मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये सुमारे चार लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचा पालिकेचा दावा आहे.
मुंबई – मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये सुमारे चार लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचा पालिकेचा दावा आहे. मात्र, प्रत्यक्षात विद्यार्थ्यांची संख्या कमी असतानाही जादा पटसंख्या दाखवून विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून शिक्षण विभागातील काही अधिकारी भ्रष्टाचार करत असल्याचा खळबळजनक आरोप खुद्द शिक्षण समिती अध्यक्ष मनोज कोटक यांनी केला आहे.
पालिकेच्या आकडेवारीनुसार, शहरात पालिकेच्या विविध माध्यमांच्या शाळांमध्ये चार लाख २० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शालेय पोषण आहारांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. त्यातच सध्या पालकांना इंग्रजी शाळांबाबत आकर्षण असल्याने पालिकेच्या शाळांना गळती लागली आहे. ही गळती रोखत विद्यार्थ्यांना शाळांकडे आकर्षित करण्यासाठी गेली पाच वर्षे विद्यार्थ्यांना २७ शालेय वस्तूंचे पालिकेकडून वाटप करण्यात येते. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना खिचडी आणि सुगंधी दुधाचेही वाटप केले जाते. यापूर्वी सुगंधी दुधामुळे विद्यार्थ्यांना बाधा झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे सुगंधी दूध सध्या वादाच्या भोव-यात अडकले आहे. विद्यार्थ्यांना या सर्व वस्तू पुरवण्यासाठी पालिका प्रशासन अर्थसंकल्पात दरवर्षी कोटय़वधी रुपयांच्या निधीची तरतूद करते. मात्र, प्रत्यक्षात या वस्तूंचा लाभ किती विद्यार्थी घेतात, याबाबतही शंका असल्याचे कोटक यांनी सांगितले.
पालिकांच्या शाळांमध्ये मुलींची संख्या वाढावी, यासाठी मुलींना दिवसाला एक रुपया उपस्थिती भत्ता देण्याचा निर्णय पालिकेने घेतला. सुरुवातीचे काही महिने अशा मुलींच्या बँक खात्यात थेट भत्ता जमा केला जायचा. मात्र, आता हा भत्ता बँकेत जमा होतो की नाही, याबाबत साशंकता आहे. पालिकेच्या अर्थसंकल्पात कोटय़वधी रुपयांच्या निधीची तरतूद करूनही विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नसल्याचे प्रकार यापूर्वीही घडलेले आहेत. सुगंधी दुधासाठीच्या निधीबाबतही शिक्षण समिती अध्यक्ष मनोज कोटक यांनी आक्षेप घेतला आहे.
विद्यार्थ्यांना योजनांचा पुरेपूर लाभ मिळत नसल्याचा कोटक यांचा आरोप आहे. विद्यार्थ्यांची पटसंख्या जादा दाखवत पालिकेचे शिक्षण विभागाचे काही अधिकारी लूट करत आहेत. पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येसाठी शिक्षण विभागाने सर्वेक्षण करणे गरजेचे असल्याचे सांगत यासाठी अतिरिक्त आयुक्त मोहन आडताणी यांना निवेदन देणार असल्याचे कोटक यांनी सांगितले.