महापालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर राजकीय पक्ष व उमेदवारांना मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांत प्रचारविषयक जाहिराती प्रसिद्ध करता येणार नाहीत.
मुंबई- महापालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर राजकीय पक्ष व उमेदवारांना मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांत प्रचारविषयक जाहिराती प्रसिद्ध करता येणार नाहीत; त्याचबरोबर १४ फेब्रुवारीच्या रात्री १२ वाजल्यापासून ते २१ फेब्रुवारीला मतदान संपेपर्यंत जनमत व मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यावर बंदी राहील, असे राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाच वेगवेगळ्या कायद्यांतील तरतुदीनुसार घेतल्या जातात. त्यानुसार जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा प्रचार मतदान सुरू होण्याच्या दिनांकापूर्वी २४ तास अगोदर बंद होतो. त्यामुळे पहिल्या टप्प्यात १६ फेब्रुवारीला मतदान होत असलेल्या १५ जिल्हा परिषदा व १६५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा जाहीर प्रचार १४ फेब्रुवारीला रात्री १२ वाजता संपेल.
दुस-या टप्प्यात २१ फेब्रुवारीला मतदान होत असलेल्या ११ जिल्हा परिषदा व ११८ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा जाहीर प्रचार १९ फेब्रुवारीला रात्री १२ वाजता संपेल; परंतु ध्वनिक्षेपाबाबतच्या विहित आदेशांचेही पालन करणे आवश्यक राहील.
महापालिकांच्या निवडणुकांचा प्रचार मतदान समाप्तीच्या ४८ तास अगोदर बंद होतो. त्यामुळे २१ फेब्रुवारीला मतदान होणाऱ्या १० महापालिकांचा जाहीर प्रचार १९ फेब्रुवारीला सायंकाळी साडेपाच वाजता संपेल. जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर आयोगाच्या १४ ऑक्टोबरच्या आदेशानुसार राजकीय पक्ष किंवा उमेदवारांना मुद्रित अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रचाराच्या जाहिराती प्रसिद्ध करता येणार नाहीत. यात सोशल मीडियाचाही समावेश असेल.
मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील जाहिरातींबाबत समान नियमन असावे, अशी मागणी काही राजकीय पक्षांकडूनदेखील करण्यात आली होती, असे नमूद करून सहारिया म्हणाले की, १४ फेब्रुवारीला रात्री बारापासून २१ फेब्रुवारीला मतदान समाप्तीपर्यंत कुठल्याही माध्यमांद्वारे जनमत व मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यावर बंदी राहील. या निवडणुकांचे दोन्ही टप्पे पाठोपाठ असल्याने मतदारांवर पडणारा संभाव्य प्रभाव लक्षात घेऊन, हे स्पष्टीकरण करण्यात आले असल्याचे सहारिया यांनी सांगितले.