विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, जिल्ह्यातील ७६४ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.
ठाणे – विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, जिल्ह्यातील ७६४ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. यापैकी २४८ मतदान केंद्रांतील बुथवर व्हीडिओ चित्रीकरण केले जाणार आहे. तर ५१६ मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षकांद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे.
जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारासंघांसाठी एकूण ६ हजार १४५ मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आलेली आहे. यापैकी ७६४ मतदान केंद्रे संवेदनशील जाहीर करण्यात आलेली आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकी वेळीच्या तुलनेत यंदा १०२ मतदान केंद्राची वाढ झाली आहे. येत्या १५ तारखेला पार पडणा-या मतदान प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ७ हजारहून अधिक पोलिस तैनात करण्यात येणार आहेत. ठाणे जिल्हा विभाजनानंतर प्रथमच वेगळ्या जिल्ह्याची विधानसभा पार पडत आहे. जिल्हा प्रशासनाने पोलिस बंदोबस्ताबरोबरच गृहरक्षक दलाचे ६०० जवान, निमलष्करी दलाच्या १० तुकडय़ा व राज्य राखीव पोलिस दलाच्या चार तुकडय़ा तैनात करण्यात आलेल्या आहेत. सध्या आचारसंहिता लागू करण्यात आल्याने विविध पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारफे-या व जाहीरसभांचे चित्रीकरण करण्यात येत आहे. मतदाराच्या मनातील भीती दूर करण्यासाठी व पोलिसांचे अस्तित्व दिसण्यासाठी गल्लीबोळातून पोलिसांच्या फे-या काढल्या जात आहेत.
मतदारांना पावत्यांचे वाटप!
विधानसभा निवडणुकीत मतदारांना यापूर्वी उमेदवारांच्या प्रतिनिधींकडून मतदार यादीतील क्रमांक चिठ्ठीद्वारे देण्यात येत होते. या चिठ्ठीवर उमेदवारांच्या निशाणीचे चिन्हही असायचे. या चिन्हासहच मतदार मतदान केंद्रात प्रवेश करून मतदानप्रक्रियेत भाग घेत असत. या वेळी निवडणूक आयोगाने विविध प्रधिकरणांच्या कर्मचाऱ्यांचीच मतदारांना पावत्या वाटपाचे काम दिले आहे. यात जिल्हा निवडणूक कार्यालयाने मतदाराने मतदान कुठल्या बुथवर करायचे. याबाबतच्या पावत्या हे कर्मचारी घरोघरी जाऊन करीत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत सहा लाख २ हजार ५३५ पावत्यांचे वाटप करण्यात आलेले आहे. तसेच रविवारी सुट्टीच्या दिवशीही ही मोहीम राबवण्यात येणार आहे.