जिल्हाधिका-यांनी निवडणुकीचे आदेश इंग्रजीत काढल्याने जिल्हाधिका-यांना मराठीचे वावडे आहे का, अशी चर्चा या कर्मचा-यांत आहे.
ठाणे- आगामी लोकसभा निवडणूक कामांसाठी जिल्ह्यातील विविध कार्यालयांतील कर्मचा-यांच्या नेमणुका जिल्हाधिकारी पी. वेलरासू यांनी केल्या आहेत. मात्र या नेमणुका करताना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिका-यांनी निवडणुकीचे आदेश इंग्रजीत काढल्याने जिल्हाधिका-यांना मराठीचे वावडे आहे का, अशी चर्चा या कर्मचा-यांत आहे.
जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघांसाठी एप्रिल महिन्यात निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार कर्मचा-यांच्या नेमणुका निवडणूक कामासाठी करण्यात आलेल्या आहेत. या निवडणुकीच्या आधी बुथवर काम करणा-या कर्मचा-यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येते. यात ईव्हीएम मशिन व बॅलेट मशिन हाताळणे, विविध प्रकारचे फॉर्म कसे भरायचे, बुथवर असताना कोणती काळजी घ्यायची इत्यादी माहिती देण्यात येते. यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी पी. वेलरासू यांनी, १८ मार्च २०१४ रोजी कर्मचा-यांना आदेश दिलेले आहेत.
यात २९ मार्च व १३ एप्रिल २०१४ रोजी या कर्मचा-यांसाठी विशेष प्रशिक्षण आयोजित केलेले आहे. मात्र हा आदेश इंग्रजीत काढण्यात आल्याने वर्ग-४च्या पदावर काम करणा-या अल्पशिक्षित कर्मचा-यांचा गोंधळ उडाला आहे. इंग्रजीतील लिखाणामुळे जिल्हाधिका-यांनी निवडणुकीचे आदेश दिलेत की प्रेमपत्र लिहिले आहे, याचा बोध या कर्मचा-यांना झालेला नाही. राज्य सरकारने कारभारात पारदर्शकता यावी, तसेच राज्यातील जनतेला समजेल, अशा मराठी भाषेत सरकारी कारभार करावा, असे आदेश दिलेले आहेत. तसेच सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी मराठीत स्वाक्षरी करावी, असे परिपत्रक सर्व विभागांना पाठवले आहे. असे असतानाही जिल्हाधिकारीसारख्या पदावर असणा-या सनदी अधिका-याने इंग्रजीत आदेश काढावेत व त्या आदेशांवर इंग्रजीत स्वाक्षरी करणे म्हणजे सरकारी निर्णय धाब्यावर बसवण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.
मतदार याद्यांतील घोळ सुरूच
मतदार याद्यांच्या पुनर्रचनेच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली असून, ठाणे शहरातील या कामासाठी पालिकेतील शिपायांनाही जुंपण्यात आले आहे. तर अधिका-यांना झोनल आफिसर म्हणून नियुक्त करण्यात आल्याने पालिकेचा संपूर्ण कारभार गारपीट पडल्यासारखा थंडावला आहे. जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघांतील ७० लाख ६८ हजार मतदारांना ओळखपत्र देण्याचे तसेच मतदार याद्यांच्या पुनर्रचनेचे काम सुरू आहे. २४ मार्चअखेर सर्व मतदारांना ओळखपत्रे व मतदार याद्यांतील दुरुस्ती पूर्ण करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिका-यांना दिलेले आहेत. त्यामुळे महसूल विभागाने या कामांसाठी शिपायांच्याही नियुक्त्या केलेल्या आहेत. या अल्पशिक्षित कर्मचा-यांमुळे मतदार याद्यांतील गोंधळ कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे होणा-या लोकसभा निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिका-यांनी कंबर कसली आहे.