महाराष्ट्रदिनी विभाजन होण्याची शक्यता धूसर असल्याची कुणकुण लागल्याने ठाण्यात विविध पक्षांकडून विभाजनावरून राजकारण सुरू झाले आहे.
ठाणे- ठाणे जिल्हा विभाजनाचा मुहूर्त यंदा ‘महाराष्ट्र दिनी’साधणार, असे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात केले होते. मात्र, महाराष्ट्रदिनी विभाजन होण्याची शक्यता धूसर असल्याची कुणकुण लागल्याने ठाण्यात विविध पक्षांकडून विभाजनावरून राजकारण सुरू झाले आहे. मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी पावसाळय़ानंतरच विभाजनाचा विचार करावा, असे मत व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे विक्रमगडचे आमदार चिंतामण वनगा यांनी दोन्ही काँग्रेसच्या वादात विभाजन रखडल्याचा जावईशोध लावून राजकारण खेळण्यास सुरुवात केली आहे.
जिल्ह्याचे मुख्यालय पालघर येथे उभारण्यास काही नेतेमंडळींनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे विभाजनासंबंधी निर्णय घेताना सरकारला सर्व बाजू तपासाव्या लागत आहेत. जिल्ह्याची निर्मिती करताना आर्थिक तरतूद करणेही गरजेचे आहे. यासंबधी प्रक्रिया सुरू असल्याचे महसूल विभागाकडून नुकतेच सांगण्यात आल्याने विभाजनाची प्रक्रिया लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. विभाजनाचा निर्णय पावसाळय़ानंतर घेण्याची मागणीही जोर धरत आहे. मात्र, पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी याच काळात आचारसंहिता लागू झाल्यास विभाजनाची घोषणा लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.
दोन्ही काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे जिल्हा विभाजनाची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. सरकारने यापूर्वी १५ ऑगस्टची तारीख दिली होती. मात्र, सद्य:स्थितीत १ मे रोजीची शक्यताही धूसर आहे. ही एक प्रकारे जनतेची फसवणूक आहे. – अॅड. चिंतामण वनगा, आमदार
मागील ३३ वर्षापासून जिल्हा विभाजनाचे घोंगडे भिजत पडले आहे. विभाजनाच्या अनेक घोषणा झाल्या. मात्र त्याची अंमलबजावणी कागदारावरच राहिल्याचा जिल्हावासीयांचा अनुभव आहे. विभाजनासाठी तारखेवर तारीख असा खेळ सुरूच आहे. मध्यंतरी उपमुख्यमंत्री अजित पवार ठाण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्या वेळी १ मे रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र, अद्याप ते पूर्ण होऊ शकलेले नाही.
[poll id=”251″]
नव्या जिल्ह्याचे मुख्यालय पालघरला असावे, अशी शिफारस नाहटा समितीने केली आहे. महाराष्ट्र दिनी नव्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात येणार होती. मात्र यंदा महाराष्ट्र दिनापर्यंत राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार नसल्याने विभाजनाची घोषणा लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. जिल्हा विभाजनाच्या संदर्भातील अहवाल सध्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. दुष्काळी परिस्थिती असल्याने खर्चाचा जादा भार नको, असा युक्तिवादही विभाजन पुढे ढकलण्यासाठी केला जात आहे.
[EPSB]
आश्वासनांचेच गाजर! »
जिल्ह्याच्या निर्मितीसाठी आर्थिक तरतूद आणि कार्यालयांसाठी जागा उपलब्ध न झाल्याचे कारण पुढे रेटून जिल्हा विभाजनाचा मुहूर्त पुन्हा लांबणीवर ढकलण्यात आला आहे.
[/EPSB]
कथोरे म्हणतात, कल्याण नवा जिल्हा करा!
दुष्काळामुळे विभाजनाचा मुद्दा लांबणीवर पडण्याची शक्यता असताना जिल्ह्यातील काही नेत्यांना जिल्ह्याचे चौभाजन अपेक्षित आहे. आमदार किसन कथोरे यांना जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता त्रिभाजनाची मागणी पुढे केली आहे. कल्याण हा नवा जिल्हा करून जिल्ह्याचे त्रिभाजन करा, अशी त्यांची मागणी आहे. याबद्दल विधानसभेत अशासकीय ठरावही आणला आहे. राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर सरकारने त्रिभाजनाचा विचार करावा, असेही कथोरे यांचे म्हणणे आहे.