चीनने पुन्हा एकदा दादागिरी करत कैलास मानसरोवर यात्रेचा नाथुला दर्रे रस्ता बंद केल्यामुळे दोन्ही देशात तणाव निर्माण झाला आहे.
नवी दिल्ली- चीनने पुन्हा एकदा दादागिरी करत कैलास मानसरोवर यात्रेचा नाथुला दर्रे रस्ता बंद केल्यामुळे दोन्ही देशात तणाव निर्माण झाला आहे. कैलास मानसरोवर यात्रेला जाणा-या ४७ भारतीय यात्रेकरूंना २३ जून रोजी का रोखले याचे कारण देण्यासही चीनने नकार दिला आहे.
तर दुसरीकडे भारत-चीन सीमेवर सिक्कीम सेक्टरमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांची हाणामारी झाल्याचाही एक व्हिडीओ सोमवारी समोर आला आहे.
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) सैनिकांनी सिक्कीममध्ये घुसखोरी करून भारतात प्रवेश करत भारताचे दोन बंकर उद्ध्वस्त केले होते. त्यामुळे दोन्ही देशांच्या जवानांमध्ये कमालीचा तणाव आहे. या तणावातूनच चीनने सिक्कीमच्या नाथुला दर्रेपासून होणा-या कैलास मानसरोवर यात्रेवर बंदी आणली आहे.
दरम्यान, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग म्हणाले की, दोन्ही देशांची परराष्ट्र मंत्रालये संपर्कात आहेत. दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिका-यांची २० जून रोजी ध्वजबैठकही झाली. तरीही येथील तणाव निवळलेला नाही.