तालुक्यातील करंजा येथील रायगड जिल्हा परिषदेच्या कोंढरी शाळेची दुरवस्था झाली असून, गैरसोयींमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे.
उरण – तालुक्यातील करंजा येथील रायगड जिल्हा परिषदेच्या कोंढरी शाळेची दुरवस्था झाली असून, गैरसोयींमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे या इमारतीची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी पालक वर्गाकडून होत आहे.
२००६-२००७ साली या शाळेचे काम रायगड जिल्हा परिषदेच्या निधीतून करण्यात आले होते. मात्र या शाळेचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने इमारतीच्या स्लॅबला गळती लागली आहे. तसेच भिंतींचे प्लास्टरही निघाले आहे. संरक्षणासाठी लावलेले ग्रिल निखळल्याने ते कधीही पडून अपघात होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी सिंटेक्सच्या प्लास्टिकच्या टाकी बसवण्यात आल्या आहेत, मात्र त्या उघडय़ा व तुटलेल्या असल्याने पिण्याचे पाणी विद्यार्थ्यांना घरून आणावे लागत आहे. इमारतीची दुरुस्ती व पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेने या शाळेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी पालक व विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली आहे.
या शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग भरत असून, १७८ विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. एक जून २०१३ पासून शाळेतील मुख्याध्यापक पद रिक्त आहे. शाळेला शिपाई नसल्याने साफसफाई विद्यार्थ्यांकडूनच करून घेतली जात आहे. शाळेचे सात वर्ग असले तरी फक्त सहाच शिक्षक आहेत. दिवसेंदिवस शाळेची दुरवस्थाच होत असल्याने विद्यार्थ्यांची पटसंख्याही रोडावली आहे.