जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर जबरदस्त आत्मविश्वास आणि जे ध्येय निश्चित केले आहे, तिथपर्यंत पोहचण्यासाठी पराकोटीची जिद्द असली पाहिजे.
मुंबई- जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर जबरदस्त आत्मविश्वास आणि जे ध्येय निश्चित केले आहे, तिथपर्यंत पोहचण्यासाठी पराकोटीची जिद्द असली पाहिजे. हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सांगितले. जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावरच आपण राज्यातील सर्व प्रमुख पदापर्यंत पोहचलो, असा स्वअनुभही राणे यांनी यावेळी कथन केला.
शासकीय विधी महाविद्यालयाच्या ‘अभ्यास दौरा’ उपक्रमा अंतर्गत नारायण राणे यांच्याशी काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या ‘गांधी भवन’ येथे विद्यार्थ्यांनी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी शेतकरी कर्जमाफी, जैतापूर प्रकल्प, अर्थ संकल्प, मराठा आरक्षण आदी मुद्यावर प्रश्न विचारले. त्याला राणे यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात उत्तरे दिली.
विद्यार्थी असतानाच भविष्यात काय व्हायचे आहे, त्याचा संकल्प करा. जे ध्येय निश्चित केले आहे, ते गाठायचे असेल तर जिद्द आणि भक्कम आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे, असे राणे म्हणाले. आपण या दोन गुणांच्या बळावरच महाराष्ट्राच्या राजकारणातील जवळपास सर्व प्रमुख पदे मिळविल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या खडतर जीवन प्रवासाबद्दल बोलताना राणे म्हणाले की, मी सहा वर्षाचा असताना माझ्या वडिलांनी आजारपणामुळे मुंबईची नोकरी सोडून कुटुंबाला घेऊन गावी जाण्याचा निर्णय घेतला. मला मात्र त्यांनी नातेवाईकडे मुंबईतच ठेवले. शालेय जीवनातच मी दिवसा काम करायचो आणि रात्र शाळेत शिक्षण घ्यायचो. माझा शिंपी नावाचा मित्र पहिला आला, तेव्हाच मी त्याला सांगितले की पुढच्या वेळी मी पहिला येणार. आणि त्यानंतर अकरावीपर्यंत आम्हा दोघांमध्ये ही स्पर्धा राहिली. एकदा तो पहिला यायचा, नंतर मी पहिला यायचो.
पुढे आयकर विभागात नोकरीला लागलो. नोकरी करीत असताना वेगवेगळे व्यवसाय केले. पुढे नोकरीचा राजीनामा देऊन १९८५ साली पहिल्यांदा मुंबई महापालिकेची निवडणूक लढवून नगरसेवक झालो. पुढे दोनच वर्षानी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला बेस्ट समितीचा अध्यक्ष केले. त्यानंतर १९९० साली कोकणातून पहिली विधानसभेची निवडणूक लढविली. तेव्हा तिथे कुणाचाही परिचय नसताना निवडून आलो. त्यानंतर आमदार, बेस्ट समितीचा अध्यक्ष आणि नगरसेवक अशी पदे माझ्याकडे होती. पुढे युतीचे सरकार आले तेव्हा मी कॅबिनेट मंत्री झालो. माझ्याकडे एकाच वेळी सात खात्यांचा कारभार होता.
युती सरकारच्या शेवटच्या टप्प्यात मला मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पुढे विरोधी पक्षनेताही झालो. नगरसेवक, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, पुन्हा मंत्री अशी महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्व पदे मी भूषविली आहेत, असा आपला संघर्षमय जीवनपट त्यांनी विद्यार्थ्यांसमोर उलगडला. अशीच जिद्द ठेवलीत तर तुम्हीही तुमच्या जीवनात नक्की यशस्वी व्हाल, असा सल्ला त्यांनी दिला.
या अभ्यास दौ-याचे संयोजन अमोल गवळी यांनी केले होते. तर त्याचे नेतृत्व विधिमहाविद्यालयाचे प्रा. विशाल शिंदे यांनी केले. हा दौरा यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधी नितीन माने, सुनील बुधवंत, नितीन रेड्डी, नरेश सोनावणे, जयवंत यमकर, मीरा शहा यांनी प्रयत्न केले.