पहाटे लवकर उठून नैसर्गिक विधी उरकत कामाला लागावे, अशी आपली भारतीय संस्कृती शिकवते. खेडेगावातील नागरिक पहाटे उठून न्याहारी आटोपून कामाला जुंपतात. शहरी भागात मात्र तसे नाही. कामाच्या एकूण वेळा पाहता ते शक्यही होत नाही. वाढत्या जागतिकीकरणात नोक-यांच्या वेळाच बदलल्याने पहाटे उठणे अनेकांना जमत नाही. झोपेचा विषय निघाला म्हणून सांगावेसे वाटते. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. तो आहे चीनमधील शाळांचा. प्राथमिक शाळेत जाणारी छोटी मुलं शाळेच्या बाकावर झोपलेली दिसत आहेत. वर्गात मुलांना असे झोपलेले पाहून आपल्याला आश्चर्य वाटेल. पण चीन सरकारने मुलांचे आरोग्य चांगले राहावे तसेच काही वेळ त्यांना आराम मिळावा यासाठी वामकुक्षी सक्तीची केली आहे. ‘व्हुजिआओ’ म्हणून हा प्रकार ओळखला जातो. दुपारच्या जेवणानंतर अर्ध्या तासांची झोप शाळेच्या बाकांवर मुलं घेत असतात. आपल्याकडे असा प्रकार नाही. या उलट एखादा मुलगा असा बाकावर ‘पेंगत’ असेल तर त्याला शिक्षक शिक्षा करतात.
लहान मुलांचे वय हे खेळण्याचे, बागडण्याचे. पण मुलं दोन-तीन वर्षाचे झाले की, त्यांना शिशूमध्ये टाकण्यात येते. यात मुलांना खरोखरच नैसर्गिक स्पेस मिळतो का, हाही एक प्रश्न आहे. त्यानंतर ज्युनियर केजी, केजीनंतर पहिली असा सगळा क्रम सुरू होतो. यात बालपण, त्यातील मजेला ही बालके पारखे होतात. या किलबिलणा-या बालकांच्या शाळांच्या वेळाही सकाळच्याच असतात. खेडेगावातील पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत असतात. शहरी भागातील शिशुवर्गाच्या बालवाडय़ा सकाळी आठ-नऊ वाजता भरतात. त्यामुळे अशा बालकांना सकाळी लवकर उठून तयारी झाल्यावर शाळेत जावे लागते. शाळेत गेल्यावर आधी त्यांची झोप झालेली नसते. त्यामुळे सकाळी शाळेत जाणारी अनेक मुले या वर्गातच पेंगतात, असे चित्र सार्वत्रिक आहे. मुळात जे वय आरोग्यवृद्धीसाठी उपयुक्त असते, त्यासाठी अशा वयातील मुलांना आवश्यक झोपेची गरज असते. ती गरज चीनसारखा देश ओळखून अशा वयोगटातील मुलांना दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी सक्तीची करत असेल तर भारतात विशेषत: महाराष्ट्रात ते अशक्य नाही. त्यामुळे मुलांची झोप तर होईलच, शिवाय त्यांना सकाळी लवकर उठण्याची सवयही लागेल. त्यामुळे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने चीनच्या या कृतीचा धडा घेण्याची गरज आहे. सेल्फीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची हजेरी घेण्याचा प्रयोग सरकारने राबवला. पण त्यास काही शिक्षक संघटनांनी विरोध दर्शवला. मुळात चांगल्या गोष्टी अंगवळणी पडायला फारच वेळ लागतो. पण ते होणेही आवश्यक आहे. लहानग्यांना शाळेतच दुपारची अर्धा तासांची विश्रांती मिळण्यासाठीचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने आणावा. तो विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.