केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली येत्या २९ फेब्रुवारीला आपला सलग दुसरा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला येत्या मेमध्ये दोन वर्षे पूर्ण होतील.
नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली येत्या २९ फेब्रुवारीला आपला सलग दुसरा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला येत्या मेमध्ये दोन वर्षे पूर्ण होतील. त्यापूर्वी जेटली अर्थसंकल्प सादर करत असले तरीही त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीही नाही. पंतप्रधान म्हणून मोदी आणि अर्थमंत्री म्हणून जेटलींनी शून्य प्रभाव दाखवला आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात जेटली यांच्याकडून चमकदार तर जाऊ द्या, समाधानकारक असाही अर्थसंकल्प सादर केला जाणार नाही, असे मत तज्ज्ञ आताच व्यक्त करत आहेत.
मोदी सरकारने दोन वर्षात केवळ घोषणाबाजी आणि चमकोगिरी केल्याने एकही प्रश्न सोडवता आलेला नाही. पहिले वर्ष उन्मादात गेले आणि दुसरे वर्ष आळसात गेले आहे. जेटली यांनाही प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. वित्तीय तूट ४.१ टक्क्यांवर आणण्याचे उद्दिष्ट जेटलींनी ठेवले होते.
परंतु त्यांना ते गाठणे शक्य झाले नाही. जागतिक मंदीचे कारण त्यासाठी देण्यात येत असले तरी खरे कारण, सरकारने मनापासून प्रयत्नच केले नाहीत, हे आहे. आर्थिक सुधारणा राबवल्या नाहीत. शेतक-यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. गरिबीचे प्रमाण कधी नव्हे इतके वाढले आहे.
बेरोजगारी गगनाला भिडली आहे. उत्पादन क्षेत्राने मान टाकली आहे. कच्च्या तेलाचे दर उतरले तरीही लोकांना त्याचा फायदा दिलेला नाही. जेटलींनी अर्थसंकल्पात शेती, रोजगार, उत्पादन, संरक्षण यासाठी भरीव तरतूद करावी, अशी सामान्यांची अपेक्षा आहे. शेअर बाजार ढासळलेले असून भागभांडवल मोठय़ा प्रमाणात बाहेर जात आहे. रुपयाचा दर डॉलरच्या तुलनेत सत्तरीच्या आसपास पोहोचला आहे. त्यांच्या अर्थसंकल्पाची गाडी या संकटांमध्ये रुतलेलीच राहील, अशी चर्चा होत आहे.