कलाकाराचे विश्वच वेगळे असते. त्याला सर्वसामान्यांपेक्षा वेगळे काही दिसत असते. तो व्यक्त होत असतो आपल्या संकल्पनेतून, तो व्यक्त होत असतो आपल्या कल्पनेतून, कधी-कधी तो आपल्या कुंचल्यातुनही व्यक्त होतो.
कलाकाराचे विश्वच वेगळे असते. त्याला सर्वसामान्यांपेक्षा वेगळे काही दिसत असते. तो व्यक्त होत असतो आपल्या संकल्पनेतून, तो व्यक्त होत असतो आपल्या कल्पनेतून, कधी-कधी तो आपल्या कुंचल्यातुनही व्यक्त होतो. त्याचा हा कुंचला, त्याचे शिल्प, त्याची कला प्रत्येक क्षणी, प्रत्येक दिशेतून वेगळे काही बोलत असतो. वेगळे काही सांगत असतो. ही कलावंताची भाषा समजून घ्यायला आपले मन तेवढेच सर्जनशील असायला हवे. ही सर्जनशीलता अंगी येण्यासाठी तसे पोषक वातावरण असायला हवे.
ब-याचवेळा अनेक गूढ चित्रांचा आपल्याला अर्थच लावता येत नाही. अनेक वेळा चित्रांची भाषा आपल्याला समजत नाही. विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात या कलावंताची भाषाही आपल्याला समजून घ्यायला हवी. ही चित्र साक्षरता समजण्याबरोबरच आपल्याच कोषात गुंतून असलेल्या कलावंताला, चित्रकाराला चौकटीबाहेर आणण्यासाठी, समृद्ध कलाविश्वाचा खजिनाच सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवितानाच आपल्याच कोषात गुंतलेल्या चित्रकारांचाही थेट संवाद घडून आणण्यासाठी, मूर्त-अमूर्ताच्या भावना समजून घेण्यासाठी एक व्यासपीठ अखंड लोकमंचने निर्माण केले.
गेली अडीच वर्षे या लोकमंचच्या माध्यमातून अखिल भारतीय स्तरावर समस्त चित्रकारांना संघटित करतानाच त्यांच्या चित्रांचा संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी अखंड लोकमंच सिंधुदुर्गचे अध्यक्ष नामानंद मोडक, ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते यांसह अनेक चित्रकार एक नव्या संस्कृतीच्या रहस्याचा उलगडा करत आहेत. एक अशी संस्कृती कोकणच्या लाल मातीत दडली आहे. या लाल मातीतल्या कानाकोप-यात असे अनेक कलाकार आहेत. ज्यांची हाक अद्यापही चार- चौघांपर्यंत पोहोचलेली नाही. असे काही कलाकार लोककलेच्या लेबलखाली संतुष्ट आहेत. परंतु, त्यांनी कधी चौकटीबाहेर पाऊलच टाकलेले नाही. असे काही कलावंत आहेत, ज्यांनी आपण आणि आपले जग यातच स्वत:ला गुंतवून घेतले आहे. असेही काही कलावंत आहेत.
जे रुळलेल्या पायवाटांनाच हमरस्ता समजून पडत-धडपडत चालले आहेत. अशा सर्वानाच एकाच व्यासपीठावर आणण्याचं, त्यांच्यातील सर्जनशीलतेला अधिक वाव देण्याचा, क ला संस्कृतीच्या इतिहासाबरोबरच अंतर्मुख होण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करून देण्याचा प्रयत्न या अखंड लोकमंचने कणकवलीत यशस्वी केला. औचित्य होते ते पहिले अखिल भारतीय चित्र-शिल्प संमेलनाचे!
कणकवली येथील प्रहार भवनमध्ये स्वामी विवेकानंद सभागृहात वासुदेव गायतोंडे कलामंचावर नुकतेच ११ ते १३ मार्च दरम्यान हे संमेलन संपन्न झाले. कलावंतांनी कलावंतांसाठी एकत्र येऊन निर्माण केलेले हे व्यासपीठ आहे. यात व्यक्त होण्याचा प्रयत्न सर्वानीच करायला हवा. एक भक्कम वारसा या संपन्न अशा लाल मातीतून पुढे चालायला हवा. नव्या पिढीपर्यंत कलाविश्वाच्या समृद्धीची शैली पोहोचायला हवी. यासाठी हा प्रयत्न असल्याचे अखंड लोकमंच सिंधुदुर्गचे अध्यक्ष नामानंद मोडक यांनी उद्घाटन सोहळयाच्या प्रास्ताविकातच स्पष्ट केले.
उद्घाटन सोहळयानंतर रंगला तो कला इतिहास. मुंबईचे चित्रकार अरविंद हाटे यांनी कला इतिहासाचा मागोवा घेतानाच आज आपण कुठे आहोत? आपली चित्रशैली कुठे आहे? जगाच्या पाठीवर अनेक महत्त्वपूर्ण बदल घडत असताना कलावंत म्हणून आपणही समाजाचे काही देणे लागतो. याचे भान सर्वानाच आणून दिले. संमेलनाच्या माध्यमातून संवाद सुरू झाला होता. कलेचे सौंदर्य शास्त्र यावर पुण्याचे चित्रकार आणि लेखक पंकज भांबुरकर, डॉ. राम पंडित यांनी संवाद साधला. चित्रकार कलाअभ्यासक दीपक घारे यांनी कलावंत आणि कला रसिकांची अभिरुची याबाबत चर्चा केली.
बडोद्याहून आलेले सयाजीराव विद्यापीठाचे ग्राफिक्स विभागाचे प्रमुख विजयकुमार बागुडी, पंकज भांबुरकर आणि प्रभाकर कोलते यांच्याशी कलावंतांनी केलेली खुली चर्चा आणि त्यातून उलगडलेले मनाचे कंगोरे हे खूप आशादायी चित्र आहे. सुनील महाडिक, दिलीप वारंग यांनीही संमेलनात ख-या अर्थाने रंग भरले. आपल्या भागात कलामहाविद्यालय आहे. कलामहाविद्यालयातून शिकविला जाणारा अभ्यासक्रम चित्रशैलीच्या माध्यमातून कौशल्य विकास होतच असतो. परंतु या चित्र-शिल्प संमेलनाच्या माध्यमातून मनातील संवाद काळजापर्यंत पोहोचले होते.
आर्ट फिल्मच्या माध्यमातूनही याला आणखीनच आकार मिळाला. संमेलनात ब-याच अंगाने वैचारिक मंथन झाले. कलावंत, त्याची शैली, त्याची चौकट, त्यांच्यासमोरच्या समस्या यासह बरेच काही.. प्रहार भवनच्या दुस-या मजल्यावर ज्येष्ठ कलाकारांच्या कलाकृतींचे चित्रप्रदर्शनही सर्वासाठी खुले करण्यात आले होते. अनेक चित्र अंतर्मनात पोहोचणारी होती. अंतरीचा ठाव घेताना काहींच्या रेषा वास्तवातले अनेक कंगोरे दाखवत होत्या.
संमेलनाची पहिली संध्याकाळ गझल नवाझ भीमराव पांचाळे यांनी गायन आणि संवादातून बहारदार केली होती. अंतर्आत्म्याला जागे करताना माणुसकीच्या वेगवेगळया पदरांचा, वेगवेगळया दिशांचाच सुरांच्या माध्यमातून जणू माणूसच उलगडत होता. मैफलीच्या सुरेल तानाला कलावंतांनी बेहद्द दाद दिली. दुस-या दिवशी उस्ताद अब्रार अहमद यांचे संतुरवादन आणि त्याला गिरीष फाटक यांची असलेली तबला साद प्रहार भवनला झंकारून टाकणारी होती. कानात प्राण आणून संतुरवादन सारेच ऐकत होते. भैरवीसह अनेक राग त्यांच्या वादनातून चित्रकारांना कमालीचा आनंद देत होते.
संमेलनाच्या निमित्ताने कलावंताशी संवाद साधताना संमेलनाचे संयोजक ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते यांनी चित्रकारांची भाषा, दिशा आणि त्यांच्या अंतर्मनात असलेल्या एका सर्जनशीलतेच्या अंशाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. आपण का व्यक्त व्हावे? कलावंतांनी कसे जगावे? चारही दिशा तोडून त्यांनी या जगाच्याही पुढचा ठाव घ्यावा. अशी त्यांनी साद घातली. या संमेलनाच्या समारोपाला अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून दाद दिली. कला अभ्यासक, कलासमीक्षक विनायक परब यांचीही उपस्थिती प्रेरणादायी होती. संमेलनात जिल्ह्यातील कलामहाविद्यालय तसेच अनेक कलामहाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी व कलाशिक्षक सहभागी झाले होते.
अखंड लोकमंचच्या माध्यमातून गेले अनेक महिने पहिल्या अखिल भारतीय चित्र-शिल्प संमेलनासाठी कार्यरत असणारे नामानंद मोडक यांचे सहकारी राजेंद्र उसपकर, सुरेंद्र जगताप, राजेश कदम, शैलजा कदम, विनायक सापळे, स्वप्नील गावडे, आनंद मेस्त्री, हरी परब, रुपेश परब, चकोर साळुंखे, चेतन श्ेाट्टी यांसह दिवसरात्र मेहनत घेणारे अनेक कलाकार आणि संयोजकांनी संमेलन यशस्वी केले. बरेच काही घडले, बिघडलेसुद्धा; परंतु एक नवी ठिणगी कणकवलीच्या कलासंपन्नभूमीत उडाली आहे. कलावंतांनी चौकटीबाहेर येण्यासाठी आपल्या एक नव्या शैलीचा अंर्तमनातून शोध घेण्यासाठी साद घातली गेली आहे. प्रतिसाद चारही बाजूने उमटू लागेलच..
पारंपरिकतेच्या जोखडातून बाहेर येऊन नवे काही निर्माण करण्यासाठी अखिल भारतीय चित्र-शिल्प संमेलनाचा पाया रोवला गेला. आता पुढचे संमेलन यापेक्षा भव्यदिव्य होईल. चित्र-शिल्पकारांबरोबरच ललित कलाकारही यापुढे या संमेलनात सहभागी होतील. एक नवा आविष्कार जगासमोर येईल. कलासंपन्न समजल्या जाणा-या या लालमातीतून एक नवी प्रकाशवाट निर्माण झाली आहे आणि ही प्रकाशवाट निर्माण करणारा अखंड लोकमंच सर्वासाठी दीपगृह ठरणार आहे. हे मात्र निश्चित!
सौंदर्याविषयीच्या जाणिवा अधिक व्यापक करा..
सौंदर्याची व्याख्या बघणा-या व्यक्तीने कशी करावी ही ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असली तरी कलाकार म्हणून घडवत असलेली कलाकृती ही त्याच्या मनात बिंबलेल्या सौंदर्याप्रमाणे असते. चित्र आणि शिल्पकाराने स्वत:च्या सौंदर्याविषयीच्या जाणिवा अधिक व्यापक कराव्यात. त्यासाठी अभ्यासात्मक वृत्ती जोपासावी. विद्यार्थी दशेत स्वत:ची मते ठिसूळ बनविण्यापेक्षा ती लवचिक ठेवा व दुस-यांच्या विचारांचे आकलन करा.
जेणेकरून भविष्यात स्वत:च्या सौंदर्य शास्त्राबद्दल परिपूर्णतेने व्यक्त होता येईल. स्वत:च्या विचारांची चौकट बनविण्यापेक्षा व्यक्त होताना मोकळेपणाने चित्र रेखाटले पाहिजे, फु लांच्या सुगंधाइतकाच शेणाचा सुगंधही कलाकाराला भावतो आणि तो व्यक्तही होतो. हे सौंदर्य चित्रात जेव्हा उमटते तेव्हा ख-या अर्थाने सौंदर्य शास्त्राच्या अंगाने तो कलाकार आपली मांडणी करत आहे, असे म्हणता येईल.
– चित्रकार आणि लेखक पंकज भांबुरकर
बुद्धिमत्तेच्या ताकदीने रचनात्मक निर्माण होऊ दे!
चित्र-शिल्प कला म्हणजे समाजप्रबोधनाचे माध्यम आहे. समाजात या कलेचे महत्त्व वाढले पाहिजे. या क्षेत्रातील कलाकाराला मानसन्मान मिळाला पाहिजे. तो आर्थिकदृष्टयाही सक्षम झाला पाहिजे.
कलाकारांच्या बुद्धिमत्तेची ताकद रचनात्मक काम करून समाजापर्यंत जाऊ द्या. आज समाजाला प्रबोधनाची खरी गरज आहे त्यासाठी हे संमेलन उपयुक्त ठरेल असा विश्वास काँग्रेस नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आ.नारायण राणे यांनी व्यक्त केला. पहिल्या अखिल भारतीय चित्रशिल्प संमेलनाचे उद्घाटन करताना त्यांनी हे मार्गदर्शन केले.