ज्या काचेच्या भांडय़ात अथवा हौदात हौसेखातर, प्रदर्शनाकरिता अथवा अभ्यासाकरिता जिवंत मासे, इतर जलचर प्राणी व जलीय वनस्पती ठेवतात, त्याला जलजीवालय म्हणतात. हल्ली ब-याच घरी अशी छोटी जलजीवालये केलेली आढळतात. त्यांना घरगुती जलजीवालये असे म्हणतात. घरगुती जलजीवालयांमुळे करमणूक होते आणि जलजीवांचा अभ्यास करता येतो. काचेचे हौद तयार करणे जास्त खर्चाचे वाटत असल्यास काचेच्या लहान गोलाकार भांडय़ातही मासे पाळता येतात. घरगुती जलजीवालयांशिवाय मोठी सार्वजनिक जलजीवालयेही असतात. समुद्रकिना-यांवरील बहुतेक महत्त्वाच्या शहरांत जलजीवालये आहेत. नेपल्स, मोनॅको, प्लिमथ वगैरे ठिकाणची जलजीवालये जगप्रसिद्ध आहेत. भारतात मुंबई व मद्रास येथे जलजीवालये आहेत.
जलजीवालयांची सुरुवात व्यापारात माशांना असलेल्या महत्त्वामुळे झाली. ज्या माशांचा उपयोग खाण्यासाठी करतात ते मासे पाळून, त्यांची अंडी व पिले यांची जोपासना करून खाण्याच्या माशांचे उत्पादन वाढविता येते हे लक्षात आल्यावर लोकांचे लक्ष या उद्योगाकडे वळले. काही हौशी लोकांनी सुंदर व आकर्षक रंगांचे मासे छोटय़ा काचेच्या भांडय़ात ठेवण्यात सुरुवात केली. ही घरगुती जलजीवालयांची सुरुवात होय. मासे पाळण्याची प्रथा निदान ४,००० वर्षांइतकी जुनी आहे. सुमेरियन लोक खाण्याकरिता लागणारे मासे लहान तळ्यात अथवा हौदात पाळीत असत. भारतात मासे पाळण्याची चाल केव्हापासून अस्तित्वात आली, हे सांगणे कठीण आहे; परंतु आशिया खंडात चीनमध्ये सोनेरी मासे हौसेखातर बाळगण्याला इ. स. ९६०च्या सुमारास सुरुवात झाली. चिनी हौशी लोकांनी लहान भांडय़ात ठेवता येण्यासारख्या माशांच्या उत्तम जाती तयार करण्यात यश मिळविले. काचेच्या भांडय़ात अथवा काचा बसविलेल्या हौदात मासे पाळण्याची पद्धत सु. २०० वर्षांइतकी जुनी आहे. प्राचीन काळी रोमन लोकांनी जलजीवालये बांधण्याचे प्रयत्न केले. मोठेमोठे हौद बांधून ते समुद्राला जोडलेले असत; त्यामुळे समुद्रातील पाणी हौदात येऊ शकत असे. या ठिकाणी दुर्मीळ व किमती जलचर ठेवीत असत.
आजकाल घरगुती किंवा मोठी सार्वजनिक जलजीवालये म्हणजे आपल्या डोळ्यासमोर काचेचे हौद येतात, पण ज्या वेळी जलजीवालयांची सुरुवात झाली त्या वेळी काचेसंबंधी शोध पूर्णत्वाला गेले नव्हते. त्यामुळे दगड, माती, विटा, चुना वगैरे वापरून जलजीवालय बांधीत असत. घरगुती जलजीवालयासाठी मातीची छोटी गोलाकार भांडी वापरीत असत. अठराव्या शतकात पौर्वात्य देशांतील आकर्षक सोनेरी मासे फ्रान्समध्ये नेण्यात आले. हौशी लोक हे सोनेरी मासे मातीच्या भांडय़ात पाळू लागले. मातीच्या भांडय़ात ठेवल्यामुळे ते बाहेरून दिसत नसत. गोडय़ा किंवा खा-या पाण्यात ठेवलेले मासे पाण्याची रासायनिक घटना बदलल्यामुळे किंवा योग्य तापमान नसल्यामुळे मरतात. असे होऊ नये म्हणून हल्लीची जलजीवालये या सर्व गोष्टींचा विचार करून बांधलेली असतात. याचबरोबर जलजीवालय सुस्थितीत ठेवण्यासाठी जलचरांचे अन्न, रोग, परजीवी (दुस-या जीवांवर जगणारे) प्राणी या सर्व प्रश्नांचा विचार करावा लागतो. जलजीवालयात योग्य अशी प्रकाशयोजना करणे आवश्यक असते. ज्या शहरांत पाणी शुद्ध करून पुरविले जाते, त्या पाण्यात क्लोरिनचे प्रमाण जास्त असते. अशा पाण्यात मासे ठेवले तर ते मरतात.
खा-या पाण्यातील मासे खा-या पाण्याच्या हौदात ठेवावे लागतात व त्यात समुद्राचे पाणी खेळवावे लागते. समुद्राचे खारे पाणी पंपाच्या साहाय्याने हौदात खेचून घेतले जाते. समुद्रात कित्येकदा वादळे होतात व त्यामुळे पाण्याचे रासायनिक संघटन बदलते. नदी ज्या ठिकाणी समुद्राला मिळते त्या ठिकाणच्या पाण्याचेही रासायनिक संघटन वेगळे असते. त्यामुळे असे पाणी जर माशांच्या हौदात खेळविले, तर मासे मरतात. अशा प्रकारच्या पाण्याच्या फिरण्याला उघडे परिसंचरण असे म्हणतात. ज्या वेळी विवृत परिसंचरण निरुपयोगी ठरते, त्या वेळी बंदिस्त परिसंचरणाचा अवलंब केला जातो. जलजीवालयातील पाणी गाळून, शुद्ध आणि स्वच्छ करून परत तेच पाणी जेव्हा जलजीवालयाला पुरविले जाते, तेव्हा त्याला बंदिस्त परिसंचरण म्हणतात.
मासे श्वसनक्रियेत ऑक्सिजन घेतात व कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतात, त्यामुळे जलजीवालयातील पाण्यात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते. संवृत परिसंचरणामध्ये जलजीवालयातील पाणी गुरुत्वामुळे एका गाळणीमधून गाळले जाऊन एका हौदात येते. येथे तापमानात आवश्यक तो बदल करून येथून ते पाणी पंपाच्या साहाय्याने उंच जागी असलेल्या हौदात खेचले जाते. पाण्यात काही रासायनिक बदल करणे आवश्यक असेल, तर तेही येथे केले जातात. कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढल्यामुळे येथे वायुमिश्रण केले जाते व परत हे पाणी नळ्यांच्या सहाय्याने जलजीवालयात पुरविले जाते.
ज्या ठिकाणी खा-या व गोडय़ा पाण्याची जलजीवालये आहेत, त्या ठिकाणी उष्ण, समशीतोष्ण व थंड अशा तीन प्रकारच्या तापमानाचे नियंत्रण करावे लागते. गोडय़ा पाण्याची आम्लता व क्षारता जशी असेल, त्याप्रमाणे यांचे विभाग पाडावे लागतात. पाण्याच्या परिसंचरणासाठी वापरण्यात येणा-या नळ्या काचेच्या, सिमेंटच्या, टणक रबराच्या किंवा एक प्रकारच्या प्लास्टिकच्या केलेल्या असतात. धातूंच्या नळ्यांमुळे काही विषारी द्रव्ये उत्पन्न होतात म्हणून धातूच्या नळ्यांचा शक्य तो उपयोग करीत नाहीत. कृत्रिमरीत्या समुद्रातील पाण्यासारखे पाणी तयार करण्याचे प्रयत्न केले गेले आहेत; परंतु हे पाणी सर्व दृष्टींनी समुद्रातील पाण्यासारखे होऊ शकत नाही. समुद्राच्या पाण्यातील जैव घटक व सूक्ष्म प्राणी हे कृत्रिमरीत्या तयार करणे जवळजवळ अशक्य आहे.
परजीवी प्राण्यांचा व रोगजंतूंचा उपद्रव
माशांना परजीवी प्राण्यांची व रोगजंतूंची सतत भीती असते. माशांना काही रोग झाला, तर त्यांना काही रसायनांत बुडवितात. या रसायनांचा परिणाम रोगजंतूंवर होतो, पण माशांवर होत नाही. अशी रसायने सुलभरीत्या तयार करता येत नाहीत, म्हणून माशांना आदर्श परिस्थितीत ठेवून रोग न होऊ देण्याची खबरदारी घेणे इष्ट होय.
पकडलेल्या जलचरांची पाठवणी
जलचरांना उत्तम स्थितीत पकडून योग्य त्या ठिकाणी पाठविणे हा जलजीवालयशास्त्रातील एक महत्त्वाचा भाग आहे. लहान व मोठे जलचर एकत्र ठेवता कामा नयेत, कारण मोठे जलचर लहान जलचरांना खाऊन टाकतात. ज्या पाण्यात जलचर ठेवावयाचे ते व ज्या पाण्यात ते आधी होते ते, असे दोन्ही प्रकारचे पाणी सर्वदृष्टींनी सारखे असले पाहिजे. माशांना ज्या ठिकाणी न्यावयाचे तेथे शक्य तितक्या लवकर नेणे आवश्यक असते, नाही तर मासे व इतर जलचर मरतात.
घरगुती जलजीवालयातील पाण्याची काळजी
घरगुती जलजीवालयात काही जलवनस्पती ठेवणे आवश्यक असते. जलवनस्पतींमुळे जलजीवालयांचे सौंदर्य तर वाढतेच, पण याशिवाय त्यांचे आणखीही महत्त्वाचे उपयोग आहेत. काहीवेळा जलजीवालयातील पाण्यात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जास्त झालेले आढळून येते. ज्या वेळी जलवनस्पतींमध्ये प्रकाशसंश्लेषण चालू नसते त्या वेळी वनस्पती इतर प्राण्यांप्रमाणे ऑक्सिजन घेऊन कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतात. अशावेळी कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते, ज्या वेळी वनस्पतींमध्ये प्रकाशसंश्लेषण चालू असते, त्या वेळी वनस्पती कार्बन डायऑक्साईड घेतात व ऑक्सिजन बाहेर टाकतात. त्यामुळे ऑक्सिजनचे व कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण सारखे राहते. अशा रीतीने ज्या जलजीवालयात प्राणी व वनस्पतींमुळे ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड यांचे प्रमाण जवळजवळ सारखे राखले जाते, अशा जलजीवालयाला संतुलित जलजीवालय म्हणतात. काहीवेळा असे दिसून येते की, माशांची उत्सर्जित द्रव्ये ही जलजीवालयातील वनस्पतींना खत म्हणून उपयोगी पडतात. वरील सर्व वर्णनावरून असे दिसून येईल की, हौशी लोकांना घरगुती गोडय़ा पाण्याचे जलजीवालय ठेवणे अधिक सोपे आहे. भारतात मुंबई येथील तारापोरवाला जलजीवालय व मद्रास येथील जलजीवालय ही महत्त्वाची आणि मोठी जलजीवालये आहेत. दररोज शेकडो लोक ही जलजीवालये पाहतात.
जलजीवालयातील माशांचे प्रकार
जलजीवालयातील मासे हे बहुधा सायप्रिनोडोंटिस, पर्कोमॉर्फी, लेबरिंथिसी, ऑस्टेरोफायसी या मत्स्य गणांतील असतात. काही अपवाद सोडले, तर या गणांतील मासे आकर्षक असतात. ते संथ पाण्यात, थोडय़ा जागेत व कृत्रिम अन्नावर जगू शकतात.