सध्या प्रायोगिक तत्त्वावर सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यात सुरू असलेली ‘ब्लड ऑन कॉल’ (जीवन अमृत सेवा) योजना येत्या शुक्रवार, २७ डिसेंबरपासून राज्यभर सुरू करण्यात येणार आहे.
पुणे – सध्या प्रायोगिक तत्त्वावर सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यात सुरू असलेली ‘ब्लड ऑन कॉल’ (जीवन अमृत सेवा) योजना येत्या शुक्रवार, २७ डिसेंबरपासून राज्यभर सुरू करण्यात येणार आहे. या योजनेचा प्रारंभ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते औंध जिल्हा रुग्णालय येथून होणार आहे, अशी माहिती रुग्णालयाचे मुख्य शल्यचिकित्सक ना.गो. नांदापूरकर यांनी दिली.
रुग्णांना त्वरित रक्तपुरवठा व्हावा, यासाठी ही योजना यापूर्वी सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू करण्यात आली होती. ती आता राज्यभर सुरू होत आहे. या योजनेमुळे मागेल त्याला वेळेवर योग्य गटाचे रक्त मिळण्यास मदत होणार आहे. या माध्यमातून रक्तपेढय़ांचे जाळे मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर रक्त मिळणे शक्य होणार आहे. राज्यातील प्रत्येक खासगी रुग्णालयात ‘जीवन अमृत सेवा’ योजनेची माहिती आणि दूरध्वनी क्रमांकाविषयीचा फलक लावणे सक्तीचे करण्यात येणार आहे.
अहमदनगर, अमरावती, गडचिरोली, औरंगाबाद, बीड, जालना, नांदेड, परभणी येथे या योजनेसाठी रक्त वाहतूक करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची निवड करण्यात आली आहे. तर ठाणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, परभणी, सातारा, पुणे आदी दहा ठिकाणी ‘मेट्रो ब्लड बँक’ स्थापन करण्यात येत असून येथे अत्याधुनिक यंत्रसामग्री बसवण्यात येत आहे. या मेट्रो बँकेमुळे स्वयंचलित रक्तगट तपासणी, विविध आजारांसाठीच्या रक्त तपासण्या स्वयंचलित पद्धतीने करण्यात येतील.
‘१०२’ ऐवजी ‘१०४’ क्रमांक
जीवन अमृत सेवा (ब्लड ऑन कॉल) योजनेसाठी यापूर्वी ‘१०२’ या टोल फ्री क्रमांकाला मंजुरी देण्यात आली होती. आता त्यामध्ये बदल करण्यात येत असून यापुढे या सेवेचा लाभ घेण्यासाठी १०२ क्रमांकाऐवजी ‘१०४’ हा टोल फ्री क्रमांक वापरण्यास सरकारने मान्यता दिली आहे. तसा सरकारी निर्णय २१ डिसेंबर रोजीच राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने काढला आहे.