राजकीय वर्तुळात अटलबिहारी वाजपेयी हे एक मवाळ व सौम्य स्वभावाचे नेते म्हणून ओळखले जात होते. मात्र, देशहिताचे किंवा व्यापक जनहिताचे निर्णय घेताना त्यांनी कधी तडजोड केली नाही. कारगील युद्ध आणि पोखरण अणुचाचणीसारख्या कठीण प्रसंगांमध्ये वाजपेयींमधील कणखर नेतृत्वाचे दर्शन सर्वाना झाले. प्रसंगी अमेरिकेलाही न जुमानण्याची हिंमत वाजपेयी यांनी दाखवली होती.
वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मे १९९८ मध्ये पाच अणुचाचण्या घेतल्या. सत्तेत आल्यानंतर केवळ एका महिन्यात घेण्यात आलेल्या या चाचण्या जगाला, विशेषत: अमेरिकेला हादरवणा-या ठरल्या. भारताने अमेरिकेच्या हेरगिरी उपग्रहाला चुकवून या चाचण्या पार पाडल्या होत्या. रशिया आणि फ्रान्सने भारताच्या या चाचण्यांचे समर्थन केले तर, अमेरिका, कॅनडा, जपान, ब्रिटन, युरोपीय महासंघाने भारतावर अनेक प्रकारचे निर्बंध लादले. मात्र, वाजपेयी डगमगले नाहीत. त्यांनी देशांतर्गत आर्थिक सुधारणांना गती देऊन हे निर्बंध निष्प्रभ ठरवून टाकले. या निर्बंधांची विशेष झळ भारताला बसली नाही. भाजप आणि वाजपेयींच्या प्रतिमेच्या दृष्टीने या अणुचाचण्या लाभदायीच ठरल्या होत्या.
कारगील युद्धादरम्यानची मुत्सद्देगिरी वाजपेयींच्या कणखरतेची साक्ष देणारी आहे. लाहोर भेटीत दोन देशांदरम्यानचे संबंध सुधारण्यासाठी वाजपेयी प्रयत्न करत असताना पाकिस्तान काश्मीरमध्ये घुसखोरी करत होता. हिवाळ्यात काश्मीरच्या नियंत्रण रेषेवरील अतिउंचावर असलेल्या चौक्यांवर उणे ५० पर्यंत तापमान घसरत असल्याने दोन्ही देशांकडून या चौक्या रिकाम्या केल्या जात. उन्हाळा सुरू होताच दोन्ही देशाचे सैनिक परत चौकीवर रुजू होत. पण १९९९च्या सुरुवातीला पाकिस्तानने आपले सैनिक आणि अधिकारी दहशतवाद्यांच्या वेशात भारतीय रिकाम्या चौक्यांवर घुसवले. सोबतीला काही दहशतवादीही होते. उन्हाळा सुरू होताच, भारतीय सैन्याच्या ध्यानात ही बाब आली आणि जून १९९९मध्ये ऑपरेशन विजय ही कारवाई सुरू करण्यात आली. भारतीय सैन्याला अतिदुर्गम प्रदेश, अतिउंच शिखरे, बोचरी थंडी यांचा सामना करावा लागला. तरी हवाई दल आणि भूदलाच्या एकत्रित कारवाईने पाकिस्तानच्या सैन्याल्या आसमान दाखवले.
नवाझ शरीफ यांनी याही परिस्थितीचे भांडवल करून त्याला आंतरराष्ट्रीय स्वरूप द्यायचा प्रयत्न केला. चीनला भेट देऊन त्यांनी मदतीची याचना केली. पण, भारताने मोठय़ा चातुर्याने ‘ऑपरेशन विजय’ची कारवाई नियंत्रण रेषेपर्यंतच मर्यादित ठेवली होती. भारताच्या या पवित्र्यामुळे चीननेही हस्तक्षेप नाकारला. नवाझ शरीफ यांनी मग अमेरिकेकडे मदतीची याचना केली. तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी मध्यस्थीची तयारी दाखवत वाजपेयींना चर्चेसाठी वॉशिंग्टनला बोलावले, पण वाजपेयींनी बाणेदारपणे हे निमंत्रण धुडकावून लावले. यामुळे अमेरिकेला सणसणीत उत्तर मिळालेच, पण काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा आणि तिस-या पक्षाचा हस्तक्षेप करवून सिमला करार मोडण्याचा पाकिस्तानचा डावही उधळला गेला.
अटलजींचे उल्लेखनीय निर्णय
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जाण्यानं देशाचं मोठं नुकसान झाल्याची भावना व्यक्त होतेय. कारण, देशहितासाठी त्यांचं योगदान अतुलनीय होतं. पंतप्रधानपदाच्या काळात त्यांनी भारताला दिलेल्या अशा गोष्टी, ज्यासाठी देश कायम त्यांचा ऋणी राहील.
>> शिक्षणाच्या अधिकाराचा रचला पाया
शिक्षणाचा अधिकार काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात अंमलात आला असला, तरी त्याची मुहूर्तमेढ अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना रोवली गेली होती.
६ ते १४ या वयोगटातील मुलांना शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळवून देणारं सर्व शिक्षा अभियान त्यांनी सुरू केलं होतं.
>> भारताला बनवलं अण्वस्त्रसज्ज राष्ट्र
अमेरिकेच्या दबावापुढे न झुकता आणि सगळ्याच देशांना भारताची ताकद दाखवून देण्याच्या उद्देशानं अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारने १९९८ मध्ये राजस्थानातील पोखरण इथे अणुचाचणी केली होती. अर्थात, हे अस्त्र भारत प्रथम वापरणार नाही, तर केवळ प्रत्युत्तरादाखल वापरेल, अशी भूमिकाही वाजपेयींनी जाहीर केली होती.
>> भूकंप, चक्रीवादळातही जीडीपी भक्कम
अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात देशावर अनेक संकटं आली. एक प्रलयंकारी भूकंप, दोन चक्रीवादळं, ३० वर्षांतील भीषण दुष्काळ, गल्फ वॉर २, कारगील युद्ध आणि संसदेवर हल्ला झाला. परंतु, वाजपेयींच्या कणखर नेतृत्वामुळे जीडीपीला धक्का बसला नाही.
>> मैत्री महासत्तांशी अन् शेजा-यांशी
इस्रयलसोबत राजनैतिक आणि लष्करी सहकार्यासाठी पुढाकार घेऊन अटलबिहारी वाजपेयींनी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं होतं. त्यानंतर, अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या भारतभेटीनं आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताचं वजन वाढलं. पाकिस्तानशी मैत्रीचे प्रामाणिक प्रयत्नही अटलबिहारींनी केले होते. दिल्ली-लाहोर बससेवा हे त्याचं प्रतीक होतं.
>> मेट्रो प्रकल्प
दिल्ली मेट्रो प्रकल्पाला मंजुरी आणि पहिल्या लाईनचं उद्घाटन अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात झालं होतं.
>> देश पोहोचला चंद्रावर
देश २००८ पर्यंत चंद्रावर जाण्यासाठी सज्ज होईल, अशी घोषणा अटलबिहारी वाजपेयी यांनी १५ ऑगस्ट २००३ रोजी केली होती. चांद्रयान-१ प्रकल्पावर त्यांनीच स्वाक्षरी केली होती. त्यानंतर, इस्रेने मागे वळून पाहिलेलं नाही. त्यांनी उत्तरोत्तर प्रगती केली. त्यामुळे अवकाशात भारताला चांगल्यापैकी भरारी घेता आली.
>> देश जोडणारा सुवर्ण चतुष्कोण
भारतातील सर्वात मोठा व जगातील ५व्या क्रमांकाचा रस्तेबांधणी प्रकल्प म्हणजे सुवर्ण चतुष्कोण. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाची घोषणा केली.
मै मरने से नही डरता : वाजपेयी
अजातशत्रू, कर्मयोगी लोकनेता आणि संवेदनशील कवी ही अटलबिहारी वाजपेयी यांची विविध रूपे. आपल्या वाणीने कोटय़वधी लोकांना मंत्रमुग्ध करणारा अमोघ वक्ता म्हणूनही त्यांनी भारतीय जनमानसावर ठसा उमटवलेला आहे. त्यांची भाषणे आजही भारतीय जनतेसाठी प्रेरणादायी असून राज्यकर्त्यांसाठी दीपस्तंभ आहेत. आज त्यांच्या निधनानंतर ‘मै मरने से नही डरता, डरता हूँ तो सिर्फ बदनामी से डरता हूँ’ हे भाषण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांचं हे ऐतिहासिक भाषण आजही कालातीत आणि तितकेच प्रेरणादायी आहे.
अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांच्या विरोधात २८ मे १९९६ रोजी विरोधकांनी संसदेत अविश्वास ठराव आणला होता. त्यावेळी वाजपेयी सत्तेचे लोभी असल्याचा त्यांच्यावर विरोधकांनी आरोप केला होता. त्यामुळे ते व्यथित झाले होते. या आरोपांना उत्तर देताना त्यांनी संसदेत हे तडाखेबंद भाषण करत विरोधकांची बोलती बंद केली होती. यावेळी त्यांनी प्रभू रामचंद्रांचा श्लोकही वाचून दाखवला होता. ते म्हणाले होते, ‘मै मरने से नही डरता, डरता हूँ तो सिर्फ बदनामी से डरता हूँ’. वाजपेयींनी त्यांच्या खास शैलीत हे भाषण केलं होतं. त्यामुळे संसदेत प्रचंड सन्नाटा पसरला होता. या प्रसंगानंतर वाजपेयींवर पुन्हा असे आरोप करण्याची विरोधकांची कधीच हिंमत झाली नाही.
संयुक्त राष्ट्र संघात १९७७ मध्येही त्यांचे भाषण प्रचंड गाजले होते. त्यावेळी ते तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात परराष्ट्रमंत्री होते. या सरकारचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी संयुक्त राष्ट्र संघात पहिल्यांदाच भाषण केले होते. हे भाषण त्या काळात प्रचंड गाजले होते. या भाषणात ‘वसुधैव कुटुम्बकम’चा नारा देतानाच मानवाधिकाराबरोबरच वर्णभेदावरही त्यांनी भाष्य केले होते. ‘मै भारत की ओर से इस महासभा को आश्वासन देना चाहता हूँ की हम एक विश्व के आदर्शो की प्राप्ति और मानव कल्याण तथा उसके गौरव के लिए त्याग और बलिदान की बेला में कभी पीछे नहीं रहेंगे,’ असे त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या मंचावरून ठणकावून सांगितले होते. त्यांच्या या भाषणानंतर संयुक्त राष्ट्र संघाच्या चर्चेचा नूरच पालटला होता.
नेहरूंची भविष्यवाणी खरी ठरली
पंडित जवाहरलाल नेहरू आणि अटल बिहारी वाजपेयी यांचे पक्ष आणि विचारधारा वेगळ्या असल्या, तरी या दोन्ही नेत्यांना एकमेकांविषयी आदर होता. नेहरूंनी वाजपेयींबद्दल केलेली भविष्यवाणी खरी ठरली. वाजपेयी एक दिवस माझ्या जागेवर (पंतप्रधानपदावर) असतील, अशी भविष्यवाणी नेहरूंनी केली होती. राजकारणात येण्यापूर्वी वाजपेयी हे काही र्वष पत्रकार म्हणूनही कार्यरत होते. राष्ट्र धर्म, पांचजन्य अशा ठिकाणी त्यांनी काम केले. वाजपेयी हे श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे अनुयायी होते. मुखर्जी यांनी १९५३मध्ये काश्मीरमध्ये जाण्यासाठी परवान्याची अट ठेवण्याच्या विरोधात उपोषण केले, त्याला वाजपेयी यांनी पाठिंबा दिला. १९५७मध्ये वाजपेयी जनसंघाचे खासदार झाले.
लोकसभेत वाजपेयींनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळींवरील मुद्दय़ांवरून नेहरू सरकारची सभागृहात कोंडी केली. त्यांची हिंदी भाषेवरील पकड बघून नेहरूदेखील प्रभावित झाले होते. १९५७ मध्ये नेहरूंनी परदेशी पाहुण्यांना वाजपेयींची ओळख करून देताना, ‘हा तरुण नेता एक दिवस देशाचा पंतप्रधान असेल’, असे सांगितले होते. नेहरूंची ही भविष्यवाणी ४० वर्षांनी १९९०च्या दशकात खरी ठरली. आणीबाणीनंतर १९७७ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. जनता पक्षाचे सरकार सत्तेत आले होते. वाजपेयी यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाची धुरा सोपवण्यात आली.
वाजपेयींमुळे मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो: मनोहर जोशी
मुंबई: भाजप आणि विशेषत: अटलबिहारी वाजपेयींनी घेतलेल्या भूमिकेमुळेच मी लोकसभेचा अध्यक्ष झालो. पण तिथेच नाही महाराष्ट्रातही मी मुख्यमंत्रीपदावर पोहोचलो याचे कारण सुद्धा पर्यायाने अटलबिहारी वाजपेयी आहेत, असे शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी सांगितले. मी लोकसभा अध्यक्ष होईन असे वाटलेच नव्हते. पण भाजप आणि वाजपेयींनी लोकसभा अध्यक्षाबाबतची भूमिका कायम घेतली. त्याचा मला फायदा झाला. वाजपेयींची ही भूमिका नसती तर मी अध्यक्ष झालो नसतो. पण तिथेच नाही, महाराष्ट्रातही मी मुख्यमंत्रीपदावर पोहोचलो याचे कारण सुद्धा पर्यायाने अटलबिहारी वाजपेयी आहेत. महाराष्ट्रात त्यावेळी भाजपचे पूर्ण सहकार्य होते, असे मनोहर जोशी यांनी सांगितले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी या दोघांचे संबंध चांगले होते. त्याचबरोबर कारभार करताना कठोर व्हावे लागते. ते कठोर होणे हे ही दोघांमध्ये होते.
या दोघांनी परस्परांना समजावून घेतले होते. माझ्यासमोर प्रश्न होता तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर सावरकरांची स्मृती खासदार आणि जनतेपर्यंत पोहोचवण्याच होते. ते काम मी करू शकलो, कारण या कल्पनेला अटलजींचा पूर्ण पाठिंबा होता. म्हणून तो मी विषय हाती घेतला. भाजपचे प्रमोद महाजन त्यावेळी विविध नेत्यांना भेटले होते. आज सभागृहामध्ये हिंदुत्त्वाचा मुद्दा नाही, पण एक गोष्ट खरी हिंदुत्त्वाची आठवण येते ती सावरकरांच्या चित्रांमुळे. लोकसभेत कोणीही प्रवेश केला, तर तिथे एक गोष्ट दिसून येते, की छत्रपती शिवाजी महाराज नेहमीच्या रुबाबात घोडय़ावर स्वार झाल्याचे दिसून येते.
वाजपेयी यांच्याबद्दलच्या दुर्मीळ गोष्टी
भारतीय राजकारणातील खंबीर व लोकप्रिय नेता अशी अटलबिहारी वाजपेयी यांची ओळख होती. त्यांच्या जादूई नेतृत्त्वामुळे देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ते विशेष लोकप्रिय होते. राजकारणाबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. जाणून घेऊयात त्यांच्याविषयीच्या दुर्मीळ गोष्टी.
>> आग्रा कनेक्शन – आग्रा येथील बटेश्वर हे गाव वाजपेयी कुटुंबीयांचे मूळ गाव होते. अटलबिहारी वाजपेयी यांचे आजोबा पंडित श्याम लाल वाजपेयी यांनी बटेश्वरमधून मध्य प्रदेशातील मोरेना येथे स्थलांतर केले होते.
>> हुशार विद्यार्थी – शालेय जीवनात अटलबिहारी वाजपेयी अत्यंत हुशार विद्यार्थी होते. त्यांनी राज्यशास्त्र विषयात प्रथम श्रेणीसह पदव्युत्तर पदवी मिळवली होती. हिंदी, संस्कृत व इंग्रजी विषयातही त्यांनी विशेत प्रावीण्य मिळवले होते.
>> सार्वजनिक जीवनात सक्रिय सहभाग – ग्वाल्हेरच्या आर्य कुमार सभा या संघटनेच्या माध्यमातून अटलबिहारी वाजपेयी पहिल्यांदा सार्वजनिक जीवनात सक्रिय झाले.
>> डाव्या विचारांकडे आकर्षित – राष्ट्रीय स्वयंसेवक संघात येण्यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी काहीसे कम्युनिस्ट विचारसरणीकडे झुकलेले होते. मात्र, बाबासाहेब आपटे यांच्या सांगण्यावरून त्यांनी १९३९ साली संघात प्रवेश केला. १९४७ साली ते संघाचे पूर्णवेळ प्रचारक झाले.
>> वाजपेयींना पहिली अटक – १९४२ साली ब्रिटिश सरकारविरुद्धच्या छोडो भारत चळवळीच्यावेळी अटलबिहारी वाजपेयी आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू प्रेम यांना अटक करण्यात आली होती. त्यांना २३ दिवस तुरुंगात राहावे लागले होते.
>> वाजपेयी आणि वडील शिकले एकाच वर्गात – अटलबिहारी वाजपेयी आणि त्यांच्या वडिलांनी कानपूरच्या डीएव्ही महाविद्यालयात एकत्रच कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. एवढेच नव्हे, तर ते वसतिगृहावरही एकत्रच राहायचे.
>> पत्रकारितेशी संबंध – अटलबिहारी वाजपेयींना पत्रकारितेचे प्रचंड आकर्षण होते. पक्षाचे काम करत असतानाच त्यांची ही इच्छा पूर्ण झाली. पक्षाकडून त्यांना सुरुवातीच्या काळात उत्तर प्रदेशातील दीनदयाळ उपाध्याय दैनिकाच्या ‘राष्ट्रधर्म’ या मासिकाची जबाबदारी देण्यात आली. याशिवाय, संघाच्या ‘पांचजन्य’ तसेच ‘वीर अर्जुन’ व ‘स्वदेश’ या दैनिकांची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. अटलबिहारी वाजपेयी १९७७ साली मोरारजी देसाई सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री झाले.
>> संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीत भाषण – अटलबिहारी वाजपेयी यांनी हिंदी भाषेला ख-या अर्थाने आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून दिले. संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीत भाषण करणारे ते पहिली व्यक्ती होते.
>> वाजपेयींविषयी नेहरुंचे भाकीत – देशात १९५७ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये वाजपेयी उत्तर प्रदेशच्या बलरामपूर मतदारसंघातून विजयी झाले. संसदेतील त्यांच्या पहिल्याच भाषणाने अनेकांना प्रभावित केले. त्यावेळी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी अटलबिहारी वाजपेयी एक दिवस देशाचे पंतप्रधान होतील, असे भाकीत वर्तविले होते.