दिंडीत आमचे चालणे-बोलणे, खाणे-निजणे, सारे काही माऊलींच्या संगतीत असते. माझी माऊली, आमची ज्ञानाई अगदी जवळ, होय अगदी सोबत असते. त्यामुळे आम्हा वारक-यांचे मन निश्चिंत आणि निवांत होते. शिकल्या-सवरल्या लोकांना या सगळ्याचे मोठे अप्रूप वाटते…
पंढरीच्या वाटेवर पुणे शहराचे महत्त्व मोठे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्याईने खरे तर हे शहर वसले आणि पेशव्यांच्या पराक्रमाने विस्तारले, तर अशा या पुण्यभूमीत सोमवारी माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्या येऊन पोहोचल्या. रस्त्याच्या दुतर्फा पुणे-मुंबईच्या श्रद्धाळू लोकांनी गर्दी केली होती. कुणी दिंडीतील लोकांवर फुले उधळत होते, तर कुणी वारक-यांना बिस्किटे वा फळे वाटण्यात आनंद मानत होता. बरीच पुणेकर मंडळी तर वेशीपासूनच दिंडीच्या बरोबर चालताना दिसत होती. मोठी मजेची गोष्ट म्हणजे त्या सगळ्या शहरी लोकांना आम्हा गाव-खेडय़ातील लोकांचा हेवा वाटतोय असे जाणवत होते. बघा ना माऊली, शहरात चांगले सुखाचे जीवन जगणा-यांना आम्हा ओबडधोबड वारक-यांचा हेवा वाटतो का ठाऊक आहे का?, कारण आम्ही घरा-दाराच्या जबाबदारीला काही काळासाठी तरी का होईना, दूर करू शकलो. होय, शहरातील भल्या-भल्या लोकांना ते शक्य होत नाही आणि दुसरी मोठी गोष्ट म्हणजे आम्ही संतांच्या संगतीत आहोत, होय, आम्ही वारकरी खूप भाग्यवान. अहो दिंडीत आमचे चालणे-बोलणे, खाणे-निजणे, सारे काही माऊलींच्या संगतीत असते. माझी माऊली, आमची ज्ञानाई अगदी जवळ, होय अगदी सोबत असते. त्यामुळे आम्हा वारक-यांचे मन निश्चिंत आणि निवांत होते. शिकल्या-सवरल्या लोकांना या सगळ्याचे मोठे अप्रूप वाटते, पण खरे सांगायचे तर संतांच्या उपदेशाने हे असे ‘सोडता’ येणे शक्य असते.
मायापाश किंवा मोहपाश सोडण्यासाठी नामदेव महाराज फार मार्मिकपणे सांगतात..
सर्व सावधान होऊनी विचारा।
सोडवण करा संसाराची।।१।।
अवघे आयुष्य सरोनी जाईल।
कोण ते होईल साह्य आम्हा।।२।।
सकल संसार जाणोनि लटिका।
शरण जा एका विठोबासी।।३।।
सर्व- काल वाचें म्हणा नारायण।
वाया एक क्षण जावों नेदी।।४।।
नामा म्हणे- सर्व सुखची होईल।
मन हे ठेवाल हरी-पायी।।५।।
व्वा! किती छान शब्दात नामदेव रायांनी मायापाश तोडण्याची युक्ती सांगितलेली आहे. आम्हाला कळते, पण वळत नाही माऊली.. हे सगळं कळेपर्यंत ‘जगण्याची वारी’ सुरूच राहील.. जय हरी..!