जम्मू-काश्मीरमधील केरन सेक्टरमधील नियंत्रण रेषेजवळ दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन भारतीय जवान शहीद झाले.
श्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी जोरदार चकमक झाली. कुपवाडा जिल्ह्यातील केरन विभागातील नियंत्रण रेषेवर झालेल्या चकमकीत भारताचे दोन जवान शहीद झाले. तसेच भारतीय लष्कराने दिलेल्या चोख प्रत्युत्तरात चार दहशतवादी ठार झाले आहेत.
दरम्यान, सुरक्षा दलांनी दिलेल्या वेढ्यात अनेक दहशतवादी अडकल्याची माहिती लष्कराने रविवारी दिली.
कुपवाडा जिल्ह्यातील कालारूस जंगलात राष्ट्रीय रायफल्स आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे. या दहशतवाद्यांनी पाकिस्तानातून भारतात घुसखोरी केली आहे. या चकमकीत एक जवान गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने बदामी बाग येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले.
तर केरन सेक्टरमध्येच सुरक्षा दलाचे जवान शनिवारी रात्री गस्त घालताना दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. यात राहुल कुमार हा जवान जखमी झाला. त्याला द्रग्मुलल्ला येथील लष्कर रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान जवानाचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.