कोकण आणि शेती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत व शेतकरी हा याचा सुवर्णमध्य आहे. राबराब राबणारा शेतकरी आजघडीला वेगवेगळे प्रयोग शेतीमध्ये करत आहे व त्याला यशसुद्धा येत आहे.
![संग्रहित छायाचित्र](http://prahaar.in/wp-content/uploads/2014/08/farming-6.jpg)
कोकण आणि शेती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत व शेतकरी हा याचा सुवर्णमध्य आहे. राबराब राबणारा शेतकरी आजघडीला वेगवेगळे प्रयोग शेतीमध्ये करत आहे व त्याला यशसुद्धा येत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून अपडेट राहताना काही लाभापासून मात्र तो वंचितच राहत आहे.
शेतकरी जनता अपघात विमा योजना हीसुद्धा अशीच एक योजना आहे. शेती करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विजेचा शॉक बसणे इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणा-या अपघातामुळे ब-याच शेतक-यांचा मृत्यू ओढवतो. पंधरा दिवसांपूर्वीच कुडाळ तालुक्यातील आकेरी येथील जामदार या शेतक-याला वीजवाहिन्यांच्या संपर्कात आल्याने आपल्या जिवास मुकावे लागण्याची घटना अगदी ताजी आहे.
घरातील कर्त्यां व्यक्तीच्या अशा जाण्याने कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन कठीण परिस्थिती निर्माण होते. अशा अपघात ग्रस्त शेतक-याना त्यांच्या कुटुंबांना आर्थिक लाभ देण्याकरता शेतकरी जनता अपघात विमा योजना कार्यन्वित आहे.
या योजनेंतर्गत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपये नुकसान भरपाई, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास १ लाख रुपये, अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास १ लाख रुपये, अपघातामुळे एक डोळा किंवा एक अवयव निकामी झाल्यास ५० हजार रुपये नुकसान भरपाई मिळते. अपघाता नंतर योग्य कागदपत्रांसह तीन महिन्यांत प्रस्ताव सादर करणे आवश्यक असते.
ही योजना न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनी व फ्युचर जनरल इंडिया इन्शुरन्स यां विमा कंपन्यांमार्फत राबवण्यात येत आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतक-यांनी स्वत: किंवा त्यांच्या वतीने अन्य कोणीही विम्याची रक्कम भरण्याची गरज नसून सरकारकडून सर्व खातेदार शेतक-यांचा विमा भरण्यात येतो. या योजनेंतर्गत मिळणारे लाभ स्वतंत्ररीत्या शेतक-यास मिळतात. विमा प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रियासुद्धा सोपी आहे.
शेतकरी किंवा वारसदाराने विमा कालावधीमध्ये तलाठय़ांच्या प्रमाणपत्रासह तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे पाठवायचा आहे. जिल्हा पातळीवरील अधिका-यांकडून प्रस्तावाची नोंद घेऊन सरकारच्या विमा सल्लागारांच्या विभागीय कार्यालयाकडे सदर प्रस्ताव पाठवला जातो. या कार्यालयाकडून प्राथमिक छाननी होऊन तो विमा कंपनी कडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला जातो.
शेतकरी मित्रांनो, केवळ शेती केली म्हणजे आपली जबाबदारी संपली असे अजिबात नाही. उलट शेतीबरोबरच आपल्यासाठी असलेल्या योजनांची माहिती असणे आवश्यक आहे. घरातील कर्त्यां माणसाचा मृत्यू असू दे, नाहीतर एखादा अवयव निकामी होण्याची घटना असू दे सर्व काही दु:खद असते. तरीसुद्धा यातून काही प्रमाणात सावरण्यासाठी अशा प्रकारच्या योजनांची माहिती असणे व या योजनांचा लाभ घेणे तितकेच गरजेचे आहे.