श्रीमती किरण बेदी अखेर भाजपात पोहोचल्या. त्यांनी तसा बराच उशिर केला; पण दिल्लीची निवडणूक जवळ आल्यामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी ही पलटी मारली.
श्रीमती किरण बेदी अखेर भाजपात पोहोचल्या. त्यांनी तसा बराच उशिर केला; पण दिल्लीची निवडणूक जवळ आल्यामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी ही पलटी मारली. आता त्या अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात उभ्या राहणार आहेत, असे सांगितले जात आहे. त्यांचा पुढच्या राजकीय प्रवास त्या विधानसभा निवडणुकीत निवडून आल्या तरच ठरेल. अन्यथा, भाजपाच्या चिंतन शिबिरात भाषणे देण्याशिवाय दुसरे काम राहणार नाही. अण्णा हजारे यांची जेव्हा हवा होती, तेव्हा किरण बेदी त्यांच्या तंबूत घुसल्या. त्यांना प्रसिद्धीची हावही खूप. त्यावेळी देशात काँग्रेसचे सरकार होते. त्यामुळे काँग्रेस विरोधात बोलण्याकरिता बेदी याच मुखंड होत्या; पण त्याचवेळी त्यांच्यावर जी अगदी जाहीरपणे टीका झाली, त्या टीकेला त्यांनी उत्तर दिले नाही.
भ्रष्टाचाराविरोधात बोलत असताना याच बेदीबाईंनी एक्झिकेटिव्ह क्लासचे विमानाच्या तिकिटाचे पैसे घेऊन साध्या वर्गाने प्रवास केला, अशी उघड टीका त्यांच्यावर झाली. त्याचे पुरावे अनेकांनी दिले; पण त्यावेळी त्याचे उत्तर त्यांनी दिले नाही. तेव्हा अण्णा हजारेंची हवा होती. त्यामुळे त्या अण्णा हजारेंच्या तंबूत शिरल्या. गडगंज प्रसिद्धी त्यांनी मिळवली. अण्णापासून ‘आप’ वेगळा झाला. मग केजरीवालांनी बेदीबाईंना पक्षापासून लांब ठेवले. त्यामुळे त्या गेले सहा महिने अज्ञातवासातच होत्या.
आता अण्णा हजारेंचा दाम वाजत नाही. ‘आप’चे राजकारण भंपकपणाचे होते. त्या दिखाऊ राजकारणाला लोक कधीच कंटाळले. त्यामुळे तिथेही चमकोगिरी करायला बेदींना संधी नाही. आता जाणार कुठे? घरात बसवत नाही. तेवढयात दिल्लीची निवडणूक लागली. मग भाजपामध्ये शिरून दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची संधी मिळत असेल त्या करिता त्या भाजपामध्ये शिरल्या.
मोदींजवळ दिल्लीतही चांगली माणसे नाहीत. त्यामुळे बेदीबाईंचे त्यांनी स्वागत केले. तिकडे केंद्रात २८३ खासदार निवडून आल्यानंतरसुद्धा संरक्षण आणि रेल्वे या दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या खात्यांसाठी निवडून न आलेल्यांना बोलवावे लागले. दिल्लीत बहुमत मिळाले तर नेतृत्वाची अडचण येऊ नये म्हणून कदाचित बेदीबाईंना भाजपाने प्रवेश दिला असेल.
प्रवेश घेतल्याबरोबर त्यांनी मोदींची भलामण केलेली आहे आणि ते अपेक्षितही आहे. सध्या दिखाव्याला अमित शहा आणि सब कुछ मोदी अशी भाजपाची अवस्था असल्यामुळे मोदींना मान्य असल्याशिवाय दिल्लीत नेतृत्व मिळवायचे स्वप्न साकारणे शक्य नाही. म्हणून बेदीबाईंनी नरेंद्र स्तुतीची माळ जपली. आता तो त्यांचा जप फळाला येतो का बघू या!