सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी संदेश श्रीधर सावंत ऊर्फ गोटय़ा सावंत यांची तर उपाध्यपदी रणजीत दत्तात्रय देसाई यांची रविवारी बिनविरोध निवड झाली.
सिंधुनगरी – सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी संदेश श्रीधर सावंत ऊर्फ गोटय़ा सावंत यांची तर उपाध्यपदी रणजीत दत्तात्रय देसाई यांची रविवारी बिनविरोध निवड झाली. पालकमंत्री तथा काँग्रेस नेते नारायण राणे यांनी पुन्हा एकदा या पदावर अभ्यासू आणि आक्रमक नेतृत्त्व दिले.
या निवडीनंतर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतीश सावंत, मावळत्या अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, जि. प. व संघटना पदाधिकारी, कार्यकर्ते आदी सर्वानीच त्यांचे जल्लोषी स्वागत केले.
जि. प.चे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने जि. प. च्या अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते यांनी राजीनामा दिला तर उपाध्यक्ष गोटय़ा सावंत यांनीही राजीनामा दिल्यानंतर या दोन्ही रिक्त पदांसाठी रविवारी निवडणूक झाली. येथील छत्रपती शिवाजी महराज सभागृहात ही निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, नायब तहसीलदार गावित, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर उपस्थित होते. दु. १ वा. पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. अध्यक्षपदासाठी संदेश सावंत, व उपाध्यक्षपदासाठी रणजीत देसाई यांचा प्रत्येकी एक एकच अर्ज आल्याने ही निवड झाल्याचे दु. ३.३० वा. निर्णय अधिका-यांनी हा निर्णय जाहीर केला.
जि.प.अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, मावळत्या अध्यक्षा पडते, सभापती प्रकाश कवठणकर आदी जि. प. सदस्य, विविध पदाधिकारी, अधिकारी कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला एक अभ्यासू आणि आक्रमक नेतृत्त्व मिळाले आहे. प्रशासनावरील संदेश सावंत यांची चांगली पकड असून, सर्वसामान्य जनतेची कामे करण्याबाबत तळमळ आहे.
जि. प. च्या उपाध्यक्षपदी रणजीत देसाई यांची निवड झाल्याने या पदासाठी शिक्षित आणि अभ्यासू नेतृत्त्व मिळाले. जि.प. च्या सदस्य पदाबरोबरच त्यांनी सामाजिक व राजकीय कार्यात भरीव काम केले असून सर्वसामान्य जनता व युवा वर्ग संघटीत करण्याचे त्यांच्याकडे कौशल्य आहे. त्यामुळे जि. प. ला आता अध्यक्ष, उपाध्यक्ष या दोन्ही पदावर चांगली नेतृत्त्वे मिळाली आहेत.
सिंधुदुर्ग जि.प.राज्यात नंबर वन बनविणार
राणे कुटुंबीयांनी आपल्यावर दाखविलेला विश्वास सार्थ करून दाखवेन असे उद्गार जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष गोटय़ा सावंत यांनी बोलताना काढले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद राज्यात एक नंबरची बनविण्याचा मानस असल्याचेही ते म्हणाले.
१९९० पासून आपण पालकमंत्री राणे यांच्या बरोबर राजकारणात आहोत. त्यांनी वेळोवेळी आपल्यावर टाकलेल्या जबाबदा-या आपण पेलल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याकडे आपला कल असेल. प्रशासन व पदाधिकारी यांच्या योग्य संगनमताने पुढील कामकाज केले जाईल.ज्या कलमठ मतदार संघातून मी निवडून आलो. त्या मतदार संघातील जनतेचाही आपण ऋणी असल्याचे गोटय़ा सावंत यांनी सांगितले.