चिनी नौदलाचे होत असलेले आधुनिकीकरण हा भारतासाठी चिंतेचा विषय असल्याचे मत नौदलप्रमुख अॅडमिरल डी. के. जोशी यांनी सोमवारी व्यक्त केले.
नवी दिल्ली, बीजिंग – चिनी नौदलाचे होत असलेले आधुनिकीकरण हा भारतासाठी चिंतेचा विषय असल्याचे मत नौदलप्रमुख अॅडमिरल डी. के. जोशी यांनी सोमवारी व्यक्त केले. तसेच प्रसंगी सैन्य पाठवूनही दक्षिण चिनी समुद्रातील भारताच्या हितसंबंधांचे रक्षण करण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. चिनी नौदलावर लक्ष ठेवून असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. त्याप्रमाणे भारतीय नौदलही आपले पर्याय तयार ठेवून डावपेच आखत असल्याचे जोशी यांनी स्पष्ट केले.
दक्षिण चिनी समुद्रावरून गेल्या वर्षी भारत आणि चीनमध्ये वाद निर्माण झाला होता. त्या भागात भारतीय हालचाली फारशा नाहीत, मात्र तेथे ओएनजीसी विदेशचे काही प्रकल्प आहेत. अशा हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी तेथे नौसैनिक पाठवण्याची तयारीही त्यांनी दर्शवली. तेथे भारतीयांना मुक्तपणे फिरता आले पाहिजे अशी अपेक्षा नौदलप्रमुखांनी व्यक्त केली.
संबंध दृढ करण्याची चीनची ग्वाही
दरम्यान, ‘काही घटकांनी’ अडथळे आणले तरी भारत आणि चीनचे संबंध आणखी दृढ होतील अशी अपेक्षा चीनने सोमवारी व्यक्त केली. गेल्या काही काळापासून उभय देशांमधील सीमा प्रश्नही सौम्य झाल्याचे मत चीनकडून व्यक्त करण्यात आले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन सध्या चीनच्या दौऱ्यावर असून सोमवारी त्यांनी चीनचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दाइ बिंगुओ यांची भेट घेतली. त्यावेळी दाइ यांनी उभय देशांदरम्यान आणखी सहकार्य करण्यावर भर दिला. दाइ यांनी उल्लेख केलेले ‘काही घटक’ म्हणजे अमेरिका आणि जपान असल्याचे चीनमधील सरकारी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.