जम्मू-काश्मीरमध्ये निर्माण झालेला सत्ता स्थापनेचा पेच लवकरच सुटण्याची शक्यता आहे.
श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये निर्माण झालेला सत्ता स्थापनेचा पेच लवकरच सुटण्याची शक्यता आहे.
भाजपा आणि पीडीपी हे परस्परविरोधी विचारांचे पक्ष सत्ता स्थापनेसाठी एकत्र येणार असून, येत्या दोन ते तीन दिवसात या संदर्भातील घोषणा होऊ शकते.
वादग्रस्त मुद्यांवर दोन्ही पक्षांनी एकएक पाऊल मागे घेतल्याने सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर झाला आहे. सत्ता राबवण्यासाठी दोन्ही पक्षांनी किमान समान कार्यक्रम तयार केला आहे.
दोन्ही पक्षांमध्ये चर्चेच्या पंधरापेक्षा अधिक फे-या झाल्यानंतर सत्ता स्थापनेवर एकमत झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
लष्कराला विशेष अधिकार देणा-या एएफएसपीए कायद्यावर पीडीपी एक पाऊल मागे येऊ शकते तर, कलम ३७० च्या मुद्यावरुन भाजप माघार घेण्याची शक्यता आहे. एएफएसपीए कायदा रद्द करण्याचे पीडीपीने आश्वासन दिले होते, तर कलम ३७० रद्द करावे अशी भाजपाची मागणी होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पीडीपीचे प्रमुख मुफ्ती मोहोम्मद सईद यांची २३ फेब्रुवारीला भेट होण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जम्मू-काश्मीरच्या जनतेने कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न देता त्रिशंकू कौल दिला होता. या निवडणुकीत प्रथमच राज्यात भाजपाच्या दुस-या क्रमाकांच्या जागा निवडून आल्या. सर्वाधिक जागा जिंकणा-या पीडीपीला मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.