती त्रिपाठी, हेमवतीनंदन बहुगुणा, रामनरेश यादव आणि अगदी जुन्या काळातील सुचिता कृपलानी आदी नेत्यांनी उत्तर प्रदेशात काँग्रेसची बांधणी केली होती. त्यामुळे प्रत्येक गावात काँग्रेस आहे, काँग्रेसचा विचार आहे, काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, काँग्रेसचा झेंडा आहे. दहा-वीस टक्के मते काँग्रेसला पडतातच आणि हीच मते अखिलेशला यश मिळवून देतील.
तिकडे पंजाबमध्ये कॅप्टन अमरेंद्र सिंग यांच्या जोडीला भारताचे आघाडीचे फलंदाज नवज्योतसिंग सिद्धू आले आहेत. सिद्धू हे फ्रंटफूटचे बॅट्समन होते. त्यांची तडाखेबंद फलंदाजी पंजाबमध्ये सुरू झालेली आहे. अकाली दलाचे पंजाबमधील राज्य गेल्यात जमा आहे. मोदींच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या सभेत मोदींनाही ते जाणवले. यापूर्वी पाच राज्यांत भाजपा पराभूत झालेला आहे. मोदीच तिथे गेले होते प्रचाराला. आता या पाच राज्यांतही भाजपा साफ होणार आहे.