अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या नायगाव पश्चिमेकडील ते जूचंद्र रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.
विरार – अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या नायगाव पश्चिमेकडील ते जूचंद्र रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या रस्त्यासाठी सुमारे ८५ कोटी रुपयांचा निधी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) देणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याचे काम रखडले होते.
माजी आमदार हितेंद्र ठाकूर व त्यावेळेच्या चार नगरपरिषदेचे नगराध्यक्ष यांनी मुंबई अहमदाबाद महामार्गाला जोडणा-या तालुक्यातील नायगाव, वसई, नालासोपारा व विरार या चारही रस्त्यांच्या रुंदीकरणाची मागणी केली होती. त्यावर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ही मागणी मंजूर केली होती. मात्र पर्यावरण विभागाने परवानगी नाकाल्याने नायगाव जूचंद्र रस्त्याचे काम रखडले होते. बहुजन विकास आघाडीचे खासदार व दोन आमदारांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा करूनही संबधित विभागाकडून परवानगी मिळवल्यानंतर रस्ता रुंदीकरणाचे काम निकाली निघाले. मुंबई अहमदाबाद महामार्गावरून नायगावकडे व उमेळे परिसरात नागरिकांना ये-जा करण्यास नवा रस्ता मिळणार आहे. या कामामुळे जूचंद्र व लगतच्या १८ गावांतील रहिवाशांना त्याचा फायदा होणार असल्याचे महापोर नारायण मानकर यांनी सांगितले आहे. हे काम पूर्ण होण्यास वर्षभराचा काळ लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.