मुंबईकरांच्या धावपळीच्या परंतु निर्धास्त जीवनाला खीळ घालणा-या आणि जीवन किती असुरक्षित आहे, याची पहिल्यांदा जाणीव करून देणा-या त्या घटनेला आज २० वर्षे होत आहेत. अनेकांचे बळी घेणा-या, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त करणा-या या घटनेने मुंबईकरांच्या धैर्याची परीक्षा घेतली. त्यानंतरही मुंबईवर तशा प्रकारचे हल्ले झाले आणि मुंबईकरांनी ते त्याच वृत्तीने परतवले असले तरी १२ मार्च १९९३च्या त्या घटनेने झालेली जखम अजूनही सलत आहे.
१२ मार्च १९९३चा शुक्रवार तसा नेहमीसारखाच होता. निदान दुपापर्यंत तरी. त्या वेळी मी एका साप्ताहिकात काम करत होतो. शनिवार ही आमची डेडलाइन असल्याने शुक्रवार हा रिपोर्टिगसाठी बाहेर न जाता ऑफिसमध्येच येऊन मजकूर लिहायचा दिवस असे. त्यामुळे त्या शुक्रवारीही मी ऑफिसमध्ये होतो. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एका महिला सहका-याला फोन आला की, शेअर बाजारात मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. संपादकांनी लागलीच आम्हाला शेअर बाजारात जायला सांगितलं. सोबत फोटोग्राफर घेतला. अंधेरीहून ट्रेनने चर्चगेटमार्गे शेअर बाजारात यायला आम्हाला तासभर वेळ लागला. तोपर्यंत मुंबईचे व्यवहार नेहमीसारखेच सुरू होते. मुंबईत नेमकं काय घडलंय, याची कल्पना कुणालाच आली नव्हती.
ही साखळी तुटायला हवी!
भयाण शांततेचा अनुभव
या बॉम्बस्फोटाच्या भीषणतेची पहिली जाणीव झाली ती चर्चगेट स्टेशनवर उतरल्यावर. रस्त्यावर नेहमीसारखी लगबग दिसत नव्हती. वातावरणात एक प्रकारची गूढ शांतता होती. आजूबाजूच्या इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटलेल्या दिसत होत्या, त्यावरून बॉम्बस्फोटाची तीव्रता कळत होती. शेअर बाजाराचा परिसर जवळ येत गेला तशी ही शांतता आणखी भयाण होत गेली. शेअर बाजारापासून काही अंतरावर कागदांचा प्रचंड खच पडलेला दिसत होता. प्रवेशद्वारापाशी अॅहम्ब्युलन्स आणि काही खासगी गाडया उभ्या होत्या. बॉम्बस्फोटातील जखमी आणि मृतांना हलवण्याचं काम सुरू होतं. स्वयंसेवकांची धावपळ सुरू असताना पोलिस यंत्रणा मात्र कुठेच दिसत नव्हती. ‘वोखार्ट’चे खोराकीवाला शेअर बाजाराच्या पायऱ्यांवर उभं राहून पत्रकारांना माहिती देत होते.
धक्कादायक माहिती
बॉम्बस्फोट नेमका कुठे झाला, किती लोक गेलेत किंवा जखमी झालेत, याची माहिती मिळवायला एव्हाना आम्ही सुरुवात केली होती. बॉम्बस्फोट तळमजल्याखालील कार पार्किंगमध्ये झालाय, हे कळलं. तिथे रक्ताचा सडा आणि मानवी अवयवांचे तुकडे पडले होते. खूप भीषण दृश्य होतं. कपडे रक्ताने माखलेल्या एका स्वयंसेवकाने सांगितलं, ‘मी स्वत: पस्तीस डेडबॉडी उचलून अॅखम्ब्युलन्समध्ये टाकल्यात. तळमजल्यात असलेल्या बँक ऑफ बडोदाचा तर सगळा स्टाफ गेला,’ ही माहिती माझ्यासाठी खूप धक्कादायक होती. कारण त्या वेळी दादरला राहणारा माझा भाऊ ‘बँक ऑफ बडोदा’च्या शेअर बाजार शाखेत काम करत होता. आता मला रिपोर्टिग करता करता तो सुरक्षित आहे का, याचाही शोध घेणं भाग होतं. त्या वेळी आजच्यासारखे मोबाइल नसल्याने ताबडतोब कोणाशीही संपर्क साधणं शक्य नव्हतं. शेअर बाजारातल्या जखमी-मृतांना जी. टी. आणि जे. जे. हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येतं. पण तिथे जाण्यासाठी कुठलंच वाहन उपलब्ध नव्हतं. काही खासगी वाहनांतून रक्तदात्यांनाही हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं जात होतं. परंतु पत्रकारांना या वाहनात प्रवेश नव्हता. शेअर बाजारातील एकूणच गोंधळाच्या परिस्थितीत आम्ही आमच्या परीने जमेल तशी माहिती गोळा करत होतो. तेवढयात कळलं की, एअर इंडिया बिल्डिंगजवळही बॉम्बस्फोट झालाय. आम्ही लगेच शेअर बाजारातून एअर इंडिया बिल्डिंगजवळ निघालो.
बॉम्बस्फोटांची मालिका
एअर इंडिया बिल्डिंगचा तळमजल्याचा उद्ध्वस्त झालेला भाग पाहून तिथेही जबरदस्त बॉम्बस्फोट झाल्याचं लक्षात येत होतं. तिथेही शेअर बाजारासारखंच दृश्य होतं. जखमी-मृतांना मिळेल त्या वाहनाने हॉस्पिटलमध्ये पाठवलं जात होतं. काही वेळाने तिथे खासदार मुरली देवरा आले. त्यांनी माहिती दिली की, मुंबईत एकूण दहा ठिकाणी बॉम्बस्फोट झालेत. ही ठिकाणं कुठली हे त्यांना ठाऊक नव्हतं. परंतु हे एक अत्यंत मोठं कारस्थान असल्याची कल्पना येत होती. परंतु संपर्कासाठी कुठलंच साधन नसल्याने नेमका किती उत्पात घडलाय, याची कल्पना येत नव्हती.
रुग्णालयातील हृदयद्रावक दृश्य
आमचं एक ऑफिस फोर्टला होतं, तिथे जाऊन फोन करावा असाही विचार मनात आला. परंतु रस्त्यावर टॅक्सी फारशा नसल्याने तिथे पोहोचणं अवघड होतं. मग तिथून चालत जी. टी. हॉस्पिटलला जायचं ठरवलं. जी. टी. हॉस्पिटलच्या बाहेर चिंताक्रांत नातेवाईक दिसत होते. शेअर बाजार, एअर इंडिया बिल्डिंग आणि झवेरी बाजारात झालेल्या जखमी-मृतांना आणण्यात आलं होतं. तिथे प्रवेशद्वारावर जखमी आणि मृतांची यादी लावली होती. ती झरझर वाचून काढली. त्यात माझ्या भावाचं किंवा कुणाही परिचिताचं नाव नसल्याने हायसं लाटलं. मग बॉम्बस्फोटांतील जखमींना जिथे ठेवलं होतं, त्या वॉर्डमध्ये गेलो. जखमींची अवस्था वाईट होती. भाजलेले, रक्ताळलेले जखमी बघताना अंगावर काटा येत होता. त्यातल्या त्यात जे बोलण्याच्या अवस्थेत होते, त्यांच्याशी बोलून माहिती गोळा मिळवण्याचा प्रयत्न केला. पोलिस पत्रकारांना जखमींशी बोलू देत नव्हते. त्यामुळे आम्ही मोर्चा शवागाराकडे वळवला. तिथलं दृश्य तर अधिकच भयानक होतं. अर्धवट जळालेले, शरीराचे अवयव तुटून पडलेले मृतदेह जमीन-बाकडयांवर कसेही ठेवले होते.
अतिरंजित बातम्या
जी. टी. हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यावर आता दूरध्वनी दिसतोय का, याचा शोध घेणं भाग होतं. पण सार्वजनिक फोन कुठेही दिसत नव्हता. फिरत फिरत पुन्हा चर्चगेटला आलो तेव्हा आयुर्विमा भवनच्या कार्यालयात एक टेलिफोन दिसला. तिथून ऑफिसला फोन केल्यावर मुंबईतील परिस्थिती कळली. एव्हाना ऑफिसची अख्खी टीम कामाला लागली होती. अर्थात, पुढचा फोन दादरच्या माझ्या भावाच्या शेजा-यांकडे लावण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ प्रयत्न केल्यावर फोन लागला तेव्हा तोच फोनवर आला. त्याने सांगितलं की, तो आताच गावावरून आलाय. मी त्याला बॉम्बस्फोटांविषयी सांगितलं. अर्थात, शेअरच्या बँक ऑफ बडोदाचा सगळा स्टाफ गेल्याची बातमी खोटीच होती. तिथे केवळ दोनच जणांचा मृत्यू झाला होता. तेही दुस-या शाखेतून कामानिमित्त या ब्रँचमध्ये आले होते.
भरून न येणारी जखम
संध्याकाळी सात वाजेपर्यंत मुंबईत बारा बॉम्बस्फोट झाल्याचं स्पष्ट झालं होतं. अडीचशेहून अधिक मृत्युमुखी पडले होते. जखमींची संख्या तर त्याहून कितीतरी अधिक होती. सगळी मुंबई हादरून गेली होती. हळहळत होती. मुंबईत पुढे होणा-या अनेक बॉम्बस्फोटांच्या मालिकेतला हा पहिला मोठा बॉम्बस्फोट मुंबईकरांवर खूप मोठी जखम करून गेला होता. ऑफिसला परतताना वाटेत वरळीचं पासपोर्ट ऑफिस आणि सेना भवनजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाने घडवलेला हाहाकार पाहताना ही जखम अधिकच वेदना देत होती.. आणि आज २० वर्षानंतरही ती तशीच ठुसठुसतेय.
[EPSB]
ही साखळी तुटायला हवी!
मुंबई हे देशातील अनेकांचे आश्रयस्थान आहे. श्रीमंत, गरीब असो की, कोणत्याही धर्म, जातीतील व्यक्ती असो मुंबई म्हणजे प्रत्येकाला निश्चितपणे पोट भरू देणारी नगरी आहे. मात्र, देशाला सर्व प्रकारची आर्थिक रसद पुरवणा-या या नगरीवर १२ मार्च १९९३मध्ये पहिला दहशतवादी हल्ला झाला. पाकपुरस्कृत दहशतवादी, असंतुष्ट स्थानिक आणि धर्माच्या नावावर मुस्लिम तरुणांना भडकावून अत्यंत योजनाबद्धरीत्या बॉम्बस्फोटांची मालिका घडवून […]
[/EPSB]