लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या महाराष्ट्र आणि हरयाणा राज्यातील विक्रमी मतदानाची परंपरा जम्मू-काश्मीर आणि झारखंड विधानसभा मतदानादरम्यान कायम राहिली आहे.
श्रीनगर- लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या महाराष्ट्र आणि हरयाणा राज्यातील विक्रमी मतदानाची परंपरा जम्मू-काश्मीर आणि झारखंड विधानसभा मतदानादरम्यान कायम राहिली आहे. गेल्या अनेक दशकापासून दहशतवादाचा सामना करणा-या जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या १५ जागांसाठी मंगळवारी विक्रमी ७१.२८ टक्के मतदान झाल्याची माहिती केंद्रीय निवडणुक आयोगाने दिली आहे. या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता आयोगाने व्यक्त केली आहे. या टप्प्यातील मतदानाचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे मतदाना दरम्यान हिंसाचाराची एकही घटना घडली नाही.
जम्मू-काश्मीर आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली होती. विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सहा वाजेपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये ७१.२८ टक्के निवडणूक अधिका-यांनी सांगितले.
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या १५ तर, झारखंडमध्ये १३ जागांसाठी मतदान झाले. जम्मू-काश्मीरमध्ये पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दुपारी बारा वाजेपर्यंत ३३ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर दुपारी दोन वाजेपर्यंत ५० टक्के मतदान झाले होते.
काश्मीरमध्ये कडाक्याची थंडी असूनही मतदानाला सुरुवात होण्याआधीच मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. या टप्यात पंधरा विधानसभा मतदारसंघातून १२३ उमेदवार रिंगणात आहेत. जम्मू विभागातील सहा, काश्मीरमधील पाच आणि लडाखमधील चार जागांसाठी मतदान होत आहे.
बारा विद्यमान आमदार रिंगणात असून. यात सात मंत्र्यांचा समावेश आहे. या पंधरा विधानसभा मतदारसंघात १०,५०,२५० मतदार आहेत. यात पाचलाख ४९ हजार ६९८ पुरुष तर, पाच लाख ५३९ महिला मतदार आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या ८७ जागा आहेत.
झारखंडमध्ये ६१.९२ टक्के मतदान
झारखंडमध्येही पाच टप्प्यांमध्ये विधानसभा निवड़णूक होणार असून, पहिल्या टप्प्यामध्ये विधानसभेच्या १३ जागांसाठी मतदान होत आहे. झारखंडमध्ये सहा वाजेपर्यंत ६१.९२ टक्के मतदान झाले. जम्मू-काश्मीर प्रमाणे झारखंडमधील मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता निवडणूक आयोगाने व्यक्त केली आहे.
यासह १३ जागांवरील १९९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. राज्यातील पहिल्या टप्प्यात माओावाद प्रभावित सहा जिल्ह्यांमध्ये मतदान झाले आहे. यासाठी या भागातील मतदानासाठी कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या टप्प्यातील उमेदवारांमध्ये विविध पक्षांचे दहा विद्यमान आमदार आपले नशीब आजमवत असून, अनेक माजी आमदारही रिंगणात आहेत.
झारखंडमध्ये विधानसभेच्या ८१ जागा आहेत.