लग्न आणि जन्मपत्रिका यांचं नातं खूप जुनं आहे. लग्नाच्या विषयात जन्मपत्रिकेचा मुद्दा वर-वधुपक्षाच्या घरातून आपोआपच मांडला जातो. पण खरंच लग्न करण्यासाठी याची गरज आहे का? एकमेकांच्या मनापेक्षा त्यांच्या पत्रिकेतील गुणांना महत्त्व आहे का? पत्रिका न जुळताही लग्न करता येत नाही का? मग जन्मपत्रिका जुळल्याच पाहिजेत, असा हट्ट का? पळून जाऊन प्रेमविवाह करतात ते लोक कुठे जन्मपत्रिका बघण्याच्या नादात पडतात? केवळ ग्रह आणि त्यातले गुण जुळत नाही म्हणून आपल्या जोडीदाराला नाकारणं कितपत योग्य आहे? पुढची पिढी म्हणून या गोष्टीचा कितपत विचार करावा हे मात्र आपल्या हातात असणार आहे.
या विकेण्डला एका प्रसिद्ध एफ. एम. चॅनेलवर लग्न मोडण्याची कारणं कोणती असतात, यावर डायल-इन शो चालला होता. एक एक कारणं एवढी मजेदार होती की खूपच हसू येत होतं. तेवढयात एका श्रोत्याचा फोन आला. त्याचं लग्न मोडण्याचं कारण गंभीर पण जरा टिपिकलच होतं, ते म्हणजे त्यांच्या पत्रिका जुळत नव्हत्या. तो खूपच रडवेल्या सुरात म्हणत होता, ‘मला ती मुलगी खूप आवडली होती. पाहताचक्षणी नजरेत भरली, हुशारही होती आणि संस्कारीही होती. तिला बघण्याच्या एका तासाच्या कार्यक्रमात तिने आम्हा सगळ्यांचं मन जिंकलं. मी तर तासाभरात आमच्या सुखी संसाराची स्वप्नंही रंगवली होती. पण तिसऱ्याच दिवशी पत्रिका जुळत नाही म्हणून आम्हा दोघांच्या घरच्यांनी लग्नाला नकार दिला. माझा कोणीच विचार केला नाही. प्रेमात पडलो आहे मी तिच्या.’
बिच्चारा! तो काय आणि त्याच्यासारखे कितीतरी असतील त्यांचं लग्न याच कारणामुळे मोडलं जात असेल. आपल्याकडे ‘बिग बीं’ना खूप मानतात. पत्रिकेतले ग्रह जुळत नसतानाही ते केवळ प्रेमासाठी ऐश्वर्या-अभिषेकचं लग्न लावू शकतात, मग आपले पालक का नाही? असा खेद बहुतेक तरुण-तरुणांनी त्यावेळी व्यक्त केला होता. असो जरा मूळ विषयाकडे येऊया. आपल्या समाजात जन्मपत्रिका पाहून लग्न करणं ही गोष्ट पूर्वापार चालत आली आहे. पत्रिकेतील मुलाचे आणि मुलीचे किती गुण जुळतात यावर त्यांच्या लग्नाचं भवितव्य ठरवलं जातं. म्हणजे त्यांच्या लग्नाचं भवितव्य हे त्यांच्या हातात नसून ते त्या पत्रिकेवर असतं हे निश्चित!
एक यशस्वी नातं निर्माण करणं हे प्रत्येक जोडीदाराचं कर्तव्य असतं. मग जन्मपत्रिका जुळू द्या किंवा नाही, काहीही फरक पडत नाही. एकमेकांवर खूप प्रेम करणारे, एकमेकांना समजून घेणारे, एकमेकांचा आदर, सन्मान करणाऱ्या दोन व्यक्ती स्वत:च्या मनाने पत्रिका न बघताही लग्न करतात. पत्रिकेत जुळणारे गुण त्यांचं आयुष्य सुंदर बनवत नाही तर त्यांच्यामध्ये असणारा समंजसपणा, आपलेपणा त्यांचं नातं टिकवून ठेवतो. आणि अगदी छत्तीस गुण जुळलेले असतानादेखील संसारात कित्येकांचं पटत नाही, अशीही बरीच उदाहरणं आपल्याकडे आहेत.
मुला-मुलींची एकमेकांची पसंती असेल, त्यांना एकमेकांच्या आवडी-निवडी माहीत असतील तर ठरलेलं लग्न केवळ पत्रिका जुळत नाही म्हणून मोडून टाकणं योग्य नाही. किती मुली किंवा मुलं असेही असतात की सर्वगुणसंपन्न असूनही जन्मपत्रिकेत मंगळदोष आहे म्हणून घरची लोकं त्यांच्या लग्नाला राजी होत नाहीत. मग त्या मुलामुलींच्या भावना, त्यांचं मत यांचा विचारदेखील केला जात नाही.
आजची तरुण पिढी हे सगळं मानत नाही. त्यांना फक्त एवढंच माहीत असतं की त्यांना मिळणारा जोडीदार त्यांच्या आवडी-निवडी जाणून घेणारा, त्यांच्यावर प्रेम करणारा आणि विश्वास ठेवणारा हवा. शेवटी कोणतंही नातं हे विश्वासाच्या वेलीवरच फुलतं, मग लग्नासाठी जन्मपत्रिका जुळल्या किंवा नाही जुळल्या काहीच फरक पडत नाही. शेवटी लग्न टिकवणं हे त्या दोघांवरच अवलंबून असतं. जर दोन व्यक्ती एकमेकांना आवडत असतील, एकमेकांना समजत असतील तर ते नातं नक्कीच टिकणार मग ते टिकवण्यासाठी कोणत्या पत्रिके ची गरज नाही.
आजच्या तरुण पिढीला आपल्याला मिळणारा जोडीदार आपल्या मनासारखा असावा व समजूतदार असावा एवढंच हवं असतं. पण ज्या लोकांची मानसिकता अशी आहे की पत्रिका जुळल्यानंतरच लग्न करणार तर मग त्यांच्या मुलांचं काय, त्या मुलांच्या भविष्याचं काय? पत्रिके तील गुण जुळत नाहीत, पत्रिकेनुसार योग्य तो जोडीदार मिळत नसेल मग त्यांनी आयुष्यभर काय एकटंच राहायचं का आणि एखाद्या वेळी कोणावर प्रेम बसलं आणि पत्रिका जुळल्या नाहीत मग त्यांनी लग्न मोडावं का? आणि त्यांचं पुढचं आयुष्य ते एकटेच जगणार का. त्यातच आपल्या समाजामध्ये पत्रिका जुळली नाही की मुलीलाच दूषणं लावण्याची वाईट प्रवृत्ती आहे. त्यामुळे अशा जुळवाजुळवीच्या प्रकारात मुलीचा नाहक बळी जातो, याचा विचार केला गेला पाहिजे.
यातली चांगली गोष्ट म्हणजे, आजची तरुण पिढी याला विरोध करू लागली आहे. पण ज्यांना याविरुद्ध आवाज उठवता येत नाही, त्यांचं मात्र आयुष्यभरासाठी नुकसान होतं. जन्मपत्रिका जुळत नाही म्हणून एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त करणं हे योग्य नाही. या आधुनिक युगासोबत विचारही बदलायला हवेत. आधुनिकीकरण फक्त राहणीमान, कपडे, खाणं यातच नाही तर आपल्या विचारातही रुजवणं तेवढंच महत्त्वाचं आहे. किमान त्यामुळे तरी समाजातल्या अनेक तरुण-तरुणींना आपलं आयुष्य आपल्या आवडीच्या जोडीदारासोबत जगता येईल.
तुमचा विवाह कसा झाला?
तुमचा विवाह कुंडली जुळवून झाला की न जुळवता? पत्रिका न बघता झाला असेल तर तुमचं त्यामुळे काही अडलं का? त्याबाबत तुमचे काय अनुभव आहेत? ते आम्हाला जरूर कळवा. निवडक अनुभवांना आम्ही प्रसिद्धी देऊ.
आमचा पत्ता –
उमंग, प्रहार कार्यालय,
वन इंडिया वयक्स सेंटर,
ज्युपिटर मिल कंपाउंड,
एलफिन्स्टन, मुंबई १३
फॅक्स नं – ४०९६९९००/ ६१२३९९६६
संकेतस्थळ : feature@prahaar.co.in